ही आहे भारतातील सर्वात स्वच्छ नदी, काचेसारखं पारदर्शक आहे इथलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 02:13 PM2018-11-19T14:13:28+5:302018-11-19T14:24:11+5:30

वाढत्या शहरीकरणामुळे नद्यांचे होणारे प्रदूषण ही भारतामधील गंभीर बाब बनली आहे. मात्र आजही देशात एक अशी नदी आहे जी अद्यापतरी प्रदूषणापासून दूर आहे. तसेच या नदीतील पाणी काचेसारखे पारदर्शक आहे.

उमगोट असे या नदीचे नाव असून, ती मेघालयची राजधानी असलेल्या शिलाँगपासून 95 किमी अंतरावर आहे.

या नदीतील पाणी एवढे स्वच्छ आहे की त्यामध्ये धुळीचा एकही कण दिसून येत नाही. तसेच पारदर्शक पाण्यामुळे नदीचा तळही स्पष्टपणे नजरेस पडतो.

काचेसारख्या पारदर्शक स्वच्छ पाण्यामुळे या नदीमधून होडीतून प्रवास करताना आपण काचेवरूनच जातोय की काय असा भास होतो.

भारत आणि बांगलादेश अशा दोन देशातून वाहणाऱ्या या नदीच्या आसपासचा परिसरही निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.

या सुंदर नदीवर ब्रिटिशांनी एक पूल उभारला होता. मात्र आजही इथे येणाऱ्या पर्यटकांना नदीमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वच्छता पसरवू नये अशी सक्त ताकीद दिली जाते.