महाराष्ट्रात 'या' फॅक्टरवर होणार INDIA चं जागावाटप, कोणाला किती जागा मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 01:14 PM2024-01-02T13:14:02+5:302024-01-02T14:21:38+5:30

महाराष्ट्रात २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा जागांसाठी INDIA आघाडीत जागावाटपावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. परंतु जागावाटपाचा निर्णय या महिन्याच्या अखेरपर्यंत होऊ शकतो. कदाचित जास्त वेळही लागण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक ४८ जागा आहेत. त्यामुळे यातील जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला रोखण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलले आहे. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस-भाजपा लढाईसोबतच शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यामध्ये दोन्ही गटाकडून जास्तीच्या जागा जिंकण्याचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात काँग्रेसला २० हून अधिक जागा लढवायच्या आहेत. जर जागावाटपात शिवसेना ठाकरे गटही अधिकच्या जागांसाठी आग्रही आहे.

महाविकास आघाडीत शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीही आहे. त्यात आणखी एक पक्ष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्षही इंडियात सहभागी होईल बोलले जात आहे. त्यात आंबेडकरांना २ जागा मिळू शकतात. महाराष्ट्रातील जागावाटप करणं हे इंडिया आघाडीसमोर आव्हान आहे.

घटक पक्षांकडून विविध वक्तव्ये समोर येतायेत. प्रत्येक पक्षाला अधिक जागा हव्यात. परंतु एखाद्या सीटवर दावा असेल तर त्याचा आधार काय?, त्या लोकसभा क्षेत्रात पक्षाचे आमदार किती? हे सर्व विचारात घेतले जाणार आहे. पक्षाचे आमदार नसले तरी जिल्हा परिषद, महापालिका यात संख्याबळ किती या फॅक्टरच्या आधारे जागावाटप निश्चित केले जाईल.

काँग्रेसचे सहप्रभारी आशिष दुआ यांनी म्हटलं की, जागावाटपासाठी काँग्रेसनं ५ सदस्यीय समिती बनवली आहे. ज्यात अशोक गहलोत, भूपेश बघेल, सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक यांच्यासह मोहन प्रकाश यांचा समावेश आहे. या कमिटीने महाराष्ट्रातील नेत्यांसोबत चर्चा पूर्ण केली आहे. ही कमिटी त्यांचा रिपोर्ट राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सोपवणार आहे.

या रिपोर्टच्या आधारे घटकपक्षांसोबत जागावाटपात पुढील चर्चा होईल. भाजपाला हरवणे हे आमचे ध्येय आहे. सर्व घटक पक्षांचे त्याबद्दल एकमत आहे. अशावेळी मजबुतीने आणि ताकदीने भाजपाविरोधात लढणे हा फॅक्टर आहे. सध्या राज्यात काँग्रेस एकजूट आहे त्यात विधानसभेच्या सर्वाधिक जागा काँग्रेसकडे आहे.

काँग्रेसनं २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका शरद पवारांच्या एनसीपीसोबत लढल्या. इथं काँग्रेसनं २५ जागांवर निवडणूक लढवली. तर एनसीपीने १९ जागा लढल्या. दोघांच्या मिळून ५ जागा निवडून आल्या. त्यात काँग्रेसला १ तर राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या. परंतु आता मविआचे घटक असलेले उद्धव ठाकरे गट, प्रकाश आंबेडकरांचा पक्ष यांच्यासोबत तडजोड करावी लागणार आहे

अशावेळी काँग्रेस २०, शिवसेना ठाकरे गट १६-१८ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ६-७ जागा लढण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडी यांना २ जागा दिल्या जाऊ शकतात. २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एमआयएमसोबत निवडणूक लढली होती.त्यात छत्रपती संभाजीनगरची जागा एमआयएमनं जिंकली होती.