जागतिक लोकसंख्या दिन; नागपूरच्या लोकसंख्येत ३६ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:38 AM2019-07-11T10:38:24+5:302019-07-11T10:40:46+5:30

मिहान, मेट्रोसारख्या प्रकल्पांच्या प्रचारामुळे रोजगाराच्या शोधात उपराजधानीकडे बाहेरील नागरिकांचा ओढा वाढला आहे. रोजगार आणि मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने इकडे धाव घेणाऱ्या स्थलांतरितांची संख्याही वाढत आहे.

World population day; Nagpur's population increased by 36 percent | जागतिक लोकसंख्या दिन; नागपूरच्या लोकसंख्येत ३६ टक्के वाढ

जागतिक लोकसंख्या दिन; नागपूरच्या लोकसंख्येत ३६ टक्के वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देविकासाच्या वेगावर स्थलांतरितांचा भारस्थानिक संस्थांचे नियोजन गडबडले

निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात केंद्रित होणाऱ्या औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासह शैक्षणिक सुविधांचीही वाढ होत असते. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा कल नेहमीच शहराकडे असतो. नागपूर शहर सध्या देशाच्या व राज्याच्या सत्तेचा केंद्र्रबिंदू आहे. त्यामुळे साहजिकच शहराच्या विकासाला गती मिळाली आहे.
मिहान, मेट्रोसारख्या प्रकल्पांच्या प्रचारामुळे रोजगाराच्या शोधात उपराजधानीकडे बाहेरील नागरिकांचा ओढा वाढला आहे. नागपूर हे राज्यातील एक मोठे शहर असून, रोजगार आणि मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने इकडे धाव घेणाऱ्या स्थलांतरितांची संख्याही वाढत आहे. गेल्या काही वर्षांत ही वाढ अधिक गतीने होत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियोजन गडबडले आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३६.७३ टक्के नागरिक बाहेरील (स्थलांतरित) आढळून आले आहेत. २०२१ पर्यंत यात अंदाजे ५ ते १० टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. स्थलांतरित नागरिकांत परप्रांतीय किती याबाबत ठोस आकडेवारी नसली तरी चारही बाजूने वाढण्याची क्षमता असल्याने उपराजधानी फुगू लागली आहे व त्यानुसार सोईसुविधांचे नियोजन महापालिकासारख्या संस्थांसाठी अडचणीचे ठरत आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ४६ लाख ५३ हजार ५७० इतक्या लोकसंख्येची नोंद करण्यात आली होती. यात २३ लाख ८४ हजार ९७५ पुरुष आणि २२ लाख ६८ हजार ५९५ महिलांचा समावेश होता. मात्र जनगणना करीत असताना नागपूर जिल्ह्यात १४ लाख ९३ हजार ९१४ लोकसंख्या ही बाहेरील (इतर जिल्ह्यातील वा इतर राज्यातील) आढळून आली आहे. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येत हे प्रमाण ३६.७३ टक्के इतके आहे. स्थलांतराची आकडेवारी लक्षात घेता स्थानिक नागपूरकरांना याचा फटका निश्चितच बसणार आहे. तो बसतोही आहे. नागपूर जिल्ह्यात कमी पल्ल्याचे अंतर गाठून स्थलांतरण करणाऱ्यांचे प्रमाण ४ लाख ५० हजार ७६६ इतके आहे. शहरीकरणाची आस आणि पोटाची भूक ही दोन प्रमुख कारणे वाढत्या स्थलांतरणामागे आहे.

भविष्यात लोंढे आणखी वाढणार
केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील वजनदार मंत्री नितीन गडकरी हे दोघेही नागपूरचे असल्याने सत्ता केंद्र नागपूर बनले आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प नागपुरात येत आहेत. मिहान प्रकल्प, आयआयएम, आयआयटी, एम्स, नॅशनल लॉ स्कूल आदी महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था येत आहेत. त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाºया संधी लक्षात घेता, येत्या काही वर्षांत नागपुरात बाहेरून येणाºयांची संख्या कधी नव्हे इतक्या झपाट्याने वाढण्याची शक्यता बळावली आहे.

१०० वर्षात चढउतार
१९११ ते १९७१ आणि २००१ ते २०११ या कार्यकाळात नागपूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वाढीच्या दरात चढउतार पाहायला मिळतो. १९०१ ते १९११ या दशकात लोकसंख्या वाढीचा दर ७.७२ टक्के इतका होता. पुढच्याच दशकात म्हणजे १९११ ते १९२१ या काळात तो कमी होऊन २.०३ टक्केपर्यंत खाली आला. त्यानंतर १९२१ ते ३१ या दशकात त्यात पुन्हा वाढ होऊन १८.६९ टक्के झाला. १९३१-४१ या दशकात पुन्हा कमी होऊन १२.७६ टक्के झाला. १९४१ ते १९५१ या दशकात पुन्हा १६.७६ टक्के वाढला. १९५१ ते १९८१ या काळात लोकसंख्या वाढीचा आलेख चढताच राहिला. १९८१ मध्ये ३३.२६ टक्के वाढ नोंदविण्यात आली. १९८१ ते १९९१ या दशकात पुन्हा घट झाली. तेव्हा २६.९७ टक्के लोकसंख्या वाढीचा दर नोंदविला गेला. १९९१ ते २००१ या दशकात लोकसंख्या वाढीचा दर २३.७४ टक्के होता. तो २००१ ते २०११ मध्ये १४.३९ टक्के झाला. २०११ पासून तो पुन्हा वाढल्याचे दिसून येत असून येणाºया काळात हे प्रमाण अधिक फोफावणार असल्याची शक्यता तज्ज्ञांद्वारे व्यक्त केली जात आहे.

शहराचा ओढा, गावे ओस
२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्या ४६ लाख ५३ हजार ५७० इतकी आहे. यातील ३१ लाख ७८ हजार ७५९ नागरिक शहरात, तर १४ लाख ७४ हजार ८११ नागरिक ग्रामीण भागात राहतात. शहरी नागरीकरणाची २००१ ते २०११ या वर्षातील ही वाढ २१.६२ टक्के इतकी आहे. १९९१-२००१ च्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरीकरणाचे प्रमाण २८.७० इतके आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढीचा विचार करता हे प्रमाण केवळ १.४५ टक्के आहे. त्यामुळे शहराकडे नागरिकांचा जास्त ओढा असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.

हिंगणा, कामठीत अधिक घनता
हिंगणा आणि कामठी हे दोन तालुके शहरालगत वसले आहेत; शिवाय औद्योगिकीकरणही या भागात होत आहे. त्यामुळे या परिसरातही शहरीकरणाचे प्रमाण अधिक वाढले आहे. या भागात जागांचे दर परवडण्यासारखे आहेत. शिवाय शहरालगत असल्याने या भागात राहण्याबाबत स्थलांतरित नागरिकांचा अधिक कल अहवालावरील आकडेवारीतून दिसून येतो. जिल्ह्यातील १४ ब्लॉकची आकडेवारी विचारात घेता हिंगणा तालुक्यात (५०.०२ टक्के), कामठीत (५९.७७ टक्के) आणि नागपूर ग्रामीणमध्ये १०० टक्के शहरीकरण झाले आहे.

Web Title: World population day; Nagpur's population increased by 36 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो