जात, धर्म काढू नका; आमिषं, धमक्या देऊ नका... जाणून घ्या काय असते आचारसंहिता!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 09:47 PM2019-03-10T21:47:32+5:302019-03-10T21:50:00+5:30

निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत कसं वागायचं, कसं बोलायचं, याचे जे नियम निवडणूक आयोगाने तयार केले आहेत,

Lok Sabha Election 2019: What is Model Code of Conduct | जात, धर्म काढू नका; आमिषं, धमक्या देऊ नका... जाणून घ्या काय असते आचारसंहिता!

जात, धर्म काढू नका; आमिषं, धमक्या देऊ नका... जाणून घ्या काय असते आचारसंहिता!

googlenewsNext

निवडणूक... मग ती ग्रामपंचायतीची असो किंवा लोकसभेची; टीका, आरोप-प्रत्यारोप तर होतातच! पण, प्रचारादरम्यान एकमेकांची उणीदुणी काढताना काही पथ्यं प्रत्येक उमेदवाराने आणि नेत्याने पाळणं बंधनकारक असतं. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत कसं वागायचं, कसं बोलायचं, याचे जे नियम निवडणूक आयोगाने तयार केले आहेत, तीच आचारसंहिता. म्हणजेच, Model Code of Conduct. 

निवडणुका मुक्त आणि पारदर्शकपणे व्हाव्यात, या हेतूने ही मार्गदर्शक तत्त्वं ठरवण्यात आली आहेत. त्यालाच आचारसंहिता असं म्हटलं जातं. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर ही आचारसंहिता देशभर लागू झाली आहे. या आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. 

* आचारसंहितेच्या काळात पाळायची ठळक पथ्यं

टीका करायची असेल तर ती राजकीय धोरणांवर करा. कामं, वचनं पूर्ण केली नसतील त्यावर बोट ठेवा. परंतु, एखाद्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून टीका नको. 

मतदारांकडे मतं मागताना आपण केलेली कामं दाखवा. कुठल्याही वस्तूचं आमीष देणं किंवा धमकावणं हे कायद्यात बसत नाही. 

सत्ताधाऱ्यांनी पक्षाच्या कामासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करणं हा आचारसंहितेचा भंग ठरतो. मंत्री म्हणून दौऱ्यावर गेलेल्या नेत्याने त्याच्या पक्षाच्या बैठकीत सहभागी होणं योग्य नाही.

आचारसंहितेच्या काळात सरकारला नव्या घोषणा करता येत नाहीत किंवा एखाद्या योजनेसाठी निधीही जाहीर करता येत नाही. 

सगळेच पक्ष आपापल्या जाहीरनाम्यांमध्ये आश्वासनं देत असतात. परंतु, मतदारांना मोठ्या प्रमाणात प्रभावित करू शकतील, अशी आश्वासनं देणं आचारसंहितेत बसत नाही. 

मतदान केंद्रांमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि मतदार यांच्याशिवाय कुणालाही जाण्याची परवानगी नसते. म्हणूनच, मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर अनेक पक्षांचे कार्यकर्ते टेबल टाकून बसल्याचं पाहायला मिळतं.  

एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केल्यास त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करता येते. त्यानंतर, आयोगाचे निरीक्षक तपास करून कारवाईबाबत निर्णय घेतात. 

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर आदर्श आचारसंहितेचा मसुदा

Web Title: Lok Sabha Election 2019: What is Model Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.