PHOTOS: गाळ अन् चिखलात पाय रोवून लढा देतोय...पुन्हा नव्यानं उभं राहण्यासाठी राबतोय कोकणी माणूस!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 04:07 PM2021-07-26T16:07:22+5:302021-07-26T16:19:38+5:30

Chiplun Flood: रत्नागिरीत चिपळूण, खेडला पुराच्या पाण्यानं दिलेला वेढा आता संपुष्टात आलाय पण मागे राहिल्यात त्या पुराच्या रौद्ररुपाच्या आठवणी...

पुराच्या हाहाकारानंतर चिपळुणात सर्वत्र चिखल अन् पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेला गाळ साचला आहे. पुराला मोठ्या हिमतीनं समोरं गेल्यानंतर चिपळूणकर आता हातात झाडू घेऊन सारंकाही पूर्ववत करण्यासाठी मेहनत घेतायत.

घराघरात, दुकानांत ढिगभर गाळ बाहेर काढणं आणि उद्ध्वस्त झालेलं सारंकाही पुन्हा उभारणं हे काही सोपं काम नाहीय. पण हे दिवस देखील निघून जातील या इच्छाशक्तीनं सारे चिपळूणकर जीवन पूर्ववत करण्याच्या कामाला लागलेत.

प्रत्येक चिपळूणकर एकमेकांच्या मदतीनं पुराच्या सर्व आठवणी पुसून टाकण्याच्या कामाला लागलेत. यात त्यांना अनेकांच्या मदतीचा देखील हातभार मिळतोय.

आधीच कोरोनाचं संकट त्यात पुरानं वेढलं अशा दुहेरी कोंडीत सापडलेले नागरिक खचून न जाता...डोळ्यातील अश्रू पुसून नव्यानं उभं राहण्यासाठी झटू लागलेत.

जे राहिलं ते आपलं आणि जे गेलं ते मेहनतीनं पुन्हा उभं करू असा निश्चिय करुन प्रत्येक जण काम करतोय.

आपलं घर आणि दुकानं तर स्वच्छ करणं झालंच, पण चिपळुणातील रस्त्यांवरच्या पुराच्या नकोशा आठवणी दूर करण्यासाठी नागरिक एकत्रितपणे मेहनत घेतायत.

अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यासोबत आलेला ३ ते ४ फूट चिखल आणि गाळ जमा झालाय. हे साफ करण्याचं मोठं आव्हान आज चिपळूणकरांसमोर आहे.

आपल्या नातेवाईंकांच्या मदतीसाठी काही जण मुंबई, ठाण्यासारख्या शहरातून देखील चिपळुणात येताना दिसत आहेत.