त्यावेळी सपा-बसपा आघाडीने उडवली होती भाजपाची दाणादाण, आता असे असेल मतांचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 05:10 PM2019-01-13T17:10:39+5:302019-01-13T17:16:08+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी सपा आणि बसपाने आघाडीची घोषणा केल्याने उत्तर प्रदेशात नव्या राजकीय समीकरणांची मांडणी झाली आहे. मात्र सपा आणि बसपाने आघाडी करून निवडणूक लढवण्याची पहिलीच वेळ नाही.

in 1993 SP-BSP alliance win in Uttar Pradesh | त्यावेळी सपा-बसपा आघाडीने उडवली होती भाजपाची दाणादाण, आता असे असेल मतांचे गणित

त्यावेळी सपा-बसपा आघाडीने उडवली होती भाजपाची दाणादाण, आता असे असेल मतांचे गणित

googlenewsNext
ठळक मुद्देसपा आणि बसपाने आघाडीची घोषणा केल्याने नव्या राजकीय समीकरणांची मांडणी झाली आहेसपाचे मुलायम सिंह यादव आणि बसपाचे तत्कालीन सर्वेसर्वा काशीराम यांनी 1993 मध्ये विधानसभेसाठी आघाडी केली होती. या आघाडीने राम मंदिर आंदोलनामुळे उधळलेल्या भाजपाच्या वारूला लगाम घालून पराभूत केले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 2014 प्रमाणे मतदान झाले तरी भाजपाला अर्ध्याहून अधिक जागांवर पाणी सोडावे लागणार आहे.

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीसाठी सपा आणि बसपाने आघाडीची घोषणा केल्याने  उत्तर प्रदेशात नव्या राजकीय समीकरणांची मांडणी झाली आहे. या आघाडीमुळे 2014 साली उत्तर प्रदेशात दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. सपा आणि बसपाने आघाडी करून निवडणूक लढवण्याची पहिलीच वेळ नाही. याआधी राम मंदिराचे राजकारण ऐन बहरात असतानाही सपा आणि बसपाने आघाडी करून भाजपाला पराभूत करण्याची किमया साधली होती. दरम्यान, सध्याही मतांची आकडेवारी आणि जातीय समीकरण या पक्षांच्या बाजूने असल्याने  मायावती आणि अखिलेश यादव यांची बुआ-बबुआची जोडी कोणती कमा दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

25 वर्षांपूर्वी राम मंदिर आंदोलनादरम्यान बाबरी मशिदीचा विध्वंस झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील कल्याण सिंह सरकार बरखास्त करण्यात आले होते. तसेच राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी सपाचे मुलायम सिंह यादव आणि बसपाचे तत्कालीन सर्वेसर्वा काशीराम यांनी 1993 मध्ये विधानसभेसाठी आघाडी केली होती. या आघाडीने राम मंदिर आंदोलनामुळे उधळलेल्या भाजपाच्या वारूला लगाम घालून पराभूत केले होते. त्यावेळी 422 जागा असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेत सपाला 109, बसपाला 67 तर भाजपाला 177 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी सपा आणि बसपा आघाडीला 29.06 टक्के मते मिळाली होती. तर भाजपाला 33.3 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर जनता दलाचा पाठिंबा घेऊन सपा-बसपाने सरकार स्थापन केले होते. ''मिले मुलायम-कांशीराम, हवा हो गए जय श्रीराम'' हा नारा तेव्हा उत्तर प्रदेशात प्रसिद्ध झाला होता.  दरम्यान, उत्तर प्रदेशातील राजकीय इतिहासात कुप्रसिद्ध झालेल्या गेस्ट हाऊस प्रकरणानंतर ही आघाडी मोडीत निघाली. तसेच सपा आणि बसपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये हाडवैर निर्माण झाले होते. 


दरम्यान, नरेंद्र मोदींच्या उदयानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सपा आणि बसपाचा दारुण पराभव होऊन त्यांच्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कटू इतिहास विसरून दोन्ही पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय बेरीज वजाबाकी नव्या समीकरणाद्वारे होणार आहे. समजा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 2014 प्रमाणे मतदान झाले तरी भाजपाला अर्ध्याहून अधिक जागांवर पाणी सोडावे लागणार आहे.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाल 71 आणि मित्र पक्ष असलेल्या अपना दलला 2 जागा मिळाल्या होत्या. भाजपा आणि अपना दलला मिळून 43.63 टक्के मते मिळाली होती. तर सपा आणि बसपाला एकत्रित मिळून 42.12 टक्के मते मिळाली होती. आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघाप्रमाणे या मतांची विभागणी केल्यास 41 जागांवर सपा आणि बसपाचे मताधिक्य भाजपापेक्षा अधिक आहे. तर त्यात आरएलडीची मते जोडल्यास हा आकडा 42 मतदारसंघांवर जातो. 

तर 2017 च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे मतदान झाल्यास भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना मिळून 41.35 टक्के मते मिळतील. तर सपा आणि बसपाच्या मतांची एकत्रित बेरीज  44.05 एवढी होते. यामध्ये आरएलडीच्या मतांचा समावेश केल्यास हा आकडा 45.83 एवढा होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजपाचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 2017 साली उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 312 आणि त्याच्या मित्र पक्षांना 13 जागांवर विजय मिळाला होता. तर सपाला 47, बसपाला 19 आणि काँग्रेसला केवळ 7 जागांवर विजय मिळाला होता. 

Web Title: in 1993 SP-BSP alliance win in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.