‘जीवितनदी’कडून पाणथळ प्रदेशाचे संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:31 AM2019-02-04T03:31:32+5:302019-02-04T03:31:53+5:30

मुठा नदीकाठी असलेल्या पाणथळ जमिनींचे संरक्षण करण्यासाठी जीवितनदी संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला असून, त्यावर ते गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहेत.

Conservation of the wetlands from 'Jivatnadi' | ‘जीवितनदी’कडून पाणथळ प्रदेशाचे संवर्धन

‘जीवितनदी’कडून पाणथळ प्रदेशाचे संवर्धन

Next

पुणे - मुठा नदीकाठी असलेल्या पाणथळ जमिनींचे संरक्षण करण्यासाठी जीवितनदी संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला असून, त्यावर ते गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहेत. विठ्ठलवाडी येथील चार ठिकाणी पाणथळ जमिनीवर त्यांनी काम केले असून, अजून तीन ठिकाणी तसे प्रदेश आढळून आले आहेत. या प्रदेशांचे संवर्धन होण्यासाठी त्यांना हेरिटेज घोषित करावे अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे, असे जीवित नदीच्या अदिती देवधर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस वेटलँड्स डे म्हणून साजरा केला जातो. १९९७ पासून जगात हा दिन साजरा होतो. या दिनानिमित्त जीवितनदी संस्थेकडून या जमिनी संरक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यावर ते गेल्या अनके वर्षांपासून काम करीत आहते. खरंतर मुठा नदीकाठी सिमेंटचे बांधकाम झाल्याने त्या ठिकाणच्या सर्व पाणथळ जमिनी नष्ट झाल्या आहेत. तसेच त्या या सिमेंटच्या भिंतीमुळे निर्माण होऊ शकत नाहीत. तरी देखील काही भागात अशा पाणथळ जमिनी आहेत. त्या संरक्षित करणे आवश्यक आहे. बगळे, बदके, करकोचे, खंड्या तसेच शिकारी प्रजातींच्या व इतरही अनेक पक्ष्यांना पाणथळ प्रदेशांतूनच अधिवास मिळतो. प्लवरसारख्या विशिष्ट प्रजातींची घरटी पाणथळ प्रदेशांत आढळतात. करकोचे, शराटी (इबिस), चमचा, रोहित (फ्लेमिंगो) हे पक्षीही पाणथळ जागीच येतात. अगदी सायबेरियासारख्या प्रदेशांतूनही क्रेन आणि बदके इथे येतात. कारण इथे त्यांना अन्न मिळते. हे पक्षी या प्रदेशातील अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा दुवा आहेत.

जीवितनदीकडून संरक्षणासाठी काम

प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वैयक्तिक पातळीवरसुद्धा पाणथळ प्रदेश वाचविण्याचा प्रयत्न केला तरी या दिशेने एक ठोस पाऊल उचलले जाऊ शकते, असे काम जीवितनदी करीत आहे.

अदिती देवधर यांनी आणि त्यांच्या टीमने यासाठी काम सुरू केलेले आहे. या टीमने पाणथळ जागा शोधून तिथे ते संरक्षित करण्यासाठी प्रत्येक रविवारी काम सुरू केले आहे.

पाणथळ प्रदेश म्हणजे काय?

नदी, तलाव, सागरी किनारे अशा ठिकाणी काठावर उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या जमिनीला पाणथळ म्हटले जाते. यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्सशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो. या पाणथळ जमिनीत अनेक जीवजंतूंची परिसंस्थाच असल्याचे दिसते. या जीवजंतूंवरच अनेक पक्षी आपले अन्न शोधतात.

पाणथळ प्रदेशाचा उपयोग

पाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पती प्रदूषित पाणी व इतर हानिकारक द्रव्ये गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात.
सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किनाºयांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते.

शिवाय समुद्राचे आक्रमण थोपवून किनारी जमीन अतिक्षारयुक्त (निरुपयोगी खारपड) होण्याची क्रियाही तेथील मॅनग्रुव (खारफुटी) प्रकारच्या झुडपांमुळे कमी होते.

नदीला पूर आल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यासही हे जास्तीचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशात मुरते व मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते.

नदीकाठी पाणथळ जमिनी असणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही गेल्या वर्षी राजाराम पुलालगत असलेल्या एका पाणथळ जमिनीवर काम केले होते. अशा पाणथळ जमिनी मार्क करून त्यांना संरक्षित केले पाहिजे. कारण त्या पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहेत. जैवविविधता अहवालात आम्ही गेल्या वर्षी या जमिनी मार्क करून संरक्षित कराव्यात, असे लिहिले होते.
- पुर्णिमा आगरकर,
पर्यावरण अभ्यासक

Web Title: Conservation of the wetlands from 'Jivatnadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.