शिवसेना प्रत्येक वेळी शरद पवारांमुळेच फुटली; दीपक केसरकरांनी सांगितली पडद्यामागची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 12:16 PM2022-07-13T12:16:27+5:302022-07-13T12:34:04+5:30

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या बैठकीसाठी शिंदे गटाला आमंत्रण देण्यात आलं आणि यासाठी दीपक केसरकर सध्या दिल्लीत आहेत. यावेळी दीपक केसरकरांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत काही गौप्यस्फोट केले आहेत.

शिवसेना आजवर ज्या ज्या वेळी फुटली त्यामागे शरद पवारांचाच हात होता असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी एका घटनेचाही आवर्जुन उल्लेख केला. तसंच राष्ट्रवादीकडून राज्यात कसं शिवसेनेला संपवण्याचं कारस्थान सुरू आहे याची माहिती दिली.

'मातोश्री'नं कधी 'सिल्वर ओक'कडे धाव घेतल्याचं आजवर आपण पाहिलेलं नाही. पण उद्धव ठाकरेंभोवतीचे काही निवडक नेत्यांमुळे शरद पवार त्यांना सध्या जवळचे झाले आहेत. शरद पवार नक्कीच मोठे नेते आहेत. पण शिवसेनेचं राजकारण आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातच राहिलेलं आहे. अशा परिस्थितीत बाळासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा निर्णय आम्ही घेतला यात आमचं काही चुकलं असं आम्हाला वाटत नाही, असं दीपक केसरकर म्हणाले.

"चुकीच्या नेत्यांचं मार्गदर्शन पक्षप्रमुखांना मिळत आहेत. त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी असं पाऊल उचललं आहे असं म्हणता येईल. आम्ही आमदार एकत्र आलो आणि भाजपासोबत जाण्याची भूमिका घेतली. समजा हा लहानमुलांचा हट्ट असेल तर वडीलधाऱ्यांनी ऐकायला हवं होतं. इतकंच कशाला आम्ही लहान होतो तर ज्या खासदारांना १५-२० लाख लोक निवडून देतात त्यांचंही म्हणणं असंच असेल तर ते विचारात घेणं गरजेचं आहे", असं दीपक केसरकर म्हणाले.

"आमचा पक्ष संपतोय, आमची विचारधारा संपत आहे. मग आमच्या कुटुंबाच्या प्रमुखांनी निर्णय घेतला पाहिजे हा हट्ट लोकप्रतिनिधींनी धरला. ज्यावेळी संपूर्ण कुटुंब म्हणजेच अगदी शाखाप्रमुखापासूनचे लोक सांगतील की आम्हाला बाळासाहेबांच्या विचारांसोबत जायचं आहे. आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादी नको. त्यादिवशी कुटुंबप्रमुख देखील ऐकतील", असं दीपक केसरकर म्हणाले.

मी शिवसेनेतील शेवटचा मनुष्य असलो तरी मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, असं बाळासाहेबच म्हणाले होते याचीही आठवण दीपक केसरकर यांनी यावेळी करुन दिली. मग त्याच काँग्रेससोबत जाणं ही सर्वसामान्य शिवसैनिकांच्या विचारांची प्रतारणा आहे, असंही दीपक केसरकर म्हणाले.

आपला पक्ष मोठा व्हावा तो सत्तेवर यावा ही पवाराचा इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना कधीच राष्ट्रवादीचा विचारधारा पटलेली नाही. त्यामुळे सामान्य शिवसैनिक राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रात शिवसेना फुटलेली आहे त्यामध्ये शरद पवारांचाच हात राहिला आहे ते त्यांचं वैशिष्ट्य आहे, असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला.

बाळासाहेब जिवंत होते त्यावेळी शिवसेना फोडून शरद पवारांनी त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असं केसरकर म्हणाले. जनतेला कुणीच गृहीत धरू नये हे शरद पवारांना चांगलं माहित आहे. त्यांना जनतेची नस माहित आहे म्हणूनच ते शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र यायला हवी असं म्हणाले. नाहीतर राष्ट्रवादीनं एकट्यानं निवडून यावं, कारण त्यांना गेल्या अडीच वर्षात सत्तेचं टॉनिक मिळालं आहे. मग स्वबळावर निवडून आणा ना, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला.

"राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रत्येक ठिकाणची भाषणं पाहा. त्यांना राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा आहे याचंच ते प्लानिंग गेले अडीच वर्ष करत आहेत आणि तसं करण्यासाठी शिवसैनिक जर पालखीचे भोई ठरणार असतील तर ते मान्य आहे का? याचा विचार शिवसैनिकांनी करायला हवा", असंही केसरकर म्हणाले. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली यामागे शरद पवारांचाच हात आहे आणि याचा मी साक्षीदार असल्याचं सांगताना केसरकर यांनी महत्वाची माहिती दिली.

"खरंतर या गोष्टी सांगायला नकोत. पण महाराष्ट्रात आज युद्धाची स्थिती झालीय म्हणून सांगतो. शरद पवारांनी त्यावेळी मला विश्वासात घेऊन सांगितलं होतं की जरी मी नारायण राणेंना बाहेर पडायला मदत केली असली तरी कुठल्या पक्षात जावं याची अट मी त्यांना घातली नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा निश्चितच आहे. पण याचा सरळ अर्थ असा होतो की राणेंना बाहेर पडायला जी काय मदत हवी होती ती शरद पवारांनीच केली", असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.

छगन भुजबळांना देखील शरद पवार स्वत: बाहेर घेऊन गेले आणि राज ठाकरेंच्या बाबतीतही शरद पवारांचेच आशीर्वाद होते. कोल्हापूरचे आमदार फुटले त्यावेळी देखील शरद पवार होतेच, असंही केसरकर म्हणाले आहेत.