अविश्वास प्रस्तावाचा निर्णय INDIA वरच उलटला, PM मोदींना झाला मोठा फायदा? जाणून घ्या सर्व्हेत काय म्हणाले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 11:12 AM2023-08-13T11:12:27+5:302023-08-13T11:19:39+5:30

या अविश्वास प्रस्तावासंदर्भात लोकांना काय वाटते? कुणाला झाला सर्वाधिक फायदा? सर्व्हेत काय म्हणाले लोक? जाणून घ्या...

यावेळी संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैला गदारोळाने सुरू झाले आणि 11 ऑगस्टला गदरोळानेच संपले. या अधिवेशनात विरोधकांनी (I.N.D.I.A.) मोदी सरकार वरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. जो गुरुवारी अर्थात 10 ऑगस्टला पडला.

अधिवेशनादरम्यान आणल्या गेलेल्या या अविश्वास प्रस्तावावर चर्चेदरम्यान सत्ता धारी आणि विरोधकांच्या दिग्गज नेत्यांनी आपापले मुद्दे मांडत एक-मेकांवर जबरदस्त हल्ले प्रतिहल्ले केले.

यावेळी, विरोधकांनी सरकारला घेण्यासाठी जबरदस्त रणनीती आखली होती. तर सत्ताधाऱ्यांकडून अमित शाह, स्मृती इराणी सारख्या दिग्गज नेत्यांनी विरोधकांच्या हल्ल्यांना रोख-ठोक प्रत्युत्तर. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अविश्वास प्रस्तावावर चर्चेला उत्तर दिले आणि तब्बल 2 तास 13 मिनिटे भाषण केले.

मात्र, या अविश्वास प्रस्तावासंदर्भात लोकांना काय वाटते? कुणाला झाला सर्वाधिक फायदा? यासंदर्भात एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने एक ऑल इंडिया सर्व्हे केला आहे. तर जाणून घेऊयात काय सांगतो हा सर्व्हे? जनतेला काय वाटते?

अविश्वास प्रस्तावचा सर्वाधिक फायदा कुणाला झाला? या सर्व्हेत लोकांना विचारण्यात आले की, या अविश्वास प्रस्तावाचा सर्वाधिक फायदा कुणाला झाला. यावर, 40 टक्के लोक म्हणाले NDA, 13 टक्के लोकांनी सांगितले 'I.N.D.I.A.' आघाडी, 36 टक्के लोकांना वाटते कुणालाही या फायदा झाला नाही. तर 11 टक्के लोकांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

कोणत्या नेत्याला अधिक फायदा? - अविश्वास प्रस्तावाचा सर्वाधिक फायदा कोणत्या नेत्याला झाला, असा प्रश्न विचारला असता, 48 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, असे उत्तर दिले. 20 टक्के लोकांनी राहुल गांधी सांगितले. 6 टक्के लोकांनी अमित शाह उत्तर दिले. 5 टक्के लोकांनी इतरांना सांगितले. तर 21 टक्के लोकांनी कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही.

अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय किती बरोबर होता? या प्रश्नावर लोकांनी धक्कादायक उत्तर दिले. तब्बल 51 टक्के लोकानी विरोधकांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. 33 टक्के लोकांनी निर्णय योग्य होता असे म्हटले आहे. तर 16 टक्के लोकांनी कुठलेही उत्तर दिले नाही.

अविश्वास प्रस्तावावर झालेल्या भाषणांपैकी कुणाचे भाषण अधिक दमदार होते? यावर 46% लोकांनी नरेंद्र मोदी, 14% लोकांनी अमित शाह, 22% लोकांनी राहुल गांधी, 9% लोकांनी इतर तर 9% लोकांनी माहीत नाही असे उत्तर दिले.

राहुल गांधी यांनी 'भारत माते'संदर्भात केलेल्या वक्तव्यावर विचारले असता, 35% लोक म्हणाले योग्य, 56% लोकांनी चुकीचे सांगितले, 9% लोकांनी काहीही उत्तर दिले नाही.

राहुल गांधींनी फ्लाइंग किस देऊन संसदेचा अपमान केला? असे विचारले असता, 56% लोकांनी सांगीतले हो, 33% लोक म्हणाले नाही, तर 11% लोकांनी सांगितले माहीत नाही.

मणिपूरसंदर्भात सरकारच्या उत्तरावर लोक खूश आहेत? यासंदर्भात विचारले असता, 51% लोक म्हमाले हो, 38% लोक म्हणाले नाही. तर 11% लोक म्हणाले माहीत नाही.