भारताची साथ सोडली, चीनच्या नादी लागला! नेपाळींना भाजीशिवायच डाळ-भात खावा लागतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 03:56 PM2023-06-14T15:56:40+5:302023-06-14T15:59:45+5:30

Nepal Onion Potato Price : नेपाळमध्ये मागील महिन्यात ५० रूपये किलो असलेला कांद्याचा भाव आता तीव्र टंचाईमुळे जवळपास दुपटीने वाढला आहे.

नेपाळमधील कांद्याचा भाव दुप्पटीने वाढला आहे. कांद्यांच्या तुटवड्यामुळे काठमांडूतील स्थानिक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बटाट्याच्या दरातही सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नेपाळच्या व्यापाऱ्यांनी भारतातून कांदा, बटाटे आणि इतर भाज्यांची आयात बंद केली आहे. नेपाळमधील व्यापाऱ्यांनी सांगितले की, सरकारने मागील महिन्यात या उत्पादनांवर १३ टक्के मूल्यवर्धित कर लादला होता. त्यानंतर त्यांनी याची आयात बंद केली आहे.

विरोधी पक्षाच्या खासदारांनी नेपाळ सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तसेच नेपाळ सरकार कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना अन्नाच्या बाबतीत असुरक्षित ठेवेल आणि आधीच गगनाला भिडलेल्या महागाईने त्रस्त झालेल्या लोकांची आणखी डोकेदुखी वाढवली जाईल, अशी टीका विरोधक करत आहेत.

दरम्यान, २९ मे रोजी संसदेत सादर करण्यात आलेल्या वित्त विधेयकानुसार, आयात केलेल्या कांदे, बटाटे आणि इतर भाज्या आणि फळांवर आता १३ टक्के व्हॅट लागणार आहे.

अर्थमंत्री प्रकाश शरण महत यांनी या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितले की, स्थानिक शेतकर्‍यांचे संरक्षण करणे आणि आयात कमी करणे हा यामागील प्रमुख हेतू आहे.

नेपाळ आपल्या शेजारील देश भारतातून जवळपास सर्व कांद्याची आयात करत असतो. मागील वर्षी भारतातून १,७३,८२९ टन कांद्याची आयात करण्यात आली होती. नेपाळमध्ये बटाटे पिकवले जातात जे स्थानिक मागणीच्या ६० टक्के भाग पूर्ण करतात, तर उर्वरित बटाटे देखील भारतातूनच आयात केले जातात.

या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी अर्थमंत्र्यांवर टीका केली. "स्थानिक शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी व्हॅट लागू करण्यात आला आहे. या सरकारच्या युक्तिवादात काही योग्यता नाही कारण नेपाळ त्याच्या कांद्यासाठी जवळजवळ संपूर्णपणे भारतावर अवलंबून आहे", अशी टीका विरोधक करत आहेत.

स्थानिक व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने व्हॅट लागू करण्यापूर्वी काठमांडू इथे भारतातून दररोज ७०० ते १,००० टन कांद्याची आयात व्हायची. पण मागील १० दिवसांपासून भारतातून कांदे येणे बंद झाले आहे. व्हॅट भरून भारतातून भाजीपाला आयात करतानाही कायदेशीर अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत.

मागील महिन्यापर्यंत ५० रुपये किलो असलेला कांद्याचा भाव आता तीव्र टंचाईमुळे जवळपास दुपटीने वाढला आहे. काठमांडूतील स्थानिक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बटाट्याच्या दरातही जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच नेपाळ सरकार सध्या ९ टक्के कृषी सेवा कर आणि ५ टक्के आगाऊ आयकर वसूल करत असल्याची माहिती व्यापारी असोसिएशनचे सरचिटणीस प्रकाश गजुरेल यांनी दिली.

कांदे आणि बटाट्यांशिवाय नेपाळ भारतातून वांगी, वाटाणे, लसूण आणि पालक देखील आयात करतो. सेंट्रल बँक ऑफ नेपाळच्या मते, मे महिन्यात वार्षिक महागाई दर ७.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे.