EXCLUSIVE - गो इंडिया गो बॅक, वी वॉन्ट फ्रीडम..

By admin | Published: September 2, 2016 02:46 AM2016-09-02T02:46:10+5:302016-09-02T11:49:23+5:30

‘वन स्लोगन वन ट्रॅक, गो इंडिया गो बॅक’, ‘हम क्या चाहते है आझादी, मोदी से लेंगे आझादी, महबुबासे लेंगे आझादी’... काश्मीर खोऱ्यातील संचारबंदी उठविण्याचा, तसेच येत्या

EXCLUSIVE - Go India Go Back, We Want Freedom .. | EXCLUSIVE - गो इंडिया गो बॅक, वी वॉन्ट फ्रीडम..

EXCLUSIVE - गो इंडिया गो बॅक, वी वॉन्ट फ्रीडम..

Next

- समीर मराठे/ सुधीर लंके,  श्रीनगर

‘वन स्लोगन वन ट्रॅक, गो इंडिया गो बॅक’, ‘हम क्या चाहते है आझादी, मोदी से लेंगे आझादी, महबुबासे लेंगे आझादी’... काश्मीर खोऱ्यातील संचारबंदी उठविण्याचा, तसेच येत्या काही दिवसांत खोऱ्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी काश्मीरमध्ये अजूनही अशा घोषणा धुमसताना दिसताहेत आणि तरुणांनी हातातील दगडही अद्याप खाली ठेवलेले नाहीत.
हिज्बुल मुजाहिदनचा कमांडर बुरहान वनी लष्करी कारवाईत मारला गेल्यानंतर खोऱ्यात सुरक्षा दले व तरुणांत हिंसाचार उसळला आहे. काश्मिरी जनतेने पहिल्यांदाच ५२ दिवसांची संचारबंदी अनुभवली. सोमवारी ही संचारबंदी उठली, मात्र त्यानंतरही हुर्रियतने बंद मागे
घेतला नसल्याने जनजीवन
पूर्वपदावर आलेले नाही. रोज तरुणांकडून सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू आहे.
‘टीम लोकमत’ने श्रीनगर शहर व ग्रामीण भागात फिरताना हा तणाव पावलोपावली अनुभवला. ‘इंडियन डॉग गो बॅक’ व ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा येथे ठिकठिकाणी वाचायला मिळतात. दगडफेकीच्या भीतीमुळे स्थानिक नागरिक घराबाहेर पडत नाहीत. हॉटेल्स, दुकाने, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये सर्व ठप्प आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरच जाऊ दिले जात नाही. निर्मनुष्य रस्ते, सर्वत्र बंदुकधारी सुरक्षारक्षक, काचा फुटलेली वाहने हे श्रीनगर शहर तसेच खेड्यापाड्यांचे चित्र आहे.
दगडफेकीला सुरक्षारक्षकही सुरुवातीला दगडांनी व नंतर बंदुकांनी प्रत्युत्तर देत आहेत. श्रीनगरमधील संबलगाव, जुन्या सचिवालयाचा परिसर, जहांगीर चौक, लाल चौक या परिसरात फिरताना अघोषित संचारबंदी व दगडफेकीमुळे असंख्य घरांच्या काचा फुटलेल्या दिसल्या. जमाव केव्हा दगडफेक करेल याचा भरवसा नसल्याने वाहनचालक भयग्रस्त आहेत. रुग्णवाहिकांनाही रस्त्यांवरुन जाऊ दिले जात नाही. रुग्णवाहिकांत खरोखरच रुग्ण किंवा डॉक्टर आहेत का, याची खातरजमा केली जाते.
जम्मू ते श्रीनगर हे २९० किलोमीटरचे अंंतर. इथे दर दोनशे मीटरवर केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) जवान तैनात असतो. सीआरपीएफचे ७६ हजारहून अधिक जवान खोऱ्यात आहेत. अमरनाथ यात्रेसाठी पाठविलेले ३६ हजार जवान काश्मीरमध्येच आहेत. शिवाय सीमा सुरक्षा दल व आता लष्करही तैनात आहे. सुरक्षेचा आकडा लाखांच्या घरात आहे. संचारबंदी हटली असली तरी तणाव कायम असल्याने प्रवासी वाहने व पर्यटक श्रीनगरमध्ये यायला तयार नाहीत. त्यामुळे श्रीनगरची सर्व हॉटेल्स ओस आहेत.
परिस्थिती सामान्य होईपर्यंत पेट्रोल-डिझेलची वाहतूक बंद करण्याचा निर्णय तेल वाहतूक करणाऱ्या ट्रक-टॅँकर चालकांच्या संघटनेने घेतल्याने परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. आंदोलकांनी या वाहनांच्या काचाही फोडल्याने, वाहनचालकांना मारहाण झाल्याने संघटनेने हा निर्णय घेतला आहे. (क्रमश:)

हुर्रियतचे कॅलेंडर : धार्मिक ठिकाणे, मोहल्ला, चौकात
संचारबंदी हटल्यानंतरही हुर्रियतने बंद कायम ठेवला आहे. हुर्रियत वेळोवेळी संपकाळातील कृतीकार्यक्रमच नागरिकांना देत आहे. यापूर्वीच्या कॅलेंडरमधून त्यांनी १ सप्टेंबरपर्यंत बंद पुकारला होता. बुधवारी पुन्हा कॅलेंडर जाहीर केले असून २ ते ८ तारखेपर्यंत बंद पाळण्याचा आदेश दिला आहे.
सकाळी सहा ते सायंकाळी सहा या काळात बंद पाळून रात्री व्यवहार करा, श्रीनगरकडे येणारा महामार्ग, आपल्या गल्ली- मोहल्ल्यात येणारे रस्ते कोणत्याही मार्गाने रोखा, आझादी मार्च काढा, महिलांचा मार्च काढा, सुरक्षा दलांच्या धरपकडीपासून तरुणांना वाचवा, ‘जुहार’ आणि ‘असर’ रस्त्यांवर करा, असा आदेश या कॅलेंडरमध्ये देण्यात आला आहे.
हे कॅलेंडर धार्मिक ठिकाणे, मोहल्ला, चौकात चिकटविण्यात आले आहे. कॅलेंडरमधील आदेश धुडकावल्यास होणाऱ्या आर्थिक व शारिरीक हानीस आम्ही जबाबदार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सफरचंद बाजारातच न आणण्याचा इशारा
सफरचंद हे काश्मीरचे एक प्रमुख उत्पादन. ती बाजारात आणण्याची वेळ झाली आहे. मात्र, सफरचंदसुद्धा काश्मीर बाहेर जाऊ द्यायचे नाही, असा निर्णय आम्ही घेतला असल्याचे महम्मद लतीफ या व्यावसायिकाने सांगितले.
हुर्रियतच्या बंदमुळे अनेक गरिबांची रोजीरोटी बंद आहे. अशा लोकांना इतर समाज मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले. बहुतेकांनी सहा महिन्यांचे रेशन भरून ठेवले आहे. त्यामुळे बंद चालला तरीही आमची तयारी आहे. मात्र यावेळी आम्ही ‘आझादी’ अथवा लष्करमुक्त काश्मीर घेऊनच थांबू, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

सलमानची ‘ट्युबलाइट’ आता हिमाचलात पेटणार !
बॉलीवूडचा सुलतान सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाचे शूटिंगही या आठवड्यात काश्मीर खोऱ्यात सुरू होणार होते. अशांतता पाहता हे चित्रीकरण हिमाचल प्रदेशात हलविण्यात आले आहे.

Web Title: EXCLUSIVE - Go India Go Back, We Want Freedom ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.