पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान; उज्ज्वल निकम यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:29 PM2018-08-13T12:29:18+5:302018-08-13T12:29:39+5:30

पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान आहे. हा देश दहशतवाद निर्माण करतो. त्याला पोसतो. तसेच, त्याचा भारताविरुद्ध वापर करतो, असे परखड मत प्रसिद्ध वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

Pakistan's rise to terrorism; Ujjwal Nikam's view | पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान; उज्ज्वल निकम यांचे मत

पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान; उज्ज्वल निकम यांचे मत

Next
ठळक मुद्देजनमंच जनगौरव व जनसेवक पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान आहे. हा देश दहशतवाद निर्माण करतो. त्याला पोसतो. तसेच, त्याचा भारताविरुद्ध वापर करतो, असे परखड मत प्रसिद्ध वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून दहशतवाद्यांविरुद्ध खटले चालविले आहेत.
अ‍ॅड. निकम यांच्या हस्ते रविवारी सेवानिवृत्त प्रा. मधुकर उपलेंचवार यांना जनमंच जनगौरव पुरस्कार तर, सरकारी अधिकारी अजय लहाने यांना जनमंच जनसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. उपलेंचवार यांनी ‘विद्यार्थी सहायक समिती’च्या माध्यमातून हजारो गरजू विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविले आहे. लहाने कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी आतापर्यंत अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. हे पुरस्कार जनमंच या सामाजिक संस्थेच्यावतीने दरवर्षी दिले जातात. जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. हा कार्यक्रम शंकरनगरातील राष्ट्रभाषा संकुलस्थित साई सभागृहात पार पडला.
निकम यांनी पाकिस्तानवर थेट नेम साधला. भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचे कट पाकिस्तानमध्ये शिजले होते. त्याचे पुरावे दिल्यानंतरही पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करीत नाही. भारताला आवश्यक सहकार्य देत नाही. पाकिस्तान हा भारताकरिता अतिशय धोकादायक देश आहे. त्यामुळे भारतीयांनी सतत सावधान राहून देशातील शांतता कायम ठेवली पाहिजे. वर्तमान काळात सोशल मीडियाचा सर्वाधिक गैरवापर होत आहे. डोकी भडकवणारे संदेश पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सत्य जाणूनच पुढील कृती केली पाहिजे. आजच्या परिस्थितीत तरुणांमध्ये देशप्रेमाचे बीज पेरणे आवश्यक झाले आहे असे निकम यांनी सांगितले.
शिक्षणामुळे लोक सुशिक्षित होतात. त्यांना सुसंस्कृत करण्यासाठी चांगल्या विचारांचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे. चांगले काम करणाऱ्याच्या आयुष्यात अनेक संकटे येतात. त्याविरुद्ध लढण्याची शक्ती आत्मविश्वासातून प्राप्त होते. संकटे आल्यानंतर कधीच निरुत्साही होऊ नका. मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका. संकटांवर मात करूनच यशाची शिखरे गाठता येतात. चांगले काम करताना प्रामाणिकपणाचा दुर्गुण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे असे मतही निकम यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी संचालन, जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांनी प्रास्ताविक तर, महासचिव नरेश क्षीरसागर यांनी आभार व्यक्त केले.

‘प्रकाशवाट’च्या शिक्षकांचा गौरव
जनमंचचा ‘प्रकाशवाट’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राबत असलेले शिक्षक अली, टाले, बांबल, सावरकर व देवके यांचा कार्यक्रमात गौरव करण्यात आला. इयत्ता नववीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची इयत्ता दहावीची तयारी करून घेण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम संपूर्ण विदर्भात तालुकास्तरावर राबविला जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. उपक्रमाचा लाभ मिळवून देण्यासाठी अली, टाले, बांबल, सावरकर व देवके या शिक्षकांनी तालुक्यातील ३७ गावे फिरून १०५ विद्यार्थी गोळा केले आहेत.

मी जनमंचचा अ‍ॅम्बेसडर
अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी ते कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता जनमंचचे अ‍ॅम्बेसडर होण्यास तयार असल्याची घोषणा केली. जनमंच अतिशय उत्तम कार्य करीत असून या संस्थेमुळे राज्यातील अनेक प्रश्न सुटले आहेत. या संस्थेचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यातून प्रेरणा मिळून राज्यात चळवळ उभी राहील. खटल्यांच्या निमित्ताने राज्यभर फिरत असतो. यादरम्यान जनमंचचा अ‍ॅम्बेसडर म्हणून कार्य करण्यास आपली तयारी आहे असे त्यांनी सांगितले.

शिक्षक-विद्यार्थ्यांत जिव्हाळा असावा
विद्यार्थ्यांशिवाय माझ्या व माझ्याशिवाय विद्यार्थ्यांच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. विद्यार्थी शिक्षकपरायण, शिक्षक विद्यार्थीपरायण, दोघेही ज्ञानपरायण व ज्ञान सेवापरायण असायला हवे. तसेच, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळ्याचे नाते असावे.
- प्रा. मधुकर उपलेंचवार

सार्वजनिक पैशांची उधळपट्टी नको
सरकारी अधिकाऱ्यांने विकासकामे करताना सार्वजनिक निधीची उधळपट्टी करू नये. निधी वाचवणे म्हणजे निधी गोळा करणे होय. सरकारी अधिकाऱ्यांची सध्याची अवस्था वाईट आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी व्यवस्थेशी भांडावे लागते.
- अजय लहाने

दोन्ही सत्कारमूर्ती सज्जनशक्तीचे प्रतीक
मधुकर उपलेंचवार व अजय लहाने हे दोन्ही सत्कारमूर्ती सज्जनशक्तीचे प्रतीक आहेत. दोघेही हिशेबी व्यक्ती नाहीत. त्यांनी स्वत:ला समाजाकरिता अर्पण केले आहे. स्वत: चांगले आयुष्य जगायचे सोडून ते वंचितांना आधार देण्यासाठी लढत आहेत.
- प्रा. शरद पाटील

Web Title: Pakistan's rise to terrorism; Ujjwal Nikam's view

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.