आदिवासी शेतमजुरांचा सामूहिक शेतीचा आदर्श, कोकणातील माणगावात उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 10:48 AM2018-03-22T10:48:14+5:302018-03-22T11:03:28+5:30

शेतमजूर म्हटलं की स्थलांतर हे ओघानंच आलं. वर्षातील किमान ५ महिने उदरनिर्वाहासाठी या शेतमजुरांना आपली गावं सोडून बाहेर जावंच लागतं.

Model of Ideal community farming of Mangaon's farmer in Konkan | आदिवासी शेतमजुरांचा सामूहिक शेतीचा आदर्श, कोकणातील माणगावात उपक्रम

आदिवासी शेतमजुरांचा सामूहिक शेतीचा आदर्श, कोकणातील माणगावात उपक्रम

Next

राहुल रनाळकर

मुंबई : शेतमजूर म्हटलं की स्थलांतर हे ओघानंच आलं. वर्षातील किमान ५ महिने उदरनिर्वाहासाठी या शेतमजुरांना आपली गावं सोडून बाहेर जावंच लागतं. या सगळ्यात मुलांच्या शाळा सुटतात; महिलांचेही अतोनात हाल होतात. तथापि, कोकणातील माणगावच्या शेतमजुरांनी सामूहिक शेतीचा मार्ग निवडत हे सक्तीचे स्थलांतर रोखले आहे. सध्या या शेतमजुरांच्या समूहावर संपूर्ण कोकणातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  इंदापूरपासून जवळ असलेल्या निवी मुठवली येथील आदिवासी वाडीवर हा प्रयोग गेल्या तीन वर्षांपासून सुरु आहे. या आदिवासी शेतमजूर कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी मिळून सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला. माणगाव येथील सर्वविकास दीप या संस्थेच्या माध्यमातून या आदिवासी शेतमजुरांना दिलेलं मार्गदर्शन सामूहिक शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरलं.

तीन वर्षांपासून माणगावमधील काही भूमिहीन शेतक-यांना वर्षभर रोजीरोटी मिळावी, यासाठी ही संस्था कार्यरत आहे. ज्या जमिनींवर साधारण नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत किंवा डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत भात पिक घेतलं जातं, त्या जमिनी नंतर मेपर्यंत पिकाविना पडून असतात. अशा जमीन मालकांशी संस्थेच्या पुढाकारानं या शेतमजुरांच्या समूहानं करार केले. त्यानंतर डिसेंबर ते मेपर्यंतच्या काळात या जमिनीवर कारली, कलिंगड, भाज्या अशी उत्पादने घेण्यात आली. गेल्या वर्षी ४ टन कारली तर ३ टन कलिंगडांचे उत्पादन या शेतमजुरांनी घेतलं. संस्थेच्या माध्यमातूनच वाशीतील व्यापा-यांशी बोलणी करुन उत्पादीत झालेला हा माल मुंबईत आणण्यात आला. स्थानिक पातळीवर उपजिविका निर्माण झाल्याने या शेतमजूरांचे स्थलांतर थांबले. मुलांच्या शाळा नियमित राहिल्या; घरातील महिलांचीही ससेहोलपट थांबली. शिवाय संपूर्ण कुटुंबाला चांगले उत्पन्न मिळू लागले.

रोहा कृषी महाविद्यालयातून मोफत बियाणे मिळवून देण्यात संस्थेला यश आलं. या आदिवासी शेतमजुरांच्या बचत गटाने गेल्या वर्षी तब्बल साडेसात ते आठ लाखांचा फायदा मिळविला. प्रत्येक कुटुंबाला साधारण ३ ते ४ महिन्याच्या कालावधीत एक लाखाचे उत्पन्न मिळाले. शेती करताना सेंद्रीय खतांचा अधिकाधिक वापर केला जातो. या बचतगटातील शेतमजुरांना बायो-कंपोस्ट खत वापरण्याचे तंत्र शिकविले जाते. सल्फेटसारखे कमी रसायने असलेले खत वापरण्यासाठीही संस्थेच्या माध्यमातून प्रवृत्त केले जाते. डिसेंबर ते मे या काळात बचत गटातील शेतमजूर हे पिकाचे मालक असतात, एकदा का पिक काढले गेले की ते पुन्हा पुढच्या हंगामासाठी भात शेतीसाठी काम करु लागतात.  सध्या बचतगटाच्या माध्यमातून १८ कुटुंबातील शेतमजूर १२ एकर शेतीवर हा सामूहिक शेतीचा प्रयोग करत आहेत. 
 
कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्याचे लक्ष्य
सर्वविकास दीप संस्थेची २० सदस्यांची टीम आहे. दहा वर्षांपासून आम्ही माणगावमध्ये कार्यरत आहोत. आमच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या बचत गटातील प्रत्येक कुटुंबाला सध्या एक लाखाचे उत्पन्न मिळते. पण आम्ही एवढ्यावर नक्कीच समाधानी नाही. या कुटुंबांचे उत्पन्न दीड ते दोन लाखांपर्यंत नेण्याचे आमचे लक्ष्य आहे.  -रिची (भाऊ) माणगावकर, सर्वविकास दीप संस्था


 

Web Title: Model of Ideal community farming of Mangaon's farmer in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी