बिबट्या दारी आला, पण...

By अझहर शेख | Published: January 30, 2019 05:05 PM2019-01-30T17:05:39+5:302019-01-30T17:07:52+5:30

बिबट्या सुसाट सुरक्षित जागेच्या शोधात धावत असताना एक- दोन नव्हे तर तब्बल चार लोकांवर त्याने हल्ला केला. यामध्ये नेमका दोष कुणाचा? त्या पाहुण्या बिबट्याच्या की त्याला बिथरविण्यासाठी गोंधळ माजविणाऱ्या ‘बुध्दीमान’ समजल्या जाणा-या प्राण्याचा...हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच राहिला

The leopard came, but ... | बिबट्या दारी आला, पण...

बिबट्या दारी आला, पण...

googlenewsNext
ठळक मुद्देकुत्रे, डुकरांचा वावर नियंत्रणात आणावाबिबट्यासोबत सहजीवन जगण्याची कला नाशिककरांना आत्मसात करुन घ्यावी लागणार बिबट्या नेहमीच गावकुसाच्या आस-याने जगत आला.

अझहर शेख,नाशिक : बिबट्यानाशिककरांच्या दारी आला...पण, नाशिककरांकडून त्याला ज्या पध्दतीने वागणूक मिळाली ती माणुसकीला शोभेल अशी मुळातच नव्हती, परंतु बिबट्याला अधिकाधिक आक्रमक करून चवताळून हल्ले करण्यासाठी भाग पाडणारी नक्कीच होती हे सिध्द झाले. कारण बिबट्या सुसाट सुरक्षित जागेच्या शोधात धावत असताना एक- दोन नव्हे तर तब्बल चार लोकांवर त्याने हल्ला केला. यामध्ये नेमका दोष कुणाचा? त्या पाहुण्या बिबट्याच्या की त्याला बिथरविण्यासाठी गोंधळ माजविणाऱ्या ‘बुध्दीमान’ समजल्या जाणा-या प्राण्याचा...हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच राहिला आहे.

नाशिक जिल्हा म्हटला की गोदावरीचे प्रशस्त खोरे, सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील विविध गड-किल्ले, धरणे, कालवे, बागायती शेती असा भौगोलिक परिसराने समृध्द असलेला भू-भाग. जिल्हा जरी भौगोलिकदृष्ट्या समृध्द असल्याचे दिसत असले तरी या जिल्ह्यात समृध्द असे दाट किंवा मध्यम स्वरूपाचे वन अर्थात जंगल अस्तित्वात राहिलेले नाही, याला वन्यप्राणी जबाबदार नाही तर माणूसच जबाबदार धरला पाहिजे. नाशिकला एकेकाळी दंडकारण्य असेही म्हटले जात होते. पुराणकथेत नाशिकचा तसाच उल्लेख आला आहे, हे नाशिककरांनी विसरून चालणार नाही असो. सध्या नाशिकमध्ये विरळ प्रमाणात काही झाडी वृक्षराजीच्या स्वरूपात पहावयास मिळते. ऊस, मका, बाजरी, गहू अशा स्वरूपाच्या पिकांचे उत्पादन जिल्ह्यात होते. त्यामुळे या जिल्ह्यात आढळणारा मार्जार कुळाचा ‘अभिमन्यू’ अर्थात बिबट्या हा जंगलातला तर मुळीच नाही. उसासारख्या बागायती पिकामध्ये जन्माला येऊन तेथेच पाण्याने तहान आणि रानडुकरासारख्या प्राण्यांवर भूक भागवून मोठा झालेला नाशिक जिल्ह्यातला बिबट्या.

बिबट-मानव संघर्ष या जिल्ह्यातील ग्रामीण भागातच निर्माण होतो किंवा झाला असे नाही तर बिबट्याने आता या शहराची वेसदेखील ओलांडलेली आहे. त्याचा प्रत्यय नुकताच आठवडाभरापूर्वी नाशिककरांना आला. बिबट्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवास या जिल्ह्यात अपवादानेच राहिलेला आहे. त्यामुळे वन्यजिवाची ही प्रजाती खरे तर आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसून येते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. बिबट्या म्हटला की, त्याचा मूळ स्वभावच जंगल आणि मानवी वस्तीच्या काठावर राहून गुजराण करण्याचा. नैसर्गिक जैवविविधतेमध्ये हा एकमेव असा वन्यप्राणी आहे जो उपलब्ध अधिवासासोबत स्वत:ला हव्या तितक्या लवकर जुळवून घेण्यास अत्यंत पटाईत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. हा बिबट्या नेहमीच गावकुसाच्या आस-याने जगत आला. गावक-यांनाही त्याचे फारसे नवल वाटत नाही. जिल्ह्याच्या आदिवासी भागात तर अगदी गाव, पाडे, वस्तींवर बिबट्याचा फेरफटका असतोच. त्यामुळे आदिवासींना त्याचे फारसे नवल कधी वाटले नाही. वाघदेवता म्हणून पूर्वापार आदिवासी गावाच्या वेशीवर असलेल्या वाघोबाच्या मूर्तीला दिवाळीच्या पूर्वी वाघबारसच्या औचित्यावर पूजत आले आहे. वाघोबा कुळाचा हा वन्यप्राणी त्यांना कधी परका वाटलाच नाही किंबहुना त्यांनी तसं वाटूनही घेतले नाही. त्याच्या अस्तित्वाच्या खुणा त्यांना अनेकदा दिसतात आणि त्याची त्यांना भीती तर वाटतच नाही, मात्र समाधान होते. बिबट्याचे आश्चर्य अन् नवल वाटते ते फक्त शहरी माणसांना.

या नवलपोटीच मागील शुक्रवारी (दि.२५) वाट चूकू न गोदावरीचे खोरे ओलांडून आलेल्या या बिबट्याला शहरी माणसांनी सीमेंटच्या जंगलात ‘सळो की पळो’ करुन सोडले. त्याचा विपरीत परिणाम असा झाला की, या बिबट्याचा थरार टिपणा-या दोघा छायाचित्रकारांना त्याने सुसाट पळताना ‘पंजा’ मारला आणि एका वनरक्षकासह नगरसेवकावरही चाल केली. खरे तर पोलिसांनी बघ्यांची गर्दी काही प्रमाणात थोपवून धरली होती. त्यामुळे बिबट्या मोकळ्या भूखंडावरील झाडीझुडपाआडून आल्यानंतर नगरसेवकाला हातात बांबू घेऊन पुढे धावून जाण्याची आवश्यकताच नव्हती. कारण वनविभागाचे कर्मचारी त्यावेळी बिबट्याला भूलीचे औषध असलेले इंजेक्शन सोडण्याच्या पूर्णपणे तयारीत होते. बिबट्या नेमका झाडाझुडपातून मोकळ्या भूखंडावर आला आणि थेट भिडला हातात बांबू घेऊन पुढे आलेल्या नगरसेवकालाच. शेवटी तो वन्यप्राणी त्यालाही आपला जीव वाचविणे महत्त्वाचे वाटले आणि त्याने बांबू बघून धोका ओळखला आणि नगरसेवकावरच चाल करत जमिनीवर पाडले. याचवेळी दोघा पोलिसांनी धाव घेत नगरसेवकाला त्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी हातातील काठ्यांचा प्रहार केला. परिणामी बिबट्या अधिक चवताळला आणि त्याने नगरसेवकाला सोडले खरे; मात्र पुन्हा बंगल्यात उडी घेत लपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला बेशुध्द करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला आणि उभे राहिलेले आव्हान अधिक गंभीर बनले.
बिबट्याला पूरेपूर धोक्याची जाणीव झाल्याने तो प्रचंड आक्रमक झाला होता. त्याने बंगल्यातील पार्किंगच्या जागेत आश्रय घेतला याचवेळी बेशुध्द करण्याचा प्रयत्न वनकर्मचा-यांकडून झाला. सुदैवाने काहीअंशी वनकर्मचारी त्यामध्ये यशस्वीदेखील झाले. मात्र बिबट्या बिथरला आणि त्याने पार्किंगचा आश्रय सोडून बंगल्याच्या आवारात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. भूलीच्या औषधाची गुंगी बिबट्याच्या आक्रमकतेमुळे विलंबाने चढली तोपर्यंत त्याने बंगल्याच्या जवळच असलेल्या दोन छायाचित्रकारांवर हल्ले करुन गंभीर जखमी केले. अखेर गुंगीत आलेला बिबट्या चवताळून पळताना जाळीमध्ये अडकला आणि वनविभागाने त्याला पिंज-यात जेरबंद केले.
बिबट्याला रेस्क्यू करण्याचा अनुभव वनविभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या गाठीशी आहे; मात्र त्यावेळी जमलेल्या शेकडो नागरिकांनी त्याकडे लक्षच देणे पसंत केले नाही; किंबहुना तसा विश्वासही बाळगला नाही. गोंगाट, गोंधळ, दगड भिरकाविणे, हातात लाठ्या-काठ्या घेऊन बिबट्या बाहेर दिसला की त्यामागे पोलिस कर्मचा-यांचे धावत जाणे अशा या सर्व प्रकारामुळे बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी पुरेसा होणारा अर्धा तास अडीच तासावर जाऊन पोहचला व दुर्दैवाने चार नागरिक जायबंदी झाले. त्यामध्ये दोघांना गंभीर जखमी व्हावे लागले.

उसाच्या शेतात वाढलेल्या बिबट्यासारख्या वन्यप्राण्यासोबत सहजीवन जगण्याची कला नाशिककरांना अभ्यासाने आत्मसात करुन घ्यावी लागणार आहे, हाच एकमेव उपाय मनुष्य-बिबट संघर्षावर असू शकतो. माणसाच्या हातात आहे, वन्यप्राण्याचे हल्ले रोखणे; परंतू त्याने हे विसरता कामा नये, की वन्यप्राणी हे माणसांना नेहमीच टाळण्याचा प्रयत्न करतात. माणसांची चाहूल त्यांना नेहमीच धोक्याची वाटते आणि ते माणसांपासून लांब जाण्याचा प्रयत्नदेखील करतात हा प्रयत्न नाशिककरांनी सावरकरनगर भागात ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. बिबट्याचा तो धुमाकूळ केवळ आणि केवळ माणसांच्या वस्तीतून सुरक्षित बाहेर पडण्यासाठीचाच होता, हे समजून घेत बिबट्याच्या समस्येचा प्रश्न अति घाईघाईने किंवा वाचाळ वक्तव्याने चिघळविण्यापेक्षा दुरदृष्टी व अभ्यासाने निर्णय घेत सामंजस्यानेदेखील मनुष्यासारखा ‘बुध्दीमान’ प्राणी सहज सोडवू शकतो, इतकी आशा बाळगायला हरकत नाही.
--
‘जगा आणि जगू द्या’, यासाठी एवढेच करा...
सर्वप्रथम माणसाने बिबट्यासारख्या वन्यप्राण्यांची भटकंती रोखण्यासाठी आपले पशुधन सुरक्षितपणे बंदीस्त जागेत किमान संध्याकाळनंतर तरी ठेवावे.
लहान मुलांना शाळेतून किंवा शेतातून घरी घरी ये-जा करण्यासाठी एकटे येऊ देऊ नका.
बिबट्या अगदी क्वचितच प्रौढ व्यक्तीवर किंवा जमावाद्वारे एकत्र चालणा-या माणसांवर हल्ले करतो.
बिबट्याची समोरासमोर भेट झालीच, तर कधीही भीतीपोटी आक्रमकतेने वागण्याचा प्रयत्न करु नका अलगद हळुवारपणे बिबट्याला कुठल्याही धोक्याची जाणीव न होऊ देता त्याक डे दुर्लक्ष करत सावधानतेने तेथून निसटावे.
आपला परिसर गाव, शहरे स्वच्छ ठेवावी. या भागात असलेला कुत्रे, डुकरांचा वावर नियंत्रणात आणावा, ज्यामुळे अन्नाची संसाधने कमी होऊन बिबट्यासारखा वन्यप्राणी लांब पल्ल्याच्या क्षेत्रात भटकंती करण्यास सुरुवात करेल आणि नैसर्गिकरित्या त्यांची संख्या नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
शास्त्रीय अभ्यास आणि पारंपरिक ज्ञान असे सांगते की वन्यप्राणी माणसांना खूप घाबरतात. म्हणूननच माणसांमधील आपआपसांतील बोलणे शेतावर कामे करताना किंवा सकाळच्या वेळी निर्जन रस्त्यांवर समुहाने फेरफटका मारताना चालू ठेवणे गरजेचे आहे. रात्री शेतात जाताना विजेरीचा वापर व मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी वाजविण्यास प्राधान्य द्यावे. प्रकाशाचा किरण हा मानवप्राण्याची कृती दर्शवितो त्यामुळे वन्यप्राणी लांब राहण्याचा प्रयत्न करतात.
पाळीव प्राण्यांचे गोठे सुरक्षित व बंदीस्त ठेवावे. गोठ्यांचे दरवाजे भक्कम असावेत घराच्या दरवाजाच्या विरुध्द दिशेने गोठ्यांची दरवाजांची रचना असावी.
बिबट्यांची पिल्ले शेतात आढळून आली तर त्यांना अजिबात त्रास देऊ नये. त्यांना हात लावण्याचा मोह टाळावा, ‘सेल्फी’चा तर कटाक्षाने टाळलीच पाहिजे. वनविभागाशी संपर्क साधावा, त्यांची आई त्यांना वा-यावर सोडणार नाही तर अंधार पडल्यावर सुरक्षितरित्या ती घेऊन जाईल, त्याची प्रतीक्षा करावी.

Web Title: The leopard came, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.