राज्यातील दुष्काळाचा शहरवासीयांना विसर, वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:03 AM2019-05-13T00:03:30+5:302019-05-13T00:05:01+5:30

राज्यातील विविध जिल्हे आणि तालुके दुष्काळाने होरपळून निघाले आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे.

 Due to drought in the State, people forget about drinking water, use drinking water for washing | राज्यातील दुष्काळाचा शहरवासीयांना विसर, वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

राज्यातील दुष्काळाचा शहरवासीयांना विसर, वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

Next

नवी मुंबई : राज्यातील विविध जिल्हे आणि तालुके दुष्काळाने होरपळून निघाले आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. मात्र मुबलक पाणीसाठा असलेल्या नवी मुंबईत पाण्याची वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. अनेक ठिकाणी गळक्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय होत आहे. उद्याने आणि वाहने धुण्यासाठी शेकडो लीटर पाणी खर्ची घातले जात आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.
मान्सूनला आणखी एक ते दीड महिन्याचा अवकाश आहे. त्याअगोदरच राज्यात भयावह दुष्काळ पसरला आहे. विशेषत: मराठवाड्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. राज्य सरकारनेही मदतीचा हात दिला आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते दुष्काळग्रस्त विभागाचा दौरा काढून तेथील लोकांचे सांत्वन करीत आहेत.
स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका आहे. खालापूर तालुक्यातील स्वमालकीच्या मोरबे धरणातून महापालिका शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करते. गेल्या वर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस पडला. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाल्याने ७00 दशलक्ष पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. असे असतानाही यावर्षी धरणातील पाण्याची पातळी खालावल्याचे दिसून आले आहे. मोरबे धरणाची पातळी ८८ मीटर इतकी आहे. म्हणजेच ८८ मीटर पातळी गाठल्यानंतर धरणात १९0.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो. एप्रिलमध्ये या धरणात ९४.३७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक होता. हा जलसाठा साधारण १५ आॅगस्टपर्यंत पुरेल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी राज्यात सुरू असलेल्या पाणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिकेकडून कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. या शहरात विविध प्रांतासह महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून आलेले लोक राहतात. शहरात मुबलक पाणी मिळत असले तरी आपल्या मूळ गावी निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचा जपून वापर करायला हवा, असे जाणकारांचे मत आहे. दरम्यान, शहरातील एमआयडीसी परिसरातील झोपडपट्ट्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे काही सिडको वसाहतीत सुद्धा अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र ज्या विभागात अखंडित पाणीपुरवठा होत आहे, तेथे पाण्याची वारेमाप उधळपट्टी होताना दिसत आहे. नळाला पाइप लावून बिनधास्तपणे वाहने धुतली जात आहेत, तर काही ठिकाणी उद्यानासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. छतावरील पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहतानाचे दृश्य ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे. एमआयडीसी परिसरात गळक्या जलवाहिन्यांतून आजही मोठ्या प्रमाणात शेकडो लीटर पाणी वाहून जात आहे. यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

दिवसाला ३२७ एमएलडी पाणी
महापालिका मोरबे धरणासह उपलब्ध विविध स्रोतांच्या माध्यमातून दिवसाला एकूण ३२७ एमएलडी इतका पाणीपुरवठा करते. यात स्वत:च्या मोरबे धरणातून दिवसाला २१0 एमएलडी इतके पाणी घेतले जाते, तर एमआयडीसीकडून मिळणाºया ६0 एमएलडी पाण्याचा गावठाण आणि झोपडपट्ट्यांना पुरवठा केला जातो. सिडकोच्या हेटवणे धरणातून ३0 एमएलडी इतके पाणी घेतले जाते.

सिडको नोड्सनाही पाणीपुरवठा
मोरबे धरणासह एमआयडीसी आणि सिडकोकडून महापालिकेच्या जलकुंभात दिवसाला ३२७ एमएलडी इतका पाणीसाठा होतो. यापैकी खारघर, कळंबोली व कामोठे या सिडको नोड्सना महापालिका पाणीपुरवठा करते. तर जलकुंभातील जवळपास २७0 एमएलडी इतके पाणी उपनगरांना पुरविले जाते.

Web Title:  Due to drought in the State, people forget about drinking water, use drinking water for washing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी