ईशान्य भारत काँग्रेसमुक्त करण्याचा भाजपाचा मनसुबा, अमित शहा आज ठरवणार स्ट्रॅटेजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 02:30 PM2017-09-05T14:30:23+5:302017-09-05T14:35:35+5:30
ईशान्य भारतातील आठ पैकी पाच राज्यांमध्ये भाजपाप्रणीत रालोआची सत्ता असून अन्य राज्यांमधूनही काँग्रेसचे उच्चाटन करण्याचा भाजपानं चंग बांधला आहे. या राज्यांमधल्या स्थानिक सहकारी पक्षांशी भाजपा अध्यक्ष आज चर्चा करणार असून काँग्रेसमुक्त ईशान्य भारताच्या दिशेने मोर्चेबांधणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
नवी दिल्ली, दि. 5 - ईशान्य भारतातील आठ पैकी पाच राज्यांमध्ये भाजपाप्रणीत रालोआची सत्ता असून अन्य राज्यांमधूनही काँग्रेसचे उच्चाटन करण्याचा भाजपानं चंग बांधला आहे. या राज्यांमधल्या स्थानिक सहकारी पक्षांशी भाजपा अध्यक्ष आज चर्चा करणार असून काँग्रेसमुक्त ईशान्य भारताच्या दिशेने मोर्चेबांधणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
नवी दिल्लीमध्ये आज अमित शाह, ईशान्य भारतातील पाच मुख्यमंत्री, तीन माजी मुख्यमंत्री आणि नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स (नेडा)च्या अन्य सहकारी पक्षांची पूर्ण दिवसभराची बैठक आहे. सुरक्षित सीमा, राष्ट्रीय एकात्मता, एकात्मिक विकास हे बैठकीचे मुख्य मुद्दे असल्याचे भाजपाचे सरचिटणीस भुपेंदर यादव यांनी सांगितले.
ईशान्य भारतामध्ये भाजपाचे काही अस्तित्व नव्हते, परंतु केंद्रात 2014 मध्ये सत्ता आल्यानंतर भाजपाने ईशान्य भारतात आपली सगळी शक्ती पणाला लावली आहे. भाजपा व त्यांचे सहकारी पक्ष आसाम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, मणीपूर व सिक्कीममध्ये सत्तेत आहेत. यादव यांनी सांगितले की, "मेघालय, मिझोराम या काँग्रेसशासित राज्यात व त्रिपुरा या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे."
मेघालय व त्रिपुरा या दोन राज्यांमध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये विधानसभेच्या निवडुका होणार आहेत तर मिझोराममध्ये याच वर्षी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. या प्रदेशाचा एकात्मिक विकास व्हावा हे आमचे उद्दिष्ट्य आहे तसेच सुरक्षित सीमा व राष्ट्रीय एकात्मता हे आमचे लक्ष्य असल्याचे यादव म्हणाले. काँग्रेसमुक्त ईशान्य भारताच्या दिशेने आमची वाटचाल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बीफबद्दलच्या भाजपाच्या विरोधी भूमिकेबाबत विचारले असता भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, ईशान्य भारतात बीफ हे पारंपरिक खाणं असून नेडा स्थानिक परंपरांचा सन्मान करते आणि कुणी काय खावं हा लोकांचा वैयक्तिक प्रश्न असल्याची नेडीची भूमिका आहे.