बेलापूरमधून नाईकांचा मार्ग खडतर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 12:04 AM2019-05-27T00:04:15+5:302019-05-27T00:04:24+5:30

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे राजन विचारे यांना जवळपास ८० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.

Naik route from Belapur? | बेलापूरमधून नाईकांचा मार्ग खडतर?

बेलापूरमधून नाईकांचा मार्ग खडतर?

Next

- कमलाकर कांबळे
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे राजन विचारे यांना जवळपास ८० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. विशेषत: माजी मंत्री गणेश नाईक यांच्या बेलापूर विधानसभा क्षेत्रातून विचारे यांना ४० हजारांची आघाडी मिळाली आहे. मतांची ही आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धडकी भरविणारी आहे. विशेषत: विचारे यांचे मताधिक्य राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांना धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे.
लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत राजन विचारे यांनी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांचा जवळपास दोन लाख मतांनी पराभव केला होता. बेलापूर मतदारसंघातून विचारे यांनी तब्बल ३५ हजार मतांची आघाडी घेतली होती. या वेळी त्यांना ४० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. मागील पाच वर्षांत बेलापूरमध्ये युतीची ताकद वाढल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत बेलापूर विधानसभा क्षेत्रातून गणेश नाईक यांचा अवघ्या दीड हजार मतांनी पराभव झाला होता. ऐनवेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या मंदा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर सहा महिन्यांत झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी आपली सत्ता राखली; परंतु विधानसभेतील पराभव त्यांच्या जिव्हारीचा लागला. त्यामुळे मागील साडे चार वर्षे त्यांनी सार्वजनिक जीवनातून फारकत घेतल्याचे दिसून आले. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी दुर्मीळ झाल्याने जनसामान्यांवरील त्यांची पकड सैल झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबोला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याचा प्रभाव सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीतही जाणवणार आहे. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरतील यात काही वाद नाही.
मागील पाच वर्षांत गणेश नाईकच नव्हे, तर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक, आमदार संदीप नाईक तसेच महापौर राहिलेले त्यांचे पुतणे सागर नाईक हेसुद्धा मागील पाच वर्षांत जनतेत फारसे रमताना दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला मानणाऱ्या मतदारांची संभ्रमावस्था झाली आहे. याचाच फटका या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना बसला. संजीव नाईक किंवा स्वत: निवडणूक न लढता गणेश नाईक यांनी आनंद परांजपे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले. उमेदवार आनंद परांजपे असले तरी निवडणूक मीच लढवित आहे, असे सांगत त्यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला; परंतु प्रचाराची अपेक्षित उंची गाठता आली नाही. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत विरोधी सूर आवळणारी काँग्रेससुद्धा या वेळी नाईकांच्या हाकेला धावून आली; परंतु मतदारांवर त्याचाही फारसा प्रभाव पडला नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबाबत यापेक्षा वेगळी परिस्थिती नसणार आहे. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत महापालिकेच्या माध्यमातून शहरात झालेल्या विकासकामांचा अजेंडा त्यांच्या निवडणूक प्रचारात होता; परंतु मागील पाच वर्षांत विविध कारणांमुळे शहरातील विकासकामांनाही खीळ बसली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवायची, हा मोठा प्रश्न नाईक यांना सतावणार आहे. आमदार झाल्यानंतर मंदा म्हात्रे या विविध पद्धतीने बेलापूर विधानसभा क्षेत्रात आपला प्रभाव वाढविण्यात यशस्वी झाल्या आहेत. शिवाय शिवसेनेचीही ताकद वाढल्याचे लोकसभा निवडणुकीतील मतदानांवरून स्पष्ट झाले आहे.
>२0१४ च्या निवडणुकीतील
मतांचा घोषवारा
लोकसभेच्या मागील निवडणुकीत राजन विचारे यांना बेलापूर मतदारसंघातून ९०,९८६ मते पडली होती. तर राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांना ६५,२०२ मतांवर समाधान मानावे लागले होते. या मतदारसंघातून विचारे यांनी २५,७८४ मतांची आघाडी घेतली होती.
>मागील विधानसभा निवडणुकीचा आढावा
विधानसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढली होती. बेलापूर मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे ५५,३१६ तर शिवसेनेचे विजय नाहटा यांना ५०,९८३ इतकी मते पडली होती. तर राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांना ५३,८१६ इतकी मते मिळाली होती. या वेळी लोकसभा निवडणुकीत सेनेचे उमेदवार राजन विचारे यांना मिळालेली मतांची आघाडी यामुळे या वेळेची विधानसभा निवडणूक नाईक यांना सोपी नाही, असाच राजकीय अंदाज आहे.

Web Title: Naik route from Belapur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.