वन-डे क्रिकेटसाठी ४०० धावा चांगल्या नाहीत
By admin | Published: October 29, 2015 10:25 PM2015-10-29T22:25:37+5:302015-10-29T22:25:37+5:30
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील मुंबईत झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारतीय गोलंदाजांसाठी कठीण होता. खेळपट्टी सपाट होती, त्यावर गोलंदाजांसाठी काहीही नव्हते
रोहित नाईक, मुंबई
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील मुंबईत झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारतीय गोलंदाजांसाठी कठीण होता. खेळपट्टी सपाट होती, त्यावर गोलंदाजांसाठी काहीही नव्हते. त्यामुळेच इतकी मोठी धावसंख्या उभी करता आली. परंतु हे क्रिकेटसाठी निश्चित चांगले नाही, अशा शब्दांत आॅस्टे्रलियाचा माजी दिग्गज जलदगती गोलंदाज ब्रेट ली याने आपली निराशा व्यक्त केली.
ऐकू न येणाऱ्या व्यक्तींसाठी ब्रेट ली याने गुरुवारी मुंबईत साऊंड्स आॅफ क्रिकेट या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी ली याने ‘लोकमत’सह संवाद साधला. मुंबईतील भारत-द. आफ्रिका सामन्याविषयी लीने सांगितले की, सपाट खेळपट्टीवर गोलंदाजांसाठी काहीही नसते. मी कायमच वेगवान गोलंदाजांसाठी मदतशीर ठरेल अशा खेळपट्टीच्या बाजूने होतो. कारण ४३८ धावा एकदिवसीय सामन्यासाठी खूप जास्त आहेत. त्यामुळे असा आक्रमक खेळ क्रिकेटसाठी निश्चितच चांगला नाही.
५ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी लीने भारतीय गोलंदाजांना सल्ला दिला की, सुरुवातीलाच बळी घेऊन प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवर ठेवून त्यांना जास्त संधी देऊ नका. कामगिरीत सातत्य ठेवा. तसेच ईशांत शर्मा भारतासाठी महत्त्वाचा गोलंदाज असून, त्याची कामगिरी निर्णायक ठरेल. एका सामन्याच्या बंदीमुळे तो पहिल्या कसोटीस मुकणार असल्याने भारताला त्याची कमी भासेल, असेही ली याने सांगितले.
आधुनिक क्रिकेटमध्ये गोलंदाजांकडून आखूड टप्प्याच्या तुलनेत यॉर्कर चेंडूचा वापर कमी होतो, यावर या दिग्गज गोलंदाजाने सांगितले की, यॉर्कर टाकणे ही एक कला आहे. या चेंडूवर फलंदाजांची नेहमी भंबेरी उडते. मात्र आज फलंदाज आक्रमक झाले आहेत. ते फटका मारण्याआधी दोन-तीन पाऊले पुढे येतात आणि अशा वेळी यॉर्कर चेंडूला लोअर फुलटॉस खेळून सीमारेषेबाहेर टोलावला जातो. त्यामुळे गोलंदाजाला स्थिरवण्याची संधी मिळत नाही. कदाचित यामुळे आज कमी प्रमाणात यॉर्कर पाहायला मिळत आहेत.