देश चालवण्यासाठी Taliban ला हवीये आर्थिक मदत; भारतालाही पाठवला एक विशेष संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 03:17 PM2021-08-26T15:17:17+5:302021-08-26T15:23:14+5:30

Afghanistan Taliban Crisis : २० वर्षांनंतर तालिबानची पुन्हा सत्ता चालवण्याची तयारी. तालिबान कशाप्रकारे देश चालवेल हे येणारा काळच ठरवणार आहे.

तब्बल २० वर्षे लोकशाही असलेलं सरकार उलथवल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा सत्तेत येण्याच्या तयारीत आहे. तसंच तालिबान आता पुढे देश कसा चालणार आणि त्यांचे इतर देशांशी कसे संबंध असतील हे पाहावं लागेल.

इतर देशांशी आपले कसे संबंध असतील हे तालिबाननं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. परंतु तालिबान त्यावर ठाम राहतो का हे पाहावं लागेल. गेल्या आठवड्यात काबुलवर कब्जा केल्यानंतर तालिबान सरकार स्थापनेच्या प्रयत्नात आहे.

दरम्यान, तालिबाननं आता देश चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे. तसंच तालिबाननं भारताला एक विशेष संदेशही पाठवला आहे.

सीएनएन-न्यूज 18 या इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन म्हणाला की, जर भारताचे प्रकल्प अफगाणिस्तानमध्ये अपूर्ण असतील तर ते ते पूर्ण करू शकतात. दरम्यान, भारतानं गेल्या दोन दशकांमध्ये अफगाणिस्तानच्या विकासासाठी मोठी गुंतवणूक केली आहे, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.

भारतानं रस्ते, धरणं आणि संसद भवनही बांधलं आहे. दरम्यान, तालिबाननं भारताशी व्यापार बंद केल्याचंही सांगितलं जात आहे. यावरही तालिबानच्या प्रवक्त्याला प्रश्न विचारण्यात आला.

त्यांचे (भारताचे) प्रकल्प, जे अफगाणिस्तानच्या लोकांसाठी चांगले आहेत आणि जे अफगाणिस्तानच्या लोकांच्या कल्याणासाठी योगदान देतात, जर ते अपूर्ण असतील तर ते ते पूर्ण करू शकतात, असं त्यानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

आम्ही फक्त या गोष्टीचा विरोध करत आहोत की भारत सातत्यानं अशरफ गनी सरकारची बाजू घेत आला आहे. आम्हाला गेल्या २० वर्षांपासूनच हेच वाटत आहे की भारतासह सर्वच देशांचे संबंध अफगाणिस्तानच्या लोकांशी असावे आणि अफगाणिस्तानच्या लोकांची इच्छाही त्यांनी स्वीकार केली पाहिजे, असंही त्यानं नमूद केलं.

आमची हीच गोष्ट आणि स्थिती होती आणि आम्ही कायम त्या कठपुतळी (गनी सरकार) सरकारची बाजू घेऊ नये असं सांगितलं. त्यांना अफगाणिस्तानच्या लोकांचं समर्थन करायला हवं होतं, असंही सुहेल शाहीन म्हणाला.

अफगाणिस्तानात विकास कामांमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायांच्या भागीदारीबाबत काय संदेश आहे, असा सवालही त्याला करण्यात आला. आम्ही आता युद्ध संपवलं आहे आणि तो अध्याय आम्ही मागे कसोडला आहे. आता एक नवा अध्याय आहे आणि अफगाणिस्तानातील लोकांना मदतीची गरज आहे, असं तो म्हणाला.

अफगाणिस्तानातील लोकांच्या जीवन निर्माण आणि देशाच्या पुनर्बांधणीसाठी सर्वच देशांनी आर्थिक मदत केली पाहिजे. त्यानंतर आमचे अन्य देशांशी चांगले संबंध राहतील. अफगाणिस्तानातील लोकांच्या मदतीसाठी पुढे येणं ही गरज असून ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोक गरीबी रेषेच्या खाली असल्याचं त्यानं नमूद केलं.

याशिवाय आमच्याकडे २० वर्षांचं युद्ध आणि रक्तपात आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीबद्दल आभार मानू, असंही सुहेल शाहीन यानं स्पष्ट केलं.