मे आय कम इन सर?- ‘शिक्षक’ होऊ पाहणार्‍या तरुणांच्या जगण्याचं अस्वस्थ वर्तमान आणि वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 03:09 PM2018-07-26T15:09:23+5:302018-07-26T15:22:39+5:30

एका अकुशल कामगाराचा जन्म (ऑक्सिजन 28 जून 2018) हा लेख ऑक्सिजनच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झाला. अनेक तरुणांनी आपले मुलाखतीचे विदारक अनुभव त्यानंतर लिहून पाठवले. त्यातल्याच काहींची ही निवडक पत्रं..

May I cum in sir? - harsh reality of a teachers life | मे आय कम इन सर?- ‘शिक्षक’ होऊ पाहणार्‍या तरुणांच्या जगण्याचं अस्वस्थ वर्तमान आणि वास्तव

मे आय कम इन सर?- ‘शिक्षक’ होऊ पाहणार्‍या तरुणांच्या जगण्याचं अस्वस्थ वर्तमान आणि वास्तव

Next
ठळक मुद्देपदव्यांची चळत हातात असूनही नोकरीसाठी ‘लायक’ नसल्याचे अनुभव, वशिलेबाजीचे अनुभव, नोकरीसाठी पैशाची होणारी मागणी हे सारं अनेकांनी आपल्या पत्रांतून मांडलं. नेट-सेट करूनही शिक्षक होता न आल्याचं दुर्‍ख सोसून मिळेल ते काम करणारे तर अनेकजण

नेट-सेट केलं की लाइफ सेट, 
हीच एक अंधश्रद्धा आहे !..
 नेट परीक्षेचा निकाल डिसेंबरला लागला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. नेटपूर्वीचं खडतर आयुष्य संपून महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून नवी गगन भरारी मारता येणार या विचारानं मी व माझे नातेवाईक आनंदून गेलो होते. प्रत्येक शिक्षक भरतीची जाहिरात एक सुवर्णसंधी वाटत होती. ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्या कॉलेजमध्ये शिकवण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना.
प्राध्यापक पदासाठी नवीन बायोडेटा तयार केला. त्यामध्ये नेट पास झाल्याचं नमूद करताना माझी छाती अभिमानाने भरून येत होती. शालेय शिक्षक आजर्पयत माझ्या घरातील व नात्यातील बरेच झाले. पण मी मात्न थेट कॉलेजचा प्राध्यापक होणार होतो तेव्हा सर्वाचे या मुलाखतीच्या यशस्वीतेकडे नजर होती. म्हणूनच नेट परीक्षेइतकेच टेन्शन मला या मुलाखतीचं आलं होतं. प्रथम प्रयत्नामध्ये नेट पास झालो होतो तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आता ही मुलाखत सर केली की लाईफ सेट होईल, चांगले वेतन मिळेल, उत्तम विद्यार्थी घडतील, असं बरंच काही मनात होतं.
मुलाखतीसाठी आता माझं नाव पुकारलं, मी जरा कचरतच दरवाजा उघडला, मे आय कम इन सर म्हटलं.? 
इण्ट्रोडय़ूस यूवर सेल्फ म्हटल्यावर फाड फाड इंग्रजीत उत्तरलो. त्यांनी मला थांबवलं आणि कॉलेजचे प्लस व मायनस पॉइण्ट्स काय आहेत हे विचारलं. आता मायनस कसे सांगणार? तरी जे खटकलं ते सांगितलं.
अशी जेमतेम 10 मिनिटे प्रश्नोत्तरे झाली. विशेष फोकस हा माझ्या एका वृत्तवाहिनीत काम केल्यावर होता. मीडियामध्ये करिअर चांगलं होत असताना मीडियाचे प्राध्यापक का व्हायचंय वगैरे विचारलं.
दोन दिवसात कळवतो म्हटल्यावर मी त्यानंतर 20 वेळा संपर्क साधला; पण आतली सेटिंग समजायला तसा उशीरच झाला.  पहिल्या मुलाखतीच्या अपयशी निकालानं बरंच काही शिकवलं. सांगितलं. तरीही बिगर नेट-सेटधारक प्राध्यापकांच्या मुजोरीला व दडपशाहीला न घाबरता आजवर शेकडो मुलाखती दिल्या. प्रत्येक वर्षी नव्या उमेदीने व आस्थेने प्रत्येक कॉलेजच्या पायर्‍या झिजवल्या. देवकृपेने मी सध्या एका उत्तम कॉलेजमध्ये  माध्यम विभाग प्रमुख म्हणून आनंदानं काम करत आहे. त्या सोबत पेपर सेटर, एक्झामिनर म्हणूनही विद्यापीठात कीर्ती मिळवली आहे.
भविष्यात परिस्थिती सुधारेल या आशेनेच पुढची पाऊलं टाकीत आहे.

- प्रमोद गायकवाड, 
बदलापूर (जिल्हा ठाणे)


नोकरी मागायला गेले,
तेव्हाचा एक अनुभव

पुण्यातून मिस्टरांची बदली झाली आणि आम्ही मराठवाडय़ातील एका छोटय़ा गावात आलो. मी बर्‍यापैकी शिकलेली म्हणजे एम.फील. झालेली. नेट पास. मला प्राध्यापिका म्हणून काम करण्याचा एक वर्षाचा अनुभव होता. तेव्हा या गावातही आपण नोकरी करावी असं मला वाटू लागलं. खरं म्हणजे आता तसा उशीर झाला होता. सप्टेंबर महिना सुरू झाला होता. तरीसुद्धा वाटलं चौकशी तरी करावी. मी जवळच्या एका कॉलेजमध्ये गेले. सोबत बायोडेटा होताच. कॉलेज म्हणजे समोरच एक खुराडय़ासारखी दिसणारी खोली होती. ‘मी येऊ का आत?’ मी म्हणाले. ते म्हणाले, या, काय काम आहे. प्राचार्याना भेटायचंय असं सांगितलं तर म्हणाले, अहो, आम्हीच संस्थेचे अध्यक्ष आहोत. प्रिन्शीपॉल अजून नेमला नाही. काय बोलायचं ते आमच्याशीच बोला .’
मग मी सांगितलं नोकरी पाहिजे वगैरे. तर त्यांनी विचारलं, ‘तुम्ही सोबत सामान आणलंय कापण?’ मी जरा गोंधळून म्हणाले, आणलंय की घरी. ते म्हणाले, ते सामान नाही हो, सामान म्हणजे पत्न. पत्न म्हणजे कागदपत्नं. म्हणजे तुमचा डेटा.’
मी बायोडाटा समोर ठेवला. त्यांनी त्या बायोडेटावर एक निर्विकार नजर फिरवली. म्हणाले, ‘हे बघा, तुम्ही आजपासूनच कामावर येऊ शकता; पण तुम्हाला प्रिन्सिपॉलिण बाई व्हावं लागेल. कारण इथं सगळ्यात जास्त शिकलेल्या तुमीच आहेत. अजून तिघे इथे काम करतात. दोन बाया आणि एक सर. मी नंतर ओळख करून देतो.’
मी प्रचंड खूश झाले. प्राध्यापिका व्हायला आले होते आणि प्रिन्सिपॉल झाले होते. पण मला थोडी भीतीपण वाटू लागली. मी त्यांना विचारले, ‘पण सर, मला प्राचार्य म्हणून काम करण्याचा काहीच अनुभव नाही.  विद्यापीठाच्या नियमानुसार मी पीएच.डी.पण नाही. मग कसं जमेल?’
ते हसून म्हणाले, ‘घाबरू नका हो. हे विनाअनुदानित कॉलेज आहे. इथं आमचंच राज्य आहे. तुम्ही काही ओरिजिनल प्रिन्शिपॉल नाही. तुम्ही डुप्लिकेट 

प्रिन्शिपॉल. म्हणजे रूटिंगमधली काम करणारे.’
आणि मग ओरिजिनल प्रिन्सिपॉल? माझ्या मनात गोंधळ अजून वाढला होता.
‘ओरिजिनल पीएच.डी. झालेलं प्रिन्शिपॉल मास्तर त्याच्या गावाकडे आहे. विद्यापीठाची कमिटी येणार म्हणलं की आम्ही त्यांना बोलवून घेतो. तुम्हीपण मस्टरवर सही त्याच्याच नावानं करायची. कळलं का?’ - इति अध्यक्ष.
तर मग तुमी आजपासून प्रिन्शिपॉलिण बाई झालात. हॅपी कंडोलन्स - अध्यक्ष.
‘पण.. माझ्या पगाराचे काय?’
‘देऊ की, त्यात काय? हे बघा आमचं दारूचं दुकान आहे. तिथल्या पोराला सात हजार रु पये पगार आहे. तुमाला पन तेवढाच देऊ.’
 मला धक्काच बसला. फक्त सात हजार? मी अगदीच हताश झाले. पण विचार केला जाऊ दे. पगार जास्त नाही तर नाही. निदान प्रिन्सिपाल तरी झाले. त्यामुळे मला आता एक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, कठोर, विद्यार्थीप्रिय प्रशासक होता येईल.
बाकीचा स्टाफ कुठाय विचारलं तर म्हणाले,  चपराशी माझ्या घरचं दळण आनायला गेलाय. तो  देशमुखसर बाजारात त्यांचा बैल इकायला गेलेत. दोन बाया आहेत त्यांना बोलवतो. वर्गात मुलं किती विचारलं तर म्हणाले, पाच. त्यावर अध्यक्ष डाफरले म्हणाले, तुमाला किती वेळा सांगितलं की, ‘थर्ड पार्टी समोर असं  मनायचं नाही. ऐंशी मुलं होती असं सांगायचं.’ 
तिथे पत्र्याचे शेड होते आणि त्यातच पार्टिशन करून तीन वर्ग केले होते. लांबून ते चक्क गुरांच्या गोठय़ासारखे दिसत होते. मी अगदीच नाराज झाले होते.
मी वैतागून, हताश होऊन निघाले. असल्या कॉलेजला रुजू होण्याचा प्रश्नच नव्हता. एका कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, उत्कृष्ट, विद्यार्थीप्रिय, भावी  प्रिन्शिपॉलिणबाईंचे  लढाईच्या आधीच पानिपत झाले होते.

अश्विनी निवर्गी. उद्गीर 

 


सॅलरी कितना लोगे?
या प्रश्नानंतर लागणारा ‘निकाल’

एका तालुक्याच्या ठिकाणी स्वर्गीय माजी शिक्षणमंत्री यांच्या नामांकित महाविद्यालयात कनिष्ठ लिपिकपदाची जाहिरात निघाली होती. मी सदर पदाकरिता आवेदन देण्याचं ठरवलं.  उत्सुकता होती ती कॉल लेटरची. मग काही दिवसात दारी पोस्टमन एक लिफाफा देऊन गेला, मला परीक्षेसाठी व मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं होतं. मी ही बातमी घरच्या लोकांपासून मुद्दामहून लपवून ठेवली कारण प्रत्येकवेळी त्यांच्याही वाटय़ाला निराशा यायची.
सर्व तयारीनिशी मी वेळेत मुलाखतीला पोहचलो.  मनावर दडपण होत काय विचारतील, पेपर कसा असेल आदी गोष्ट. एका पदासाठी जवळजवळ आम्ही दहा लोक होतो. वर्गात बसल्यावर आमची परीक्षा झाली आणि टायपिंग टेस्टपण घेण्यात आली.  निकाल हाती येत नाही तोर्पयत आमची सर्व उमेदवाराची एकमेकांशी तोंडओळख झाली. त्याठिकाणी आलेल्या एका ािश्चन मुलीशी माझी चांगली मैत्री झाली. मग काही तासातच आमचा निकाल आला. आमची नावं वाचली जात होती आणि माझ्या कानावर माझं नाव आलं. पण त्या मुलीचं नाव यादीत नव्हतं.  ती निराश होऊन परतली. निवड झालेल्या उमेदवारांना दुपारी मुलाखतीसाठी थांबवण्यात आले. मग आम्हांला सर्वाना एका भल्या मोठय़ा हॉलमध्ये बसवण्यात आलं. मी बैचेन झालो.  घराची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मला हा जॉब मिळणं गरजेचं होतं. संस्थाचालक आलेच नव्हते म्हणून आपलं बसवून ठेवलं होतं. पोटात भुकेची आग, बाहेरपण पडता येत नव्हतं, ते लोक केव्हा बोलवतील याची धास्ती होती. मग बराच वेळ झाल्यावर मुलाखतीसाठी आत बोलविण्याची प्रक्रिया सुरू झाली. माझं नाव पुकारण्यात आलं, मी दरवाज्याच्या आत डोकावून बघतो तर भलं मोठं चकचकीत, थंड वातावरण असलेलं सभागृह. भल्या मोठय़ा यू आकाराच्या टेबल समोर संस्थाचालक, प्राचार्य आणि त्याबरोबरीला पाच ते सहा लोक होते. आधी माझी कौटुंबिक माहिती विचारण्यात आली, मी सर्व प्रश्नांची उत्तरे दबक्या आवाजात आणि घाबरलेल्या स्थितीत देत होतो. बराच वेळानंतर त्यांनी माझ्यासमोर पगाराचा प्रस्ताव ठेवला. मला आनंद झाला. मी बाहेर पडताच बाहेर असलेल्या मुलांचा घोळका माझ्यावर प्रश्नाची सरबत्ती करू लागले. मी खुशीत घरी आलो. माझं काम झालं या आनंदात होतो. पुढे काही कळेना, काही दिवसानंतर चौकशी केली तर त्यांनी त्या पदावर दुसर्‍याच व्यक्तीची निवड केल्याचं कळलं. 
मी हताश झालो. पॅनल इण्टरव्ह्यूत निवड झाली, पगाराची चर्चा झाली. 
आणि पुन्हा असं? असंच का घडतं नेहमी?

- सागर नथ्थू मोरे,
अमळनेर

 

जुन्या नियमांचा जाच अजून किती काळ सहन करायचा?

माझी कहाणी थोडी वेगळी आहे. थोडी मनोरंजक, तर थोडी वेदनादायक आहे. शालेय जीवनापासूनच मी एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होतो. इयत्ता चौथीत असताना स्कॉलरशिप परीक्षा पास झालो होतो. त्या जोरावर गव्हन्र्मेंट पब्लिक स्कूलमध्ये दाखल झालो आणि दहाव्या इयत्तेत असताना 83.42 टक्के गुण घेऊन मोठय़ा दिमाखात शहरातल्या महाविद्यालयात शिकायला आलो. इथून पुढे मात्र माझा रस्ता चुकला आणि पुढील आयुष्यात माझी चांगलीच ससेहोलपट झाली.
शाळेत असताना मला जीवशास्त्र, इतिहास, भूगोल, मराठी यांसारखे विषय आवडत असत. खेळाचा तास फार आवडायचा. दहावीला चांगले मार्क्‍स मिळाल्यानं साहजिकच प्रतिष्ठित अशा शास्त्र शाखेस मी प्रवेश घेतला. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक्स या विषयालाही प्रतिष्ठा असल्याने आणि विशेषतर्‍ माझ्या मोठय़ा भावानेही तोच विषय घेतलेला असल्याने मीही तोच विषय ऑप्शन म्हणून निवडला. इथे माझे सर्व आवडते विषय आपोआपच बाजूला पडले आणि सर्व नावडते विषय हेच करिअरसाठीचे मुख्य विषय बनले.
इतर अनेक मित्रांप्रमाणे अकरावी-बारावीत असताना मी हवेत तरंगत राहिलो. क्रिकेट सिनेमा गप्पा-गोष्टी यांत रमलो. नेमका बारावी परीक्षेपूर्वी आजारी पडलो व कमी गुण घेऊन उत्तीर्ण झालो. तरीही इंजिनिअरिंगला अ‍ॅडमिशन मिळालं. इथे तर अधिकच नावडत्या विषयांशी सामना झाला. अकरावी बारावीत इलेक्ट्रॉनिक्स फारसं समजलं नव्हतंच. इथे अप्लाइड मेकॅनिक्स, बेसिक इलेक्ट्रिकल आणि विशेषतर्‍ एम-1, एम-2 (मॅथेमॅटिक्स)यांनी माझं डोकं उठवलं. वर्षभरातच आपण रस्ता चुकलो, याची जाणीव झाली. मनात संघर्ष सुरू झाला. सुमारे आणखी वर्षभराने निर्णय घेतला आणि दुसर्‍या वर्षाच्या परीक्षेला नाममात्र हजेरी लावून गावी परतताच आई-वडिलांना मी माझा निर्णय सांगितला.
मी इंजिनिअरिंग सोडायचे म्हणतोय, हे काही माझ्या कुटुंबीयांच्या पचनी पडलं नाही. त्यामुळे रस्ता बदलण्याचा माझा निर्णय मला परत घ्यावा लागला. यथावकाश मी इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन नोकरीसही लागलो. नवीन शहरात कार्यालयातील मित्रांसोबत संध्याकाळी फेरफटका  मारताना एक दिवस सहज म्हणून कुठल्याशा व्याख्यानास जाऊन बसलो. ते मला आवडलं त्यामुळे आणखी काही व्याख्याने ऐकली. वयाच्या साधारणतर्‍ पंचविशीत मी नव्यानं काही गोष्टी समजून घेत होतो. यशस्वी पुरुषांची चरित्रे वाचू लागलो. बी.ई. नंतर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात डायरेक्ट एम.ए.ला मी प्रवेश घेतला. तत्पूर्वी पत्रकारितेची पदविकाही मी पदरात पाडून घेतली होती.
राज्यशास्त्रात एम.ए. झाल्यानंतर मी शिवाजी विद्यापीठातून जातीय अत्याचारांचं निमरूलन हा विषय घेऊन डॉक्टरेटची पदवी मिळवली. एका संस्थेने सामाजिक न्यायासंदर्भात काम करण्यासाठी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून वर्षभरासाठी माझी निवड करताच मी लाखभर रुपये पगार देणार्‍या शासकीय नोकरीचा त्याग केला. सुमारे अध्र्या पगारावर सामाजिक न्याय देण्यास सिद्ध झालो. सरळ नोकरीचा राजीनामा दिला. पण इथे नवीनच प्रकाराला मला तोंड द्यावे लागलं. त्या संस्थेने आज-उद्या करत नेमणुकीचे पत्र देण्यास टाळाटाळ केली व वर्ष संपताच कानावर हात ठेवले. आता मुदत संपली. लवकरच नवी जाहिरात येईल; तेव्हा या या, असं मला सांगितले. यानंतर दोन वर्षे झाली, तरी नवी जाहिरात काही आली नाही.
आपण आता डॉक्टर आहोत, आपल्याला कोठेही प्राध्यापकाची नोकरी मिळून जाईल; आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल, असा विचार मी केला होता. पण इथे वेगळाच प्रकार समोर आला. जाहिरातीनुसार अर्ज पाठवल्यानंतर महाविद्यालय मला मुलाखतीसाठी बोलवत; पण तुम्ही बी.ए. केलं आहे का असा प्रश्न विचारत! मी नाही म्हणताच ते सरळ म्हणत की तुम्ही बी.ए. केलं नाही; मग तुम्हाला नोकरीवर घेता येणार नाही. सुमारे तीन वर्षे हा नकार  पचवतच मी एम.बी.ए. (मानव संसाधन) ही पदवीही प्राप्त केली व राज्यशास्त्रातील सेट व नेट या दोन्ही परीक्षाही उत्तीर्ण केल्या. यानंतरही मुलाखतीला गेल्यानंतर मला प्रश्न विचारला जातोच; तुम्ही बी.ए. केलंय का?
बी.ए. करणार्‍या माणसावर एक विनोद केला जातो! काय राव. दोनच अक्षरं शिकलात आनं त्ये बी उल्टं..! माझ्या बाबतीत हा विनोद खरा ठरला आहे. कारण राज्यशास्त्रात  एम.ए., पीएच.डी., सेट आणि नेट झाल्यानंतरही मला सध्या काय करावं लागत आहे, तरी बी.ए.! बेसिक डिग्री बाबतच्या या अघोषित नियमापुढे शरणागती पत्करून शेवटी मी बी.ए.ला प्रवेश घेतला.  याबाबतच्या पत्राला यूजीसीही उत्तर देत नाही. आता तर यूजीसीलाच टाळे लागणार असल्याचं समजतं ! सहाय्यक प्राध्यापक पदासाठी माझी नाव नोंदणी करून घेण्यास नकार देताना विद्यापीठातील अधिकारी म्हणत, की तुमचं म्हणणं बरोबर आहे; पण आम्हांला नियमाप्रमाणं वागणं भाग आहे. माझ्याबाबत सहानुभूती व्यक्त करणारे विद्यापीठातील अधिकारीसुद्धा माझ्या पत्राचे लेखी उत्तर देत नाहीत. त्यामुळे आता आपण नियम बनवणारांना माफ करावं की शब्दांचा कीस पाडून जुनाट नियमांनाच चिकटून राहणारांना माफ करावं, काही कळत नाही.  

- डॉ. रविनंद नामदेव होवाळ

Web Title: May I cum in sir? - harsh reality of a teachers life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.