नागपूर जिल्ह्यातही आता लोकल मेट्रो रेल्वे धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 10:36 IST2018-02-28T10:36:18+5:302018-02-28T10:36:41+5:30

नागपूर शहरात मेट्रो रेल्वे धावणार असताना आता नागपूरहून बुटीबोरी, वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक व भंडारा या शहरांपर्यंत ‘लोकल मेट्रो रेल्वे’ सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविला आहे.

Local metro rail will run in Nagpur district too | नागपूर जिल्ह्यातही आता लोकल मेट्रो रेल्वे धावणार

नागपूर जिल्ह्यातही आता लोकल मेट्रो रेल्वे धावणार

ठळक मुद्देगडकरींनी दिला रेल्वेला प्रस्ताव वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक, भंडारापर्यंत सेवा पॅसेंजर बंद होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात मेट्रो रेल्वे धावणार असताना आता नागपूरहून बुटीबोरी, वर्धा, कामठी, कळमेश्वर, काटोल, रामटेक व भंडारा या शहरांपर्यंत ‘लोकल मेट्रो रेल्वे’ सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविला आहे. त्यांच्या सूचनेनुसार मेट्रो रेल्वेने प्रस्ताव सादर केला असून, तो आता लवकरच रेल्वे विभागाकडे सादर केला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास या मार्गावरील पॅसेंजर रेल्वे बंद केल्या जातील व रेल्वेच्या लाईन वापरून महामेट्रो त्यावर लोकल मेट्रो रेल्वे चालवेल. यामुळे वेळेची बचत होऊन प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध होईल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नागपूर शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आढावा बैठक घेतली. तीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. कृष्णा खोपडे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. समीर मेघे, प्रवीण दटके, संदीप जोशी यांच्यासह महापालिका, नासुप्र, रेल्वे, महामेट्रो, सिंचन, बांधकाम आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, रेल्वेचे स्टेशन व रुळ वापरून लोकल मेट्रो रेल्वे चालविण्याची महामेट्रोची योजना आहे.
सद्यस्थितीत या शहरांसाठी नागपूरहून पॅसेंजर ट्रेन चालविल्या जातात. मात्र, त्यांची गती सरासरी ४० किलोमीटर प्रति तासाहून कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ लागतो, शिवाय पॅसेंजर ट्रेनच्या वेळाही गैरसोयीच्या आहेत. याच मार्गांवर मेट्रोरेल्वेच्या धर्तीवर लोकल मेट्रो रेल्वे चालविली तर ताशी १२० किलोमीटरपर्यंतची गती मिळू शकते. वेळेची बचत होईल, शिवाय प्रवाशांना एसी प्रवास करण्याची सुविधा मिळेल. वेळ कमी लागणार असल्यामुळे रेल्वेकडून स्लॉट सहज उपलब्ध होतील. त्याचा नियमित रेल्वेसेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही. गडकरी यांनी या प्रस्तावाचे भक्कमपणे समर्थन केले.

Web Title: Local metro rail will run in Nagpur district too