K2K - काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवासाची एक थरारक गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:27 PM2018-12-20T12:27:32+5:302018-12-20T12:28:35+5:30

अमेरिका खंड ओलांडणारी ‘रॅम’, देशाची महानगरं जोडणारी ‘गोल्डन क्वॉड्रिलॅटरल’, जगातली सर्वाधिक कठीण भूतान रेस आणि आता देशाची दोन्ही टोकं जोडणारा काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवर करून आव्हानांची सैर करणारा एक जागतिक विक्रम

K2K - A thrilling journey on bicycle from Kashmir to Kanyakumari! | K2K - काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवासाची एक थरारक गोष्ट!

K2K - काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवासाची एक थरारक गोष्ट!

googlenewsNext
ठळक मुद्दे10 दिवस, 10 तास आणि 1 मिनिट एवढय़ा वेळात सायकलने काश्मिरहून कन्याकुमारी गाठलं तेव्हा.

- समीर मराठे

श्रीनगरमधली नोव्हेंबरची हाडं गोठवणारी थंडी. झोंबणारा वारा. भरीस भर गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड पाऊस आणि हिमवर्षाव. रस्त्यांवर बर्फ साचलेला, वाहतूक जवळपास ठप्प झालेली आणि तापमान एक अंश सेल्सिअस ! माझा सगळा प्लॅनच बोंबलला!
भारताची दक्षिणोत्तर टोकं जोडणारं, काश्मीर ते कन्याकुमारी (केटूके) हे जवळपास तीन हजार 750 किलोमीटर अंतर सायकलवर बारा दिवसांत पार करण्याचं आव्हान मी स्वीकारलं होतं आणि सुरुवातच ही अशी. 
3 नोव्हेंबरला मी सायकल मोहिमेला सुरुवात करणार होतो; पण या अशा वातावरणात मी जागेवरून हलू शकत नव्हतो की रस्त्यावर सायकल चालवू शकत नव्हतो. 5 नोव्हेंबरच्या सकाळर्पयत मला वाट पहावी लागली..
5 नोव्हेंबरला श्रीनगरच्या लाल चौकातून सकाळी 7.44 वाजता मी मोहिमेला सुरुवात केली तेव्हाही तापमान शून्य ते तीन अंशांच्या दरम्यान होतं. झोंबणारा वारा तसाच होता, रस्ता अजूनही पूर्णपणे मोकळा झालेला नव्हता.  रस्त्याच्या दोन्ही कडेला जवळपास तीन ते चार फुटांचा बर्फ साचलेला होता.  वितळणार्‍या बर्फामुळे सगळे रस्ते निसरडे झालेले होते. सायकल घसरून पडण्याची भीती तर कायमच होती. तरीही मी सायकल चालवायला सुरुवात केली. तिथून अनंतनाग (70 किलोमीटर) आणि पुढे जवाहर टनेलर्पयत (90 किलोमीटर) परिस्थितीत काहीही फरक नव्हता. सायकलिंगचे गरम ग्लोव्हज घातले होते, पायांत दोन दोन सॉक्स घातले होते आणि शूजवर कव्हरही होतं, तरीही माझ्या हातापायाची बोटं बधीर झाली होती, त्यांना कुठलीच संवेदना नव्हती. ‘बिटर कोल्ड’ म्हणजे काय असतं, हे मला त्यादिवशी पहिल्यांदा कळलं. अशा विपरीत नैसर्गिक परिस्थितीत मोहीम सुरू करण्याचा आपला निर्णय चुकला की काय, असं राहून राहून वाटत होतं.
- डॉ. महेंद्र महाजन आपला अनुभव सांगत होते. काश्मीर ते कन्याकुमारी (केटूके) ही आपली महत्त्वाकांक्षी सायकल मोहीम नुकतीच पूर्ण करणारे डॉ. महाजन. सायकलिंगच्या क्षेत्रात त्यांचं नाव केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात पोहचलं आहे. आपले मोठे बंधू डॉ. हितेंद्र महाजन यांच्यासह त्यांनी अमेरिकेतील ‘रेस अक्रॉस अमेरिका’ ही जगातील सर्वाधिक खडतर, 4838 किलोमीटरची स्पर्धा जिंकलेली आहे, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली या महानगरांना जोडणारा ‘गोल्डन क्वॉड्रिलॅटरल’ हा तब्बल सहा हजार किलोमीटरचा सुवर्णचतुष्कोन त्यांनी केवळ दहा दिवस 19 तासांत पूर्ण केला आहे, जगातील सर्वाधिक कठीण मानली जाणारी भूतानची ‘डेथ रेस’ त्यांनी पहिल्याच प्रय}ांत पूर्ण केली आहे. हे सारं करणारे ते भारतातले पहिलेच.
‘केटूके’ ही सायकल मोहीम बारा दिवसांत पूर्ण करायचं आव्हान डॉ. महेंद्र महाजन यांच्यासमोर होतं. 
- बारा दिवसच का?
 कारण हे टार्गेट त्यांना दिलं होतं ‘गिनीज बुक’नं. 
(गिनीज बुकवाले स्वतर्‍च हे टार्गेट ठरवतात.) पण डॉ. महेंद्र यांनी हे आव्हान पूर्ण केलं केवळ दहा दिवस, दहा तास आणि एक मिनिटांत !
या विक्रमामुळे अमेरिकेच्या ‘वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशन’च्या ‘युका’ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झाली आहे. वस्तुस्थितीचं काटेकोर परीक्षण केल्यानंतर थोडय़ाच दिवसांत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही त्याची नोंद होईल. 
डॉ. महेंद्र यांना विचारलं, इतके सारे विक्रम अगोदरच गाठीशी असताना पुन्हा जगावेगळं नवं आव्हान स्वीकारावंसं तुम्हाला का वाटलं?
डॉ. महेंद्र यांचं म्हणणं होतं, आपला देश आत्यंतिक सुंदर आहे. हा देश एका टोकापासून दुसर्‍या टोकार्पयत सायकलवर कमीत कमी वेळेत मला पाहायचा, पार करायचा होता, आपल्या क्षमतेची कसोटी पाहणारं अजून एक चॅलेंज मला खुणावत होतं आणि तिसरं म्हणजे एक ‘सोशल कॉज’ घेऊन मला हे आव्हान पूर्ण करायचं होतं.
महाजन बंधूंच्या आजवरच्या सार्‍या आव्हानांमागे मागे एक सामाजिक बांधिलकीही होती. अमेरिकेतली ‘रॅम’ ही स्पर्धा त्यांनी जिंकली त्यावेळी आपल्या आदिवासी बांधवांचं उत्थान त्यांच्या डोळ्यांसमोर होतं. त्यावेळी ‘कल्पतरू फाउण्डेशन’तर्फे वर्षभरात तब्बल 392 आदिवासी रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्रक्रिया करण्यात आल्या होत्या, तर 71 आदिवासी रुग्णांना मोफत नेत्ररोपण करण्यात आलं होतं. ‘गोल्डन क्वॉड्रिलॅटरल’ पूर्ण करताना त्यांचं घोषवाक्य होतं, ‘फॉलो द रुल्स अ‍ॅण्ड इंडिया विल रुल’ (सर्व नियम पाळा आणि देश घडवा). ‘केटूके’ मोहिमेत ‘क्विट टोबॅको’ आणि भारत सरकारच्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांना त्यांनी पाठिंबा दिला होता. या प्रवासात त्यांच्या टीमनं यासंदर्भातली जवळपास तीन हजार पत्रकंही लोकांना वाटली.
अमेरिकेची दोन टोकं जोडणारी ‘रॅम’ आणि भारताची दोन टोकं जोडणारी ‘केटूके’ या दोन्ही मोहिमांत काय फरक होता असं विचारल्यावर डॉ. महेंद्र सांगतात, टोकाच्या हवामान बदलाची, टोकाच्या चढउताराची आणि टोकाचा कस पाहणारी प्रादेशिक, भौगोलिक परिस्थिती दोन्ही ठिकाणी जवळपास सारखीच होती; पण फरक होता तो लोकांच्या मानसिकतेत. अख्खा अमेरिका सायकलवर ओलांडताना आमच्या मार्गात मध्येच कोणी वाटसरू, वाहनचालक घुसला असं चुकूनही झालं नाही. ‘केटूके’ मोहिमेत सर्वाधिक भीती होती, ती मध्येच कोणी आपल्या मार्गात येतंय का, आपण पडू का, याची. त्याचा संभाव्य अंदाज बांधूनच संपूर्ण वेळ सायकल चालवावी लागली. 
मात्र ही आव्हानं छोटी म्हणावीत असे अनेक प्रसंग डॉ. महेंद्र यांना ‘केटूके’ या मोहिमेत आले. काश्मीरच्या जवाहर टनेलर्पयत प्रचंड थंडी आणि बर्फ होता. जवाहर टनेल संपताच कडाक्याची थंडीही संपली आणि सुरू झाला उलटय़ा दिशेनं (हेडविंड) घोंघावत येणारा वारा. या वार्‍याचा वेग इतका प्रचंड होता, की उतारावरही सायकल पुढे सरकेना. सायकलवरून पडू नये म्हणून शेवटी सायकल हातानं ढकलत तो उतार पार करावा लागला. 
पुढे बनिहाल ते रामबन या मार्गावर आणखीच मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहिलं. पावसामुळे जवळपास तीनशे मीटरचा रस्ता पार वाहून गेला होता. मोठी दरड कोसळली होती. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. वाहनांची दुतर्फा जवळपास चाळीस किलोमीटरची रांग लागली होती. कोणतंही वाहन पुढे जाऊ नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त होता. गर्दी अनावर झाल्यावर पायी जाणार्‍या काही लोकांना पोलिसांनी सोडलं. या धक्काबुक्कीत सायकल खांद्यावर घेऊन डॉ. महेंद्रही घुसले.
दगडमातीतून कशीबशी सायकल पुढे काढताना काश्मिरातील हिल स्टेशन पटनीटॉपला ते पोहचले तेव्हा त्यांच्या सायकलमध्ये काही किलो चिखल साचलेला होता. काडीनं हा चिखल खरवडून काढावा लागला आणि सायकलीला अक्षरशर्‍ अंघोळ घालावी लागली.
निसर्ग तर कसोटी पाहात होताच; पण आता शरीरानंही परीक्षा घ्यायची ठरवली. तिसर्‍या दिवसापासूनच त्यांच्या गुडघ्यामध्ये प्रचंड वेदना सुरू झाल्या. सायकलचं एकेक पॅडल मारणंही मुश्कील झालं. त्यामुळे वेगही प्रचंड कमी झाला. पाठीचं दुखणं आधीपासूनच आहे. त्यामुळे ही संपूर्ण मोहीम पाठीला बेल्ट बांधूनच त्यांना पूर्ण करावी लागली.
.पण सर्वात मोठी परीक्षा अजून बाकी होती. 
पाचवा दिवस. वेळ रात्री बाराची. स्थळ मध्य प्रदेशातील नरसिंगपूरजवळचं. डॉ. महेंद्र आणि त्यांचे क्रू मेंबर्स फॉच्यरुनर ही त्यांची सपोर्ट कार रस्त्याच्या अगदी कडेला पार्क करून विश्रांतीसाठी थोडे थांबले होते. सायकलही कारलाच लावलेली होती. त्याचवेळी ताशी सुमारे 90 किलोमीटर वेगानं विरुद्ध दिशेनं येणार्‍या टोमॅटोनं भरलेल्या महिंद्रा पिकअपनं त्यांच्या उभ्या कारला धडक दिली. कारण रात्रीच्या गार वार्‍यानं ड्रायव्हरला झोप लागली होती. ही धडक इतकी भयानक होती, की चेंदामेंदा कार पाहून येणारा-जाणारा प्रत्येक जण विचारायचा, ‘कितने मरे?’ 
सायकलचं नुकसान झालं. डॉ. महेंद्रसह सारेच जण बालंबाल बचावले. कार तर दुरुस्तीच्या पलीकडे गेली असून, अजूनही ती मध्य प्रदेशच्या टोयोटाच्या छिंदवाडा सेंटरला पडलेली आहे.
या घटनेचा सार्‍यांनाच प्रचंड धक्का बसला. सगळ्यांचंच मनोबल खचलं होतं; पण नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, गोंदियाचे जिल्हा पोलीस अधीक्षक हरीष बैजल, डॉ. मिलिंद पिंपरीकर, भाऊ डॉ. हितेंद्र महाजन. यासारख्या सुहृदांच्या धिरामुळे डॉ. महेंद्र यांनी आपली मोहीम पुढे सुरूच ठेवली.
डॉ. महेंद्र सांगतात, सगळ्यांच्याच जिवावरचा धोका टळला होता. आता यापुढची सगळी आव्हानं तुलनेनं किरकोळ होती. 
पहिल्या दिवशी सकाळी श्रीनगर येथून, देशाच्या उत्तर टोकापासून सुरू केलेली ‘केटूके’ मोहीम दहाव्या दिवशी कन्याकुमारीच्या केप कोमोरीन समुद्रकिनार्‍याच्या दक्षिण टोकावर ते पोहचले, तेव्हा संपली. 
त्यावेळी संध्याकाळचे पाऊणेसहा वाजले होते. सूर्य अस्ताला गेलेला होता. 3750 किलोमीटर अंतर कापलं गेलं होतं आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक गॅझेट त्यासाठी लागलेला वेळ दाखवत होतं, दहा दिवस, दहा तास आणि एक मिनिट!
आणखी एक खडतर आव्हान पूर्ण झालं होतं, एक नवा विक्रम नोंदला गेला होता. 
आता शोध सुरू होईल तितक्याच खडतर; पण नव्या आव्हानाचा !.
डॉ. महेंद्र सांगतात, ही आव्हानंच तर माझ्या जगण्याची ऊर्जा आहे !

****


 

पोटावर झोपून जेवण 
आणि दोन तासांची पॉवर नॅप!

‘केटूके’ मोहिमेत डॉ. महेंद्र महाजन यांनी रोज सरासरी तीनशे ते साडेचारशे किलोमीटर आणि चौदा ते वीस तासांर्पयत सायकल चालवली. वेळ वाचविण्यासाठी त्यांनी योजलेल्या आयडियाही भन्नाट होत्या. रस्त्यात पेट्रोलपंप, धाबा असं कुठेही थांबून कारमध्येच थोडी झोप, विश्रांती घेतली. काही वेळा तर जवळपास चोवीस तास सायकल चालवली. विश्रांतीसाठी केवळ दोन तासाच्या ‘पॉवर नॅप’चा वापर केला. महानगरात दिवसा ट्रॅफिक जाममध्ये अडकण्याची भीती असते, त्यामुळे रात्रीच्या अंधारातच महानगरं पारं केली.
जेवायला हॉटेलात थांबल्यास वेळ जातो म्हणून त्यांचे सहकारी हॉटेलातून आधीच पार्सल घेऊन ठेवायचे. सतत सायकल चालवल्यानं पायांना सूजही यायची. जेवताना रस्त्याच्या कडेलाच ते पोटावर झोपायचे. त्याच अवस्थेत नास्ता, थोडं जेवण करायचे. तेवढय़ा वेळात त्यांचा एखादा सहकारी त्यांच्या पायांना मालीश करून द्यायचा. त्यामुळे वेळेची खूपच बचत झाली.

सायकल- साथ
‘केटूके’ मोहिमेत डॉ. महेंद्र यांच्या सोबत असलेले क्रू मेंबर्स- दत्तात्रय चकोर, विजय काळे, सागर बोंदार्डे, संदीप परब, कबीर राचुरे आणि किशोर काळे. याशिवाय ‘जायंट स्टारकेन’चे प्रवीण पाटील यांनी त्यांना सायकल पुरवली होती. मितेन ठक्कर यांनी सायकल प्रशिक्षण दिलं होतं, तर डाएटची जबाबदारी सांभाळली होती मेघना सुर्वे यांनी. याशिवाय मुकेश कणेरी, राजेंद्र भास्कर, कन्सेप्ट आर्ट, नितीन जोशी, सुचेता कडेथानकर यांचेही त्यांना साहाय्य झाले. 

(लेखक लोकमत वृत्तपत्रसमूहात उपवृत्तसंपादक आहेत.)

Web Title: K2K - A thrilling journey on bicycle from Kashmir to Kanyakumari!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.