वाहतुक नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणा : सौरभ राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 08:36 PM2018-05-07T20:36:51+5:302018-05-07T20:36:51+5:30

आॅटोमॅटिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून सिग्नल यंत्रणा नियंत्रित करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे.

Automatic arrangement for traffic control : Saurabh Rao | वाहतुक नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणा : सौरभ राव

वाहतुक नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणा : सौरभ राव

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतुक प्रश्नाबाबत प्रत्येकाने संवेदनशील व्हायला हवे वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर काम सुरू वाहने कमी करण्यासाठी पीएमपीला सक्षम करणे आवश्यकउन्हामध्ये रस्त्यावर उभे राहून वाहतुक नियमन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना कुलिंग जॅकेट व टोपी

पुणे : केवळ रस्ता सुरक्षा अभियान किंवा शासनाकडून विविध उपाययोजना करूनही रस्त्यावरील अपघात कमी होणार नाहीत. त्यासाठी वाहनचालकांनाही स्वयंशिस्त लावून घेत वाहतुक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. स्वयंशिस्तीतूनच अपघात मुक्तीकडे जाता येईल, असे आवाहन रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोपप्रसंगी करण्यात आले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग व पोलीस विभागाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचा सोमवारी समारोप झाला. त्यानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे व अमर साबळे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पालिका आयुक्त सौरभ राव, सहपोलीस आयुक्त रविंद्र कदम, वाहतुक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत व्यासपीठावर उपस्थित होते. वाहतुक विषयक जनजागृती, वाहतुक नियमन, पोलिसांना विविध प्रकारे मदत करणाऱ्या विविध संस्था व नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल काही पोलिस कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.
शिरोळे म्हणाले, ‘वाहतुक प्रश्नाबाबत प्रत्येकाने संवेदनशील व्हायला हवे. स्वयंशिस्त पाळून एकजुटीने काम केल्यास अपघात नक्कीच कमी होतील. त्यासाठी स्वत:पासून सुरूवात करायला हवी.’ साबळे यांनी अपघात कमी होण्यासाठी लोकसंख्येवर नियंत्रण मिळविणे आवश्यक असल्याचे सांगितले. वाहनचालकांनी शिस्त पाळल्यास अपघात मुक्ती होऊ शकते. त्यासाठी वाहतुकीचा बृहत आराखडा तयार करावा. खासदार निधीतून पैसे उपलब्ध करून देऊ, असे साबळे यांनी सांगितले.
शहरात दररोज शेकडो वाहनांची नोंदणी होतेय. सध्या उपलब्ध जागेचा विचार करायला हवा. वाढणाऱ्या वाहनांना शिस्त कशी व कोण लावणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन शुल्का यांनी केले. रस्ता सुरक्षा सप्ताहापुरता मर्यादीत न राहता त्याची चळवळ उभी राहायला हवी. हॉर्नचा वापर कमी करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली असून जनजागृतीचे १ लाख बँन्ड तयार करण्यात आल्याचे आजरी यांनी सांगितले.
.........
आॅटोमॅटिक ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून सिग्नल यंत्रणा नियंत्रित करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर काम सुरू आहे, अशी माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. तसेच वाहने कमी करण्यासाठी पीएमपीला सक्षम करणे आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले.
...................
पोलिसांना कुल जॅकेट व टोपी
उन्हामध्ये रस्त्यावर उभे राहून वाहतुक नियमन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना कुलिंग जॅकेट व टोपी दिली जाणार आहे. सोमवारी कार्यक्रमामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात काही कर्मचाऱ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. हे जॅकेट व टोपी घातल्यानंतर बाहेरील तापमानापेक्षा शरीराला ६ ते ८ अंश सेल्सिअसने उन्हाच्या झळा कमी बसतात. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या संकल्पनेतून ही जॅकेट देण्यात आली असून सौरभ राव यांनी आणखी ५०० जॅकेट देण्याची घोषणा यावेळी केली.

Web Title: Automatic arrangement for traffic control : Saurabh Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.