Uddhav Thackeray vs Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या हातून धनुष्यबाण जाणार? सादीक अली प्रकरण एकनाथ शिंदेंच्या मदतीला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 10:00 AM2023-01-15T10:00:35+5:302023-01-15T10:06:47+5:30

१७ जानेवारीला निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. असे झाले तर उद्धव ठाकरेंसमोर नवीन संकट उभे ठाकणार आहे.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसांत शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा यावर निर्णय येईल. १७ जानेवारीला निवडणूक आयोगात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात अस्थिर वातावरण आहे. अशातच दोन्ही बाजुंनी झालेल्या युक्तीवादावर कायदेतज्ज्ञांचे एक मत बनले आहे. यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे दिसत आहे.

१७ जानेवारीला निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. असे झाले तर उद्धव ठाकरेंसमोर नवीन संकट उभे ठाकणार आहे. उद्धव ठाकरे कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यास तयार आहेत. ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी तसा दावा केला आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय 17 जानेवारीला येऊ शकतो. निवडणूक आयोगाकडून आमचे निवडणूक चिन्ह आम्हाला दिले जाईल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. तरीही विपरित निर्णय झाल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. या प्रकरणाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता आले तर आम्ही तिथे आव्हान देऊ. तसेच राष्ट्रपतींकडेही अर्ज करू, असे दुबे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे गटाने प्लॅन-बीची तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालय किंवा राष्ट्रपतींकडे अर्ज करण्यावर विचार केला जात आहे. निर्णय त्यांच्या विरोधात आल्यास नवीन निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावाची जबाबदारी जनतेवर सोपवली जाऊ शकते, असे नियोजनही केले जात आहे.

उद्धव ठाकरे गट आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि नाव तेच ठेवू शकतो, ज्याला जनता पाठिंबा देईल. निवडणूक आयोगाने सादिक अली प्रकरणाचा आधार घेतल्यास एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निर्णय होऊ शकतो, असे कायदा आणि घटना तज्ज्ञांचे म्हणणे आहे. निर्णय विरोधात आल्यास ठाकरे गटाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची महत्त्वपूर्ण सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुरू आहे. शिवसेनेच्या 16 उमेदवारांवर अपात्रतेच्या कारवाईसह राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराबाबत सुनावणीचे प्रकरणही प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टात 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. मात्र, याआधी शिवसेना कोणाची? त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह 55 पैकी 40 आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करून सात महिन्यांपूर्वी स्वत:चा गट स्थापन केला होता. शिंदे यांना दहा अपक्ष आमदारांचा देखील पाठिंबा आहे. बंडानंतर महाराष्ट्रात परतल्यानंतर शिंदेंनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली होती. ज्या 16 आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला अपात्र ठरवले होते. त्यात एकनाथ शिंदे यांच्या नावाचाही समावेश होता.