टीम इंडिया सध्या अडचणीत
By admin | Published: October 28, 2015 10:27 PM2015-10-28T22:27:49+5:302015-10-28T22:27:49+5:30
भारतीय क्रिकेट संघ सध्या अडचणीतून जात आहे. त्याचवेळी योग्यप्रकारे समतोल साधेल असा संघ निवडला जावा, असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दिला आहे
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या अडचणीतून जात आहे. त्याचवेळी योग्यप्रकारे समतोल साधेल असा संघ निवडला जावा, असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दिला आहे. अमेरिकेत पुढील महिन्यात होणाऱ्या क्रिकेट आॅल स्टार्स मालिकेसाठी सचिनने मुंबईत कसून सराव केला. यानंतर त्याने टीम इंडियाविषयीचे मत व्यक्त केले.
सचिन म्हणाला की, सध्याचा आपला संघ उत्तमच आहे. मात्र प्रत्येक संघाला कधीना कधी अशा अडचणीच्या काळातून जावेच लागते. शिवाय खेळामध्ये जय- पराजय होत राहतात. अनेकदा मनाविरुद्ध गोष्टी घडतात. टीकाकारांनीही संघाच्या पराभवानंतर आपला निर्णय देऊ नये. क्रिकेटविषयी आपण खुप जोश राखून असतो. मात्र त्याचबरोबर थोडा संयम देखील बाळगावा.’
एकदिवसीय मालिका गमविल्यानंतर टीम इंडियावर फलंदाजी क्रमावरून कठोर टीका झाली. मात्र सचिनने यावर प्रतिक्रीया देण्यास नकार देत, मी संघाचा भाग नसल्याने काही माहिती नसताना मत मांडणे योग्य नसल्याचे त्याने सांगितले.
विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ प्रशिक्षकाविना खेळत असून टीम इंडियाचा प्रशिक्षक भारतीय असावा की परदेशी या प्रश्नावर सचिन म्हणाला की, प्रशिक्षक कुणीही असो टीम इंडियाला यावरून फरक पडत नाही. परंतु तो प्रशिक्षक सक्षम असावा असे स्पष्ट मत सचिनने मांडले. (वृत्तसंस्था)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बदललेल्या नियमांबाबत सचिन म्हणाला की, बदललेल्या नियमांमुळे खूप मोठा परिणाम किंवा बदल झाला आहे. ज्यावेळी मी खेळत होतो तेव्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार क्षेत्ररक्षकांचा नियम होता. परंतु आज एकदिवसीयचे जवळपास सर्वच नियम बदलले आहेत. केवळ चार क्षेत्ररक्षकांना सीमारेषेवर ठेवू शकत असल्याने गोलंदाजांवर मोठे दडपण आलेले असते.
आयसीसीसीने बदललेल्या नियमांमुळे फलंदाजांना खूप मोठा फायदा मिळत असून ते एकदिवसीय सामन्यात विशाल धावसंख्या उभारताना दिसतात. ज्या फटक्यांचा कधी विचारही केला जाऊ शकत नव्हता असे फटके आज टी-२० क्रिकेटमध्ये खेळले जात आहेत. यामुळेच संघाच्या धावसंख्येत खूप मोठी वाढ होत आहे.
- सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू