स्वत:ला जिवंत सिद्ध करण्यासाठी 102 वर्षांच्या वृद्धाने काढली वरात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 10:41 AM2022-09-09T10:41:00+5:302022-09-09T10:45:58+5:30

हरयाणात वृद्धापकाळातील पेन्शन कपातीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मात्र, सरकारकडून एकाही वृद्ध व्यक्तीची पेन्शन कपात केली नसल्याचा दावा केला जात आहे. रोहतकच्या गांधरा गावात राहणाऱ्या 102 वर्षीय दुलीचंद यांनी सरकार आणि प्रशासनाला आरसा दाखवण्याचे काम केले.

नवरदेवाच्या वेशात असलेले वृद्ध दुलीचंद बँड-बाजा-बारात घेऊन रथात बसून रोहतक जिल्हा मुख्यालयात पोहोचले. ही बाब जिल्हा प्रशासनाला कळताच खळबळ उडाली आणि हे प्रकरण सरकारी विभागातील अधिकाऱ्यांपासून ते भाजपच्या बड्या नेत्यांपर्यंत पोहोचले.

वयोवृद्ध दुलीचंद यांची मिरवणूक कॅनॉल रेस्ट हाऊसवर पोहोचली आणि भाजप नेते मनीष ग्रोवर यांच्याकडे त्यांचे पेन्शन का कापले, याचे उत्तर मागितले. मनीष ग्रोव्हर यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला, त्यानंतर फॅमिली आयडीचा मुद्दा सांगण्यात आला.

गेल्या 6 महिन्यांपासून वयोवृद्ध दुलीचंद व त्यांचे कुटुंबीय समाजकल्याण विभागाकडे चकरा मारत आहेत, मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. सामाजिक कार्यकर्ते नवीन जयहिंद यांनी आपल्या समर्थकांसह वृद्ध दुलीचंद यांना घेऊन कॅनॉल रेस्ट हाऊस गाठले आणि वृद्धांच्या पेन्शन कपातीवरून सरकारकडे जाब विचारला.

घटनास्थळी पोहोचलेले अतिरिक्त उपायुक्त महेंद्र पाल यांनी सांगितले की, कुटुंबातील फॅमिली आयडीमध्ये त्रुटी दूर करण्यात आली होती, त्यादरम्यान ही चूक झाली. वृद्ध दुलीचंद यांना मृत दाखवण्यात आले, त्यामुळे त्यांची पेन्शन बंद करण्यात आली होती. आता पुन्हा फॅमिली आयडीतील चूक सुधारली जाईल, त्यानंतर पेन्शन सुरू होईल.

दरम्यान, वृद्धांची पेन्शन लवकरच सुरू होईल आणि निष्काळजी कर्मचारी किंवा अधिकारी कोण असेल, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू. वृद्धांच्या पेन्शनमध्ये कपात करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही, ही चूक झाली आहे, ती सुधारली जाईल, असे आश्वासन माजी मंत्री आणि भाजपचे उपाध्यक्ष मनीष ग्रोव्हर यांनी दिले.