आर्थिक प्रगतीसाठी सीमेवर शांतता हवी - डेव्हिड. आर. सिमेलेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 03:22 AM2017-11-30T03:22:14+5:302017-11-30T03:22:41+5:30

आर्थिक विकास साधायचा असेल, तर देशाच्या सीमांवर शांतता असणे गरजेचे असते. यासाठी सैन्यदल महत्त्वाची भूमिका बजावत असतात. संपूर्ण जगात भारतीय लष्कराची शिस्तबद्ध लष्कर म्हणून ओळख आहे.

 Seek peace over the border for economic progress - David R. Symeleh | आर्थिक प्रगतीसाठी सीमेवर शांतता हवी - डेव्हिड. आर. सिमेलेह

आर्थिक प्रगतीसाठी सीमेवर शांतता हवी - डेव्हिड. आर. सिमेलेह

googlenewsNext

पुणे : आर्थिक विकास साधायचा असेल, तर देशाच्या सीमांवर शांतता असणे गरजेचे असते. यासाठी सैन्यदल महत्त्वाची भूमिका बजावत असतात. संपूर्ण जगात भारतीय लष्कराची शिस्तबद्ध लष्कर म्हणून ओळख आहे. बदलत्या काळानुसार नवी आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करा, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डेव्हिड. आर. सिमेलेह यांनी केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)चा १३३व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ एनडीएच्या हबिबुल्ला सभागृहात उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिमेलेह बोलत होते. या प्रसंगी एनडीएचे कमांडंट एयर मार्शल जसजितसिंग कलेर, प्रबोधिनीचे उपप्रमुख रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला, प्राध्यापक, प्रशिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी बॅचलर आॅफ सायन्स विभागातील कमांडंट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ आर्मी स्टाफ ट्रॉफीचा मानकरी गुरुवंशसिंग गोसाल ठरला. बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स विभागातील कमांडंट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ नेव्हल स्टाफ ट्रॉफीचा मानकरी अनमोल अग्रहरी तर कला शाखेतील कमांडंट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ एअर स्टाफचा मानकरी राहुल बिष्ट ठरला. तिघांनाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ट्रॉफी देण्यात आल्या.
सिमेलेह म्हणाले, ‘‘जागतिक पातळीवर अनेक बदल आज होत आहेत. आर्थिक विकासासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. मात्र, सीमेवर शांतता असल्यास आर्थिक विकास वेगाने साधता येतो. ही शांतता राखण्यासाठी सैन्यदले महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतीय लष्कराला प्रतिष्ठा आहे. देशाच्या कानाकोपºयातून मोठी चाळणी पार करून विद्यार्थी येथे दाखल झाले आहेत. भविष्यात लष्करी तंत्रज्ञानात मोठे बदल होणार आहेत. यामुळे येणारा काळ हा आव्हाहनांचा असेल. यासाठी नवे बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा, नवी कौशल्ये आत्मसात करून स्वत:ला सिद्ध करा.’’
जसजितसिंग कलेर म्हणाले, ‘‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संपूर्ण जगातील लष्करी सेवेसाठी अधिकारी तयार करणारी मानाची संस्था आहे. आतापर्यंत देशाच्या तिन्ही दलांना जवळपास ३६ हजार अधिकारी दिले आहेत. जवळपास ३० लष्करप्रमुख दिले आहेत. या ठिकाणी मिळणारे प्रशिक्षण अति उच्च दर्जाचे आहे. विद्यार्थ्यांनी ३ वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आता भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.’’
प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्ला यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर, प्रबोधिनीचे उपप्रमुख रिअर अ‍ॅडमिरल एस. के. ग्रेवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

२५० विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनिच्या १३३व्या तुकडीतील २५० विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी बहाल करण्यात आली. यात बॅचलर आॅफ सायन्सचे ५६, बॅचलर आॅफ कॉम्प्युटर सायन्सचे १४६ आणि बॅचलर आॅफ आर्ट्सच्या ४८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या वेळी विद्यार्थ्यांचे पालक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ३ वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून हे सर्व विद्यार्थी पायदळ, वायुदल तसेच नौदलात सेवा बजावण्यासाठी सिद्ध झाले.

आज रंगणार संचलन सोहळा
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३३व्या तुकडीचा संचलन सोहळा पार पडणार आहे. यानंतर हे विद्यार्थी पुढील लष्करी शिक्षणासाठी एनडीएतून बाहेर पडतील.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून किरगीझ रिपब्लिकचे लष्करप्रमुख रेमबेरडी दुशेनबीएव्ह उपस्थित राहणार आहेत. सूर्यकिरण या विमानांचे प्रात्यक्षिक हे या सोहळ्याचे आकर्षण असेल.

तीन वर्षांचा काळ आव्हानात्मक

लहानपणापासून लष्करात दाखल होण्याचे स्वप्न होते. आज ते पूर्ण झाले आहे. एनडीएतील तीन वर्षे खूप आव्हानात्मक होती. सकाळी उठल्यापासून ते दिवस संपेपर्यंत रोज नव्या आव्हानांना सामोरे जावे लागत होते. मात्र, प्रशिक्षणादरम्यान सोबत असलेल्या मित्रांमुळे ही आव्हानांना सामोरे जाऊ शकलो, असे बॅचलर आॅफ सायन्स विभागातील कमांडंट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ आर्मी स्टाफ ट्रॉफीचा मानकरी गुरुवंशसिंग गोसाल याने सांगितले. गुरुवंश हा पंजाबमधील उपनगर येथील आहे. त्याचे वडील कृषी विभागात अधिकारी आहेत. लष्कराची घरात कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्याने हे यश मिळविले आहे. लष्करात आघाडीवर काम करायचे आहे. जम्मू-काश्मीर तसेच देशांच्या विविध सीमांवर जवानांची आज गरज आहे. यासाठी पायदळात दाखल होण्याचा निर्णय घेतल्याचे गोसाल याने सांगितले.

व्यक्तिमत्त्वात मोठा बदल

एनडीएत तीन वर्षांत मिळलेल्या प्रशिक्षणादरम्यान खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. शिस्त, अनुशासन आणि वक्तशीरपणा यामुळे व्यक्तिमत्त्वात मोठा बदल झाल्याचे कला शाखेतील कमांडंट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ एअर स्टाफचा मानकरी राहुल बिष्ट याने सांगितले. देशात दहशतवादाचा प्रश्न गंभीर आहे. तसेच, सीमेवर शत्रुराष्ट्राकडून कुरापती काढल्या जातात. या आव्हानाला तोंड देण्यासाठी लष्करात जाण्याचा निर्णय राहुलने घेतला आहे. राहुल बिष्ट हा मूळचा देहरादूनचा आहे. त्याचे वडील निवृत्त आॅनररी कॅप्टन असून लष्करात दाखल होण्याचे बाळकडू त्याला त्याच्या वडिलांकडून मिळाले आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत शिकण्याचे स्वप्न पूर्ण

भारतीय लष्कराचे लहानपणापासून आकर्षण होते. बाबा नौदलात अधिकारी असल्याने त्यांना पाहून लष्करात जाण्याची इच्छा प्रबळ झाली होती. लष्करी शिक्षण हे एनडीएतून घेण्याचे माझे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले आहे, असे बीएस्सी कॉप्म्युटर सायन्स विभागातील कमांडंट सिल्व्हर मेडल आणि चिफ आॅफ नेव्हल स्टाफ ट्रॉफीचा मानकरी अनमोल अग्रहरी
याने सांगितले. अनमोल हा मध्य प्रदेशातील जबलपूर येथील आहे. तीन वर्षांच्या काळात सांघिक जीवन आणि शिस्त या गोष्टी अंगीभूत झाल्या. भविष्यात नौदलात नेव्हीगेशन क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले.

Web Title:  Seek peace over the border for economic progress - David R. Symeleh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.