‘फादर फिगर’ ठरू नये म्हणून अडवाणी, जोशींचा पत्ता साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 09:52 AM2019-04-01T09:52:57+5:302019-04-01T09:54:59+5:30

देशात भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. अशापरिस्थितील जुळवाजुळव करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे ‘फादर फिगर’ ठरले असते व मोदी-शहा यांचे महत्त्व कमी झाले असते. त्यामुळेच त्यांचा पत्ता कट करण्यात आला.

Advani, Joshi' ignored,because not to become Father figure | ‘फादर फिगर’ ठरू नये म्हणून अडवाणी, जोशींचा पत्ता साफ

‘फादर फिगर’ ठरू नये म्हणून अडवाणी, जोशींचा पत्ता साफ

Next
ठळक मुद्देमधुसूदन मिस्त्री यांची टीका महाराष्ट्रासह देशात काँग्रेसची ‘रिएन्ट्री’ होईल

कमलेश वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. अशापरिस्थितील जुळवाजुळव करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे ‘फादर फिगर’ ठरले असते व मोदी-शहा यांचे महत्त्व कमी झाले असते. त्यामुळेच त्यांचा पत्ता कट करण्यात आला. केशुभाई पटेल, सुरेश मेहता यांचेही असेच करण्यात आले होते, अशी टीका अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव व महाराष्ट्रासाठी नेमलेले निवडणूक निरीक्षक मधुसूदन मिस्त्री यांनी केली.
मिस्त्री यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बडोदा येथून निवडणूक लढविली होती. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघाचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ घेण्यासाठी मिस्त्री हे रविवारी नागपुरात दाखल झाले. दिवसभर त्यांनी स्थानिक नेते, माजी मंत्री, माजी आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत आढावा घेतला. महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाला ते दोनदा भेट देणार आहेत.
लोकमतशी विशेष बातचीत करताना मिस्त्री म्हणाले, विदर्भ एकेकाळी काँग्रेसचा गड होता. यावेळी पुन्हा विदर्भात काँग्रेसची ‘रिएन्ट्री’ होणार आहे. पक्षाचे नेते,कार्यकर्ते यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. कुठेही गटबाजी नाही. काँग्रेसला विजयी करणे व भाजपाला रोखणे, हेच प्रत्येकाने लक्ष्य निश्चित केले आहे. भाजपा महाराष्ट्रात पैशाच्या भरवशावर उमेदवार आयात करीत आहे. जनतेला हे चांगलेच माहीत आहे. त्यामुळे भाजपाचा आयात माल जनता यावेळी परत पाठवेल, अशी टीका त्यांनी केली.
गुजरातची जनता बऱ्याच वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आश्वासनांना पाहत आहे. भाजपा जिंकण्यासाठी मतांच्या धु्रवीकरणावर भर देते; मात्र यावेळी जनतेचा मूड बदलला आहे. विधानसभेत गुजरातच्या जनतेने मोदी-शहांना घाम फोडला. लोकसभेच्या सर्वेक्षणात २६ पैकी ६ ते ७ जागा काँग्रेसला दाखविण्यात आल्या आहेत. मात्र, चित्र यापेक्षा बरेचसे पालटलेले दिसेल. शेतकरी, शेतमजूर, गरीब, बेरोजगार युवकांशी मोदींना काहीच देणे-घेणे नाही. काही निवडक उद्योगपतींना अधिक श्रीमंत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पदवी घेतलेल्या युवकांना मोदी पकोडे विकायला सांगतात, ही एकप्रकारे सुशिक्षितांची थट्टाच असल्याची टीका त्यांनी केली.

राहुलजी ‘वायनाड’मधून लढण्याचा दक्षिण भारताला फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन जागांवर लढले होते. त्यावेळी त्यांना पराभवाची भीती होती का? राहुल गांधी हे अमेठीतून रेकॉर्ड मतांनी विजयी होतील, यात शंका नाही. मात्र, ‘वायनाड’मधूनही लढणार असल्यामुळे संपूर्ण दक्षिण भारतात याचा काँग्रेसला मोठा फायदा होईल, असा दावा त्यांनी केला. प्रियंका गांधी यांनी कुठून निवडणूक लढावी, याचा निर्णय पक्ष घेईल. मात्र, त्यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरावे, अशी माझ्यासह काँग्रेसजनांची इच्छा आहे. त्या जेथे लढतील तेथून त्या संपूर्ण परिसरात काँग्रेसची लाट येईल, असेही त्यांनी सांगितले.

गुजरातमध्येही राष्ट्रवादी सोबत येणार
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली; मात्र गुजरातमध्ये बिघाडी होताना दिसते, याकडे लक्ष वेधले असता मिस्त्री म्हणाले, गुजरातमध्येही आघाडी व्हावी, यासाठी हायकमांड प्रयत्नरत आहे. राहुल गांधी व शरद पवार यांच्यात चर्चा सुरू आहे. यातून नक्कीच मार्ग निघेल व राष्ट्रवादी सोबत आलेली दिसेल. राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी गुजरात काँग्रेस सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Advani, Joshi' ignored,because not to become Father figure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.