देशाच्या हृदयस्थळी झाला दहशतवाद्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:52 AM2019-02-12T10:52:54+5:302019-02-12T10:57:47+5:30

भयानक बॉम्बस्फोट घडवून ज्या दहशतवाद्यांनी देशवासियांचे हृदय छिन्नविच्छिन्न करण्याचा प्रयत्न केला. त्या दोन दहशतवाद्यांच्या दहशतीचा अंत देशाच्या हृदयदस्थळी झाला.

End of terrorist at the heart of the country | देशाच्या हृदयस्थळी झाला दहशतवाद्याचा अंत

देशाच्या हृदयस्थळी झाला दहशतवाद्याचा अंत

Next
ठळक मुद्देस्फोटाच्या दोन जीवघेण्या मालिका दहशतवादी याकूब मेमन अन् मोहम्मद हनिफ

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भयानक बॉम्बस्फोट घडवून ज्या दहशतवाद्यांनी देशवासियांचे हृदय छिन्नविच्छिन्न करण्याचा प्रयत्न केला. त्या दोन दहशतवाद्यांच्या दहशतीचा अंत देशाच्या हृदयदस्थळी झाला. याकूब मेमन आणि मोहम्मद हनिफ हे ते दोन दहशतवादी असून, त्यांच्या पापाचा हिशेब नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील भेसूर भिंतीआड झाला. यासोबतच काळ सूड उगवतो, हे या दहशतवाद्यांच्या अंतानंतर पुन्हा एकदा चर्चेला आले.
बाबरी मशिदीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या जातीय दंगलीचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या चिथावणीतून आपल्या साथीदारांच्या मदतीने १९९३ ला मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली. कोणताही दोष नसताना या स्फोटांमध्ये शेकडो निरपराधांचे जीव गेले. शेकडो जणांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. या स्फोटातील दोषींची धरपकड आणि तपास सुरू असताना, १० वर्षांनी पुन्हा मुंबई हादरली.
गुजरातमध्ये घडलेल्या जातीय दंगलीचा सूड उगविण्यासाठी मोहम्मद हनिफने २००३ मध्ये गुजरात रिव्हेंज फोर्स तयार केली. पाच ते सात जणांच्या या कथित फोर्समध्ये हनिफची पत्नी फहमिदाही होती. या देशद्रोह्यांनी लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या मदतीने दुबईत कट रचला आणि झवेरी बाजारात स्फोट घडवून ३६ निरपराधांचा बळी घेतला, १३८ जणांना गंभीर जखमी केले तर, गेट वे आॅफ इंडियाजवळ स्फोट घडवून १६ जणांना मृत्यूच्या खाईत लोटले तर ३६ लोकांना गंभीर जखमा दिल्या. कोट्यवधींच्या संपत्तीचेही नुकसान केले. १० वर्षांच्या अंतराने झालेल्या या स्फोटाच्या मालिकांनी केवळ मुंबईच नव्हे तर अवघ्या देशाच्या हृदयाला जखमा झाल्या. पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे न्यायालयाने १९९३ च्या मुंबई स्फोटाच्या मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा सुनावली तर २००३ मधील
स्फोटाचा सूत्रधार मोहम्मद हनिफ, त्याची पत्नी फहमिदा तसेच साथीदार अशरतला फाशीची शिक्षा सुनावली. याकूबलाही नागपूरच्या कारागृहात आणि हनिफ तसेच त्याच्या पत्नीलाही नागपूरच्याच कारागृहात ठेवण्यात आले होते. ३० जुलै २०१५ ला याकूबला येथील मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.
हनिफ आणि त्याच्या पत्नीलाही नागपुरात फाशी देण्याचा निर्णय प्रलंबित असताना ९ फेब्रुवारीला हनिफवर काळाने झडप घातली. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. देशाची आर्थिक राजधानी हादरवून सोडणाऱ्या आणि शेकडो निरपराधांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या दोन दहशतवाद्यांचा देशाच्या हृदयस्थळी असा अंत झाला.

ती पुटपुटली, धाय मोकलून रडली
शनिवारी रात्री हनिफचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पुण्या-मुंबईतील नातेवाईकांना कळविण्यात आले. त्यानुसार, दोन मुली, मुलगा, एक जावई आणि हनिफचा एक मेव्हणा रविवारी सायंकाळी नागपुरात पोहचले. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना अज्ञात सुरक्षित स्थळी थांबवले. मेडिकलमध्ये हनिफचे शवविच्छेदन सुरू होते. तर, पोलिसांच्या गराड्यात त्याचे नातेवाईक बाहेर उभे होते. मध्यवर्ती कारागृहात महिला सेल मध्ये असलेल्या फहमिदासोबत मुला-मुलीचे फोनवरून बोलणे करून देण्यात आले. हनिफला शेवटचे एकदा बघायचे आहे, असे तिने नातेवाईकांना सांगितले.
नातेवाईकांनी पोलिसांना कळविले तर पोलिसांनी कारागृह प्रशासनाला कळविले. मुंबई-पुण्यात वरिष्ठ अधिकाºयांशी बोलणी झाल्यानंतर फहमिदाला हनिफचा चेहरा दाखविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सायंकाळी ६ च्या सुमारास मेडिकलमधून हनिफचा मृतदेह घेऊन निघालेली अ‍ॅम्बुलन्स थेट कारागृहाच्या आतमध्ये नेण्यात आली. कारण फाशीची कैदी असल्यामुळे फहमिदाला कारागृहाबाहेर काढणे शक्य नव्हते. तिला कारागृहाच्या मुख्य दाराच्या आतमध्ये (झडती परिसर) बसवून ठेवण्यात आले होते. अ‍ॅम्बुलन्समध्ये ठेवलेला हनिफचा मृतदेह, त्याचा चेहरा फहमिदाने बघितला. ती काही तरी पुटपुटली अन् नंतर धाय मोकलून रडली. ज्या फहमिदाने २५ ऑगस्ट २००३ ला अनेक आर्इंपासून त्यांची मुलं-मली, अनेकांच्या आयाबहिणी, तर अनेकींचे पती क्रूरपणे हिसकावून घेण्याचे पाप केले होते. त्या फहमिदाने मृत पती हनिफचा चेहरा बघून आक्रोश केला.

तीनवेळा मृत्युदंड, चारवेळा जन्मठेप, अजूनही बरेच काही !
न्यायालयाने दहशतवादी हनिफला शिक्षा सुनावता स्फोटाचा कट रचण्यापासून तो स्फोट घडविण्यापर्यंत एकूण १२ गुन्ह्यात वेगवेगळी (स्वतंत्र) शिक्षा ठोठावली होती. त्यानुसार, हनिफला तीन वेळा फाशी (मृत्युदंड), चार वेळा जन्मठेप, २६ वर्षांचा सश्रम कारावास आणि एकूण १ लाख, ७३ हजारांचा दंड भरायचा होता. मात्र, यातील कोणतीही शिक्षा पूर्ण झालेली नाही. हनिफला काळानेच मृत्यूच्या दाढेत ओढून नेले.

Web Title: End of terrorist at the heart of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.