मराठी मातेशी एकरुप माहेश्वरी समाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 07:00 AM2019-06-09T07:00:00+5:302019-06-09T07:00:07+5:30
राजस्थानातील कायमच्या नापिकीला कंटाळून हा समाज आपले हुन्नर आजमाविण्यास निघाला. त्यातील अनेक जण महाराष्ट्रात आले आणि येथे रुजले.
आषाढी वारीत माहेश्वरी समाजाचीही दिंडी असते. यावरून माहेश्वरी माणूस मराठी मातीशी किती एकरूप झाला आहे हे कळून येईल. अशा या माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस अर्थात महेश नवमी येत्या ११ जून रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त...
सत्येंद्र राठी
माहेश्वरी...क्षत्रिय असलेला पण महेश अर्थात शंकर महादेवाच्या कृपादेशाने वैश्य धर्माचे अनुकरण करीत आपल्या अस्तित्वास आकार देणारा, संख्येत कमी असूनही भारतभर किंबहुना परदेशातही आपली आगळी ओळख जपणारा असा हा माहेश्वरी समाज.
एका आख्यायिकेप्रमाणे इसवी सन दहाच्या सुमारास ‘माहेश्वरी’ राजस्थानातील लोहागल या ठिकाणी अस्तित्वात आले. कालपरत्वे त्यातून सहा अंतर्गत ज्ञाती निर्माण झाल्या. डिडु माहेश्वरी, धाकड माहेश्वरी, पौकर माहेश्वरी, खंडेलवाल माहेश्वरी, टुंकावाल माहेश्वरी, मेडतवाल माहेश्वरी या त्या ज्ञाती होय. रूढार्थाने मारवाडी म्हणून संबोधला जाणारा हा समाज खासकरून आपल्या सोशिक वृत्तीसाठी ओळखला जातो.
राजस्थानातील कायमच्या नापिकीला कंटाळून हा समाज आपले हुन्नर आजमाविण्यास निघाला आणि भारतभर पसरला, स्थलांतराची पीडा सोसत अनेकांनी पुण्यात येणे पसंत केले आणि अदमासे सव्वा- दोनशे वर्षांपूर्वी त्यांनी प्रामुख्याने रविवार पेठ येथे वसाहत केली. त्या वेळच्या मोठ्या व्यापाºयांकडे नोकरी पत्करून आपल्या पोटापाण्याची व्यवस्था लावली आणि विपन्नतेकडून संपन्नतेकडचा प्रवास सुरू झाला. कमालीची लवचिकता, नमते घेण्याची सवय, अविश्रांत मेहनतीची तयारी, प्रामाणिकतेचे संस्कार, अदबशीर वागणे, पदोपदी तडजोड, धर्मभीरु वृत्ती... आदी जमेच्या बाजू ठरल्या आणि स्थानिक समाजात मारवाडी माणूस दुधात साखर विरघळावी असा विरघळत गेला.
आपण कोणत्या परिस्थितीतून आलोय याची जाण ठेवत गरज आणि चैन यातील फरक ओळखत काटकसर वृत्ती अंगिकारली, प्रसंगी चिक्कूपणाचे दूषणही स्वीकारले, व्यवसाय स्थिरस्थावर करीत, सामाजिक सरमिसळीची काळजी घेत माहेश्वरी साºया क्षेत्रात आपले संपर्क वाढवत राहिला. गांधींजींचे अनुयायी व थोर उद्योगपती घनश्यामदासजी बिर्ला, सोलापूरचे हुतात्मा श्रीकिसन सारडा हे माहेश्वरीच. देशपातळीवर स्वातंत्र्योत्तर काळात समाजाचे तपोधन कृष्णदास जाजू, डॉ. होमी भाभा यांचे सहकारी डॉ. पंचानन माहेश्वरी, जरठ कुमारी विवाहविरोधी विधेयक आणणारे शारदा अॅक्टचे हरिविलास शारदा, विदर्भ केसरी ब्रिजलाल बियाणी, विनोबा भावे यांचे सचिव दामोदरदास मुंदडा, इत्यादींनी नव्या भारताचा पाया बळकट करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली, विविध उद्योगांत व्यस्त बिर्ला समूह, श्री सिमेंटचे बांगड, सुप्रीम इंडस्ट्रीजचे तापडिया, आर आर केबलचे रामेश्वर काबरा, आदी माहेश्वरी मंडळींनी भारतीय अर्थव्यवस्था भक्कम करण्यात योगदान दिले.
माजी सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी, संगीत अकादमी पुरस्कात विजेता गिटारवादक ब्रजभूषण काबरा, चित्रकार मुरली लाहोटी, भाजपचे विविध राज्यांचे प्रभारी श्याम जाजू, टेक्स गुरू स्व. सुभाष लखोटीया, फाय फाउंडेशनचे लक्ष्मीश्वर मर्दा, स्व. पत्रकार मधुश्री काबरा, साहित्यिक शंकर सारडा, हिंदी कवी सुभाष काबरा, संगमनेरचे स्व. ओंकारनाथ मालपाणी आदींनी वेळोवेळी विविध क्षेत्रांत मोलाची कामगिरी केली. सन १८९२मध्ये श्यामसुंदर लोइवाल यांनी पुढाकार घेत समाजातील एकजिनसीपणा जपण्यासाठी अखिल भारतीय माहेश्वरी महासभेची स्थापना केली, ती आजही पुण्यासह भारतभर कार्यरत आहे. पुणे नगरपालिका असताना चार वर्षे नगराध्यक्षपद भूषविणारे हणमंतराम राठी ही माहेश्वरी समाजाची पुण्यातील जुनी ओळख, त्यांच्या कार्यकाळातच डोक्यावरून मैला वाहत नेण्याच्या किळसवाण्या प्रकारास पायबंद घालण्यात आला. पुणे प्रवासी मंचचे जुगल राठी, शिक्षण क्षेत्रातील किशोर दरक, अर्थ सल्लागार श्रीनिवास जखोटिया, पंकज मानधने, हिरालाल मालू, विठ्ठल मणियार, रामकुमार राठी, निरंजन सेवाभावीचे जयेश कासट, राम बांगड, अतुल लाहोटी, नवनीत मानधण्या आदी सारी मंडळी पुण्याच्या सांस्कृतिक जडणघडणीशी संलग्न राहिली.
मागील काही वर्षांत प्रशासन, सेना, पोलीस सेवा, या क्षेत्रांतही माहेश्वरी तरुणांनी पाय रोवायला सुरुवात केली आहे. भूषण गगराणी, सुरेश काकाणी, संतोष अजमेरा, शोभा भुतडा, चंदन पुंगलिया, सर्वेश अगर अशी मंडळी प्रशासनात उच्च पदावर कार्यरत आहेत. माहेश्वरी माणसाने समाजोपयोगी संस्थाही उभारल्या. पुण्यात महेश सहकारी बँक, महेश विद्यालय, ताराचंद हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, मारवाडी संमेलन धर्मशाळा (ससून), माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, महेश इंडस्ट्रियल ग्रुप, महेश प्रोफेशनल फोरम, बालमुकुंद संस्कृत व विद्या अध्यासन केंद्र, महेश विद्यालय, महेश सांस्कृतिक भवन इत्यादी संस्थांची नावे प्रामुख्याने आहेत. व्यापार धंदा सांभाळणाºया माहेश्वरी माणसाने संवेदनशील राहत आळंदी, पंढरपूर, तिरुपती, वृंदावन, रामेश्वर, यासारख्या धार्मिक ठिकाणी गो-शाळा, धर्मशाळा, अन्नछत्र, मंदिरे, शुश्रूषा केंद्रे, विद्यालय आदींच्या निर्मितीतही पुढाकार घेतला. (लेखक माहेश्वरी समाजातील कार्यकर्ते आहेत)
....................