Lok Sabha Election 2019: आंबेडकरांची जादू किती चालणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 02:22 AM2019-03-13T02:22:06+5:302019-03-26T08:23:59+5:30

गेल्या निवडणुकीत २३ पैकी २२ जागांवर अनामत जप्त; नव्या समीकरणांच्या आधारावर यावर्षी विजयाचे स्वप्नरंजन

Lok Sabha Election 2019: How Ambedkar's magic will run? | Lok Sabha Election 2019: आंबेडकरांची जादू किती चालणार ?

Lok Sabha Election 2019: आंबेडकरांची जादू किती चालणार ?

Next

- राजेश शेगोकार 

अकोला : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांची वंचित बहूजन आघाडीचा डाव मांडला असून त्यामध्ये ‘एमआयएम’ ला सोबत घेतल्यामुळे यावेळी अनेकांची समिकरणे बिघडवितांनाच विजयाचा आशावाद त्यांच्या ठायी आहे. या पृष्ठभूमीवर गेल्या निवडणुकीचा मागोवा घेतला असता समोर येणारी आकडेवारी त्यांच्या आशावादावर शंका उभी करते. भारिप-बहुजन महासंघाच्या वतिने गेल्यावेळी २३ जागा लढविल्या होत्या त्यापैकी एकाही जागेवर विजय मिळविता आलाच नाही मात्र २२ उमेदवारांची अमानतही जप्त झाली होती हे पाहता यावेळी आंबेडकरांची जादू चालणार तरी किती ?

अ‍ॅड. आंबेडकरांच्या 'सामाजिक अभियांत्रिकी’च्या प्रयोगाचे राजकीय नाव म्हणजे 'भारिप-बहूजन महासंघ'. १९९० ते २००४ पर्यंत या प्रयोगाने सुवर्णकाळ अनुभवला असं म्हणता येईल. यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांकडे दोन 'हूकुमी एक्के' होते. यातील एक म्हणजे आंबेडकर' हे ब्रांडनेम. तर दुसरे म्हणजे स्वत:च्या दलित समाजासोबत अठरापगड जातींची बांधलेली मोट. मात्र गेल्या काही वर्षात त्यांना सेटबॅक बसला आहे. स्वत: अ‍ॅड.आंबेडकर हे १९९९ नंतर सलग तीनदा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांना दोनदा मिळालेला विजय हा केवळ काँग्रेस सोबत आघाडी केल्यामुळेच मिळाला होता. त्यामुळे भाजपाचा वाढता प्रभाव लक्षात घेता यावेळी ते काँग्रेस आघाडीत सहभागी होतील अशी शक्यता होती मात्र ती आता संपली आहे त्यामुळे आंबेडकरांची वंचित बहूजन आघाडी किती मतदारसंघात प्रभाव टाकू शकते याची गणीते मांडली जात आहे. आंबेडकरांची राजकीय राजधानी असलेल्या अकोल्यात १९९८ व १९९९ या दोन निवडणुकीचा अपवाद वगळता सहा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला त्यापैकी चार वेळा त्यांना तृतीय स्थानावर राहावे लागले काँगेस दुसऱ्या क्रमांकावरच राहिली.गेल्या निवडणुकीत मोदी लाटेतही काँग्रेसच्या उमेदवाराने आंबेडकरांपेक्षाही जास्त मते घेतली. बुलडाणा, यवतमाळ-वाशिम, अमरावती अशा त्यांच्या थेट प्रभाव असलेल्या मतदारसंघातही आंबेडकरांच्या पक्षाला अमानत वाचविता आली नाही. राज्यातील एकूण २३ जागा लढविल्यावर ३ लाख ६० ८५४ मते त्यांच्या उमेदवारांना मिळाली त्यामध्ये एकटया आंबेडकरांना २ लाख ३८ हजार ७७६ मते होती.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या २०१८ मधील पोटनिवडणूकीतही त्यांच्या उमेदवाराला केवळ ४० हजार ३२६ मतांवर थांबावे लागले. तेथे केवळ ४.२५ टक्केच मते त्यांच्या वाटयाला आली. या ताज्या पराभवाची आकडेवारीही त्यांच्या पक्षाची ताकद अधोरेखीत करते. आंबेडकरांच्या पराभवमध्ये मुस्लीम मतांच्या वजाबाकीचे मोठा वाटा आहे. नेमक्या याच मुद्यामुळे मुस्लीम मते आपल्या कडे वळविण्यासाठी यावेळी अ‍ॅड. आंबेडकरांनी मुस्लीम-ओबीसी जागर सुरू केला होता.

अकोला पॅटर्नला सुर्वणकाळ देईल
वरवर पाहता हा निर्णय आंबेडकरांसाठी फायदेशीर ठरणारा दिसत असला तरी प्रत्यक्षात त्यांच्यामुळे होणारे मतांचे विभाजन हे भाजपा-सेना युतीला फायदेशीर ठरत असल्याचे आकडे सांगतात. एमआयएमची ताकद मराठवाडयात आहे असे मानले तर तिथे एमआयएम सारख्या कडव्या विचाराच्या पक्षाला सोबत घेतल्याने अ‍ॅड.आंबेडकरांच्या सोशल इंजिनिअरिंगमधील ओबीसीचे काही घटक दूरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अ‍ॅड.आंबेडकरांची हा नवा ‘प्रयोग’ अकोला पॅर्टनला सुर्वणकाळ देईल की ‘गाजराची पुंगी’ ठरेल हे येणारा काळच ठरवेल.

सवाल-जवाब
भाजपसोबत तुमचं साटंलोटं झालंय का?
आंबेडकर : संपूर्ण राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही जिंकण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे त्यांच्याशी आमची लढत नाहीच. आमची खरी लढत ही भाजपा-शिवसेनेसोबतच आहे. छुप्या युतीचा प्रश्नच नाही. निवडणुकीनंतरही सरकार स्थापनेसंदर्भात आमचे सहकार्य हे धर्मनिरपेक्ष पक्षांनाच असेल. त्यामुळे आमची आघाडी भाजपा, सेनेला पुरक नाही.
२२ जागांची मागणी
अवास्तव नाही का?
आंबेडकर : आमची मागणी अवाजवी मुळीच नाही. आम्ही २२ जागा मागितल्या कारण काँग्रेसकडे उमेदवारांचीच वानवा आहे. विदर्भाचाच विचार केला तर नागपूर, चंद्रपूर, अमरावती, बुलडाणा या मतदारसंघात काँग्रेसकडे उमेदवार नाहीत. शिवाय, ज्या जागांची आम्ही मागणी केली आहे, त्या ठिकाणी काँग्रेस गेल्या तीन निवडणुकांपासून सातत्याने पराभूत होत आहे.
शेट्टींना सोबत घेणार?
आंबेडकर : काँग्रेस महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रवेशही जागा वाटपाच्या मुद्यावर अडला आहे, हे खरे आहे. राजू शेट्टी यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत यावे, असा प्रस्ताव दिला होता. मात्र, काँग्रेस आघाडी हीच ‘चॉईस’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

भारिप-बहुजन महासंघाची कामगिरी
२०१४ लोकसभा
२३ उमेदवार (पैकी २२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त)
मिळालेली मते- 360854(०.४५ टक्के)

२०१४ विधानसभा
७० उमेदवार (पैकी ६२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त)
मिळालेली मते- 472625 (२ आमदार)

Web Title: Lok Sabha Election 2019: How Ambedkar's magic will run?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.