अनिश्चितकालीन युद्धासाठी सज्ज होऊ या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 04:31 AM2019-05-19T04:31:53+5:302019-05-19T04:31:57+5:30

दहशतवाद ही आता केवळ एखाददुसऱ्या देशाची समस्या राहिलेली नसून ती जागतिक समस्या झाली आहे.

Get ready for an indefinite war ... | अनिश्चितकालीन युद्धासाठी सज्ज होऊ या...

अनिश्चितकालीन युद्धासाठी सज्ज होऊ या...

Next

- एम. एन. सिंग

अतिरेकी कारवाया होत नाहीत अथवा झाल्या नाहीत, असा क्वचितच देश असावा. न्यूझीलँड, आॅस्ट्रेलिया, फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम, स्पेन, युरोप, चीन, अमेरिका, श्रीलंका अशा विविध देशांमध्ये दहशतवाद फोफावला आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. इस्लामिक भारताची घोषणा करीत आयसिससारखी संघटनाही भारतात पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहे.

दहशतवादी संघटनाही आपल्या कारवायांसाठी लागणारी नियोजनव्यवस्था दरवेळी बदलत आहेत. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करीत घातपात घडवत आहेत. विचारपूर्वक आपले लक्ष्य ठरवत आहेत. कट आखण्यासाठी कमालीची गुप्तता पाळत आहेत. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनाही घातपातांच्या कटांची माहिती मिळण्यात अडथळे येत आहेत. सध्या महत्त्वाचे आहे ते अतिरेकी कारवायांसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आणि या संघटनांना पुरविली जाणारी आर्थिक रसद या दोन बाबींवर लक्ष केंद्रित करणे. तपासयंत्रणांना लवकरात लवकर याबाबतची माहिती मिळवून, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे हे ठरवावे लागेल. त्याशिवाय अतिरेकी संघटनांकडून वापरली जाणारी संपर्क आणि दळणवळण व्यवस्था, शस्त्रे हेही महत्त्वाचे विषय आहेत.
अलीकडच्या काही काळात, आपण फोर्स वनसारखी पथके तयार केली आहेत. पूर्वीपेक्षा आता आपली अधिक तयारी आहे, पण अजून खूपच मोठा पल्ला गाठायचा आहे. भारताला खूप मोठा सागरी किनारा आहे. तेथून कशी घुसखोरी करता येईल, याकडे दहशतवादी संघटनांचे लक्ष आहे. म्हणूनच तटरक्षक दल, नौदल आणि पोलीस या यंत्रणांमधील समन्वय आणखी वाढवावा लागेल. खोल समुद्रात केवळ तटरक्षक दल आणि नौदलाचाच वावर असतो. त्यांच्याकडून येणाºया माहितीवर पोलीस स्थानिक पातळीवर काम करीत असतात.


देशातील विमानतळे, सीमा भागातील कारवाया, बंदरांमध्ये होणाºया हालचाली यावर करडी नजर ठेवावी लागेल. सध्या काश्मीर आणि पंजाबच्या सीमा भागात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर होत आहेत. दुसरीकडे बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावर भारतात घुसखोरी होत असते. या पार्श्वभूमीवर या महत्त्वांच्या ठिकाणी करडी नजर ठेवावी लागेल. सीमा भागातून घुसखोरी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. गुप्तवार्ता मिळविण्यासाठी स्थानिक तपासयंत्रणांना केंद्रीय यंत्रणांवर अबलंवून राहावे लागते. तेथून माहिती मिळवितानाच स्थानिक यंत्रणांनीही आपली क्षमता वाढविणे आवश्यक आहे. २६/११च्या मुंबईवरील दहशदवादी हल्ल्याआधी अतिरेकी डेव्हिड हेडली याने मुंबईला भेट देत अनेक ठिकाणांची रेकी केली. शिवसेना भवनसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती घेतली. त्यासाठी त्याने येथे आपला सामाजिक संपर्कही वाढविला. या सगळ्याचा कुणालाच संशय आला नाही. आपल्या यंत्रणा केवळ कायदा आणि सुव्यवस्था आणि राजकीय घडामोडींमध्ये अडकून पडतात. मुंबई पोलीस तपास करीत असताना काही तपशील त्यांच्या हाती येतो. त्याची खातरजमा करावी लागते. त्यात काही काळ जातो. म्हणूनच स्थानिक पातळीवर सक्षम गुप्तचर विभाग तयार केले गेले पाहिजेत. अर्थात, हे मोठे काम आहे, पण धोकाही मोठा असल्याने भविष्यात ते करावेच लागेल.


एकूणच आता आपल्याला विश्रांती घेण्याची परवानगी नाही. देशाच्या भागाभागांत या संघटना हस्तकांमार्फत पोहोचल्या आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर अगदी अंतर्गत भागातही त्या पसरल्या आहेत. या संघटनांचा अजेंडा पाहिला, तर दीर्घकालीन लढाईला आपण सज्ज झाले पाहिजे.
(लेखक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत.)

Web Title: Get ready for an indefinite war ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.