रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, १९ धरणे ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 04:19 AM2018-07-10T04:19:48+5:302018-07-10T04:20:47+5:30

जिल्ह्यातील पावसाचा जोर सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. महाड, रोह्यातील पूरस्थिती ओसरली असली तरी नद्यांची पातळी वाढलेलीच आहे, तर नागोठणे शहरात दुपारनंतर पाणी वाढू लागल्याने पूरस्थिती निर्माण झाली.

Rainfall in Raigad district is continuously, 19 dams overflow | रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, १९ धरणे ओव्हरफ्लो

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, १९ धरणे ओव्हरफ्लो

Next

विशेष प्रतिनिधी
अलिबाग : जिल्ह्यातील पावसाचा जोर सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. महाड, रोह्यातील पूरस्थिती ओसरली असली तरी नद्यांची पातळी वाढलेलीच आहे, तर नागोठणे शहरात दुपारनंतर पाणी वाढू लागल्याने पूरस्थिती निर्माण झाली.
सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक २३०.४० मिमी पावसाची नोंद म्हसळा येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी मुरुड-२२०, तळा-१९२, माणगाव-१६२, श्रीवर्धन-१२४, महाड-१२०, अलिबाग-१०२, रोहा-९६, पोलादपूर-९०, पेण-७२.४०, कर्जत-६३.८०, खालापूर-६१.३०, उरण-५८, पनवेल-५७.६०, सुधागड-३७ तर गिरिस्थान माथेरान येथे १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या २४ तासांतील जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान ११३.५३ मिमी होते.

पावसाने रस्ते आणि जमिनी खचण्याचे प्रकार
सततच्या पावसामुळे जमिनीची जलधारण क्षमता कमी होवू लागल्याने रस्ते आणि जमिनी खचण्याचे प्रकार होवू लागले आहेत. माणगाव-म्हसळा मार्गावर चांदोरे-साई दरम्यान घाट रस्ता खचल्याने सोमवारी सकाळी वाहतूक ठप्प झाली होती. कालांतराने लहान वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली, मुरुडमध्ये राजपुरी परिसरात दरड कोसळण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील २८ पैकी १९ धरणे भरली
गेल्या पाच दिवसांच्या संततधार पावसामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील २८ धरणांपैकी १९ धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागली आहेत. यामध्ये रोहा तालुक्यातील सुतारवाडी, म्हसळा तालुक्यातील पाभरे व संदेरी, खालापूर तालुक्यातील कलोते-मोकाशी, भिलवले, महाड तालुक्यातील खिडवाडी, कोथुर्डे, वरंध आणि खैरे, सुधागड तालुक्यातील घोटवडे, कोंडगाव, कवळे आणि उन्हेरे, मुरुड तालुक्यातील फणसाड, पनवेल तालुक्यातील मोरबे, उसरंग आणि डोणवत, तळा तालुक्यातील वावा, तर श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी या धरणांचा समावेश आहे.

नागोठण्यात पुन्हा पूर
नागोठणे : मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासून अंबा नदीचे पाणी शहरात घुसल्याने एसटी बसस्थानक, कोळीवाडा, शिवाजी चौक आदी ठिकाणच्या सखल भागात पुराचे पाणी वाढले. दुपारी तीननंतर नागोठणे शहरातील पुराच्या पाण्याची पातळी वाढण्याचे संदेश आल्यानंतर तलाठी सजाचे अनंत म्हात्रे यांनी नागोठणे ग्रामपंचायतीला कळविल्यानंतर ग्रामपंचायतीकडून शहरात दवंडी देण्यात येऊन नागरिकांना सावध करण्यात आले. सायंकाळी सहापर्यंत पुराच्या पाण्याची स्थिती स्थिर असली तरी, धरणाचे पाणी सोडण्याची शक्यता असल्याने शहरात पुराचे पाणी आणखी वाढू शकेल, असे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले.

झाड कोसळल्याने नुकसान
महाड : शहरातील भाजी मंडई परिसरातील झाड कोसळून दोन दुकानांसह एक कार व एका दुचाकीचे नुकसान झाले, यात दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. वीजवाहिन्याही तुटल्या आहेत. मंडल अधिकारी के. बी. तिरमळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे केले. महावितरणचे कनिष्ठ अभियंता के. बी. शिंदे यांनी तांत्रिक कर्मचाºयांसह घटनास्थळी धाव घेऊन विद्युतपुरवठा खंडित केला. त्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत केली.

आंबेनळी घाटात
दगड रस्त्यावर
पोलादपूर : पोलादपूर- महाबळेश्वर राज्य मार्गावर पोलादपूरपासून सुमारे १०.६०० किमी अंतरावर पायटे गावाजवळ आंबेनळी घाटात सोमवारी सकाळी मोठे दगड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंत्यांनी घटनास्थळी धाव घेऊन राज्य मार्गावर आलेले दगड, माती जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

राजपुरीत दरड कोसळण्याचा धोका
आगरदांडा : मुरु ड तालुक्यातील राजपुरी जंजिरा किल्ल्यावर जाताना डोंगरी गावालगत असलेल्या डोंगरावर मोठमोठे दगड असून मातीची धूप झाल्यावर खाली येत आहेत. डोंगरालगत नवानगर गाव असून येथील ग्रामस्थांवर सध्या जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आली आहे. शनिवारी मुरु ड तालुक्यात ९८ मिलीमीटर एवढा पाऊस तर रविवारी २२० मिलीमीटर एवढा पाऊस पडला. या डोंगरावरील लाल माती रस्त्यावर वाहून येत आहे. धूप होत असल्याने मोठमोठे दगड रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

झाड पडल्याने वाहतूक ठप्प
खोपोली : मुसळधार पावसामुळे मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर शहरातील लायन्स गार्डनजवळील मोठा वृक्ष उन्मळला. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक दीड ते दोन तास ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे विशेषत: विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले.
गेले तीन-चार दिवस पावसाने कहर माजवला असून सखल भागात पाणी साचले होते. अनेक भागात झाडे पडल्याचे वृत्त आहे. लायन्स गार्डनजवळील झाड बाजूला केल्यानंतर, हायको या बंद कारखान्याच्या आवारातील एक मोठा वृक्ष कोलमडल्याने पुण्याला जाणारा व मुंबईला जाणारा मार्ग रोखला गेल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली. कामावर जाणारे व शाळकरी मुले वाहनात अडकून पडले. अनेक वाहने वासरंग मार्गे विहारी गावाकडे वळविल्याने तांबडी वसाहतीजवळ ही वाहतूककोंडी झाली. खोपोली गावाकडे येणारे सर्व मार्गच बंद झाले. दुपारनंतर वाहतूक पूर्ववत झाली.


पुलावर पाणी आल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ

कर्जत : तालुक्यातील गौळवाडी-मांडवणे रस्त्यावर असलेल्या कमी उंचीच्या पुलावरून एक तास पाऊस झाला तरी पाणी जाते. परिणामी त्या भागातील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन पाण्यातून गौळवाडी माध्यमिक शाळेत जातात. दरम्यान, पुलाच्या पलीकडे असलेल्या किमान १० गावातील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात अशी कसरत करावी लागत असल्याने त्यांच्या जीवास धोका असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
टाटा कॅम्पच्या रस्त्याने गौळवाडी गावातून आंबोट, मांडवणे आणि हुमगावकडे जाणारा रस्ता वळतो. त्या रस्त्यावर अनेक वर्षे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रायगड जिल्हा परिषद यांनी निधी खर्च केला नाही. त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे झाले आहे. असे असताना तेथे असलेला लहान पुलामुळे स्थानिकांना पावसाळ्यात येणे-जाणे कठीण होते.
पावसाचा जोर वाढल्याने गौळवाडी येथे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. आंबोट, वैजनाथ, हुमगाव, भिवपुरी, पाली, पोटल, पोटलवाडी, कोळंबेवाडा या गावातून येणारे विद्यार्थी यांचे रस्ता ओलांडताना हात होतात.त्यामुळे पाचवी ते सातवीपर्यंत शिकणारी मुले यांना शाळेत न जाता परत घरी परतावे लागते. काही मोठी मुले पुलावरून पाणी ओसंडून जात असताना देखील पूल पार करतात.

Web Title: Rainfall in Raigad district is continuously, 19 dams overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.