पाण्याचा ‘तास ’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 06:00 AM2019-06-16T06:00:00+5:302019-06-16T06:00:04+5:30

जत तालुक्यातलं कुलाळवाडी हे गाव. दोन वर्षांपूर्वी हे गाव टॅँकरग्रस्त होतं. पण तिथल्या शाळेतले शिक्षक, गावकरी आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनतीनं जलसंधारणाचे ‘धडे’ राबवले. गावात यंदा पाणी नुसतं उपलब्धच नाही, तर इतर गावांना पाणी पुरवण्याइतकं  स्वयंपूर्ण झालं आहे !.

How Kulalwadi fights for the water, explains Namrata Bhingarde | पाण्याचा ‘तास ’!

पाण्याचा ‘तास ’!

Next
ठळक मुद्देगेल्या काही वर्षांमध्ये गावकर्‍यांच्या प्रयत्नांमुळे कुलाळवाडी कात टाकत आहे. त्यामुळे या गावच्या शाळेतले विद्यार्थी जेव्हा ‘माझं गाव’ हा निबंध लिहितील तेव्हा त्यांच्या अक्षरांतून कुलाळवाडीची यशोगाथाच शब्दबद्ध होईल हे नक्की.

-  नम्रता भिंगार्डे

‘अरे अक्षय, जा पळत गुलाबच्या विहिरीत किती पाणी आहे सांग.’
- सहावीतला बारीक अंगकाठीचा अक्षय टकले शेतांमधून उड्या मारत गेला. थोड्या अंतरावरच असलेल्या विहिरीत डोकावून मोठय़ाने ओरडला..
‘सर, बक्कळ पाणी आहे !’
ऐन मे महिन्यात जत तालुक्यातल्या कुलाळवाडी गावात विहिरींना काही फुटांवर पाणी होतं. 2016 पर्यंत टॅँकरग्रस्त असलेलं कुलाळवाडी 2019 मध्ये मात्न आसपासच्या गावांना पाणीपुरवठा करणारं गाव म्हणून उदयास आलं.
‘गेल्या सहा महिन्यांपासून सोन्याळ, माडग्याळ, गारळेवाडी, गोंधळेवाडी, आसंगी, गुड्डापूर अशा गावांना कुलाळवाडीतून टॅँकरने पाणीपुरवठा होतोय. जसा मार्च आला तसा मग आता केवळ लग्नसमारंभ, कार्य आणि पिण्यासाठीच पाणी न्यायला आम्ही परवानगी देत आहोत. गावकर्‍यांनी स्वत:साठीही पाणी जपून ठेवलं आहे’, सरपंच बजरंग कुलाळ मोठय़ा अभिमानाने सांगत होते. 
रात्नी 8 च्या अंधारात कुदळ-फावडं घेऊन मोबाइलच्या बॅटरीच्या उजेडात पिळदार शरीरयष्टीच्या सरपंचांसोबत पंधराएक शाळकरी मुलं र्शमदान करत होती. जलसंधारणाच्या वॉटरकप स्पर्धेत कुलाळवाडी गावाने गेल्या वर्षी तालुक्यातून तिसरं बक्षीस जिंकलं होतं. सरपंचांचा मुलगा सुशांतने ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर आपल्या शाळेतल्या मित्नांसोबत गेल्या वर्षी काम सुरू केलं आणि बघता बघता पाचवी ते दहावीतल्या या वानरसेनेने पाणलोट क्षेत्न विकासाच्या विज्ञानाची विद्या आत्मसात केली आणि प्रत्यक्षातही आणली.
‘आमचं गाव म्हणजे 12 वस्त्या आहेत. मी स्वत: माडग्याळ वस्तीवर राहतो. आम्हाला कोणालाच दिवसभर वेळ नसायचा. धारा काढायच्या, जनावरांना वैरण टाकायचं, शेण काढायचं अशी सगळी कामं संध्याकाळी राहतात, ती करून आम्ही र्शमदानाला यायचो. गेल्या वर्षीपर्यंत सायकलवरून पाणी आणत होतो, आता तोच वेळ अभ्यासाला मिळतोय.’ 
ज्याच्या विहिरीतलं बक्कळ पाणी पाहून आम्हा सगळ्यांना आनंद झाला तो गुलाब ठोंबरे सांगत होता. यंदा तो दहावीत आहे.
‘पहिल्या वर्षी जमिनीचा उतार कसा मोजायचा हे कळलं. सरावाने शिकत गेलो. यंदा तर जमिनीचा उतार मोजून कंटूर पॉइंटसुद्धा आम्ही मुलांनीच काढला.’ अचूक, शास्रीय आणि नक्षीदार पद्धतीने दगडांचं पिचिंग करण्यात एक्स्पर्ट असलेल्या पाचवीतल्या कार्तिक मानेने सांगितलं. 
शाळकरी मुलांच्या या जोरदार टीमचं नेतृत्व करणारे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक 31 वर्षांचे भक्तराज गर्जे यांनी कुलाळवाडी गावातल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये मोठं योगदान दिलं आहे,
‘मी मूळचा अहमदनगरचा. 2010 मध्ये इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली. जॉईन झालो तेव्हा इथून पळून जावं असं वाटत होतं. नुसतं ओसाड गाव.. एक झाड पहायला नव्हतं. पाणी नव्हतं. रस्तासुद्धा नव्हता. आता दोन वर्षांपूर्वी हा रस्ता झालाय. माझं बालपण औरंगाबादमध्ये गेलं त्यामुळे तिथं सगळ्या सुविधांमध्ये राहण्याची सवय होती; पण इथे जेव्हा विद्यार्थी शाळेत गैरहजर रहायचे आणि त्यांना बोलवण्यासाठी त्यांच्या घरी जायचो तेव्हा तिथली परिस्थिती पाहून वाईट वाटायचं. या, अशा झोपडीत विद्यार्थी राहतात, दिवसभर काबाडकष्ट करतात आणि तरी शाळेत येतात. मग मनात कुठंतरी वाटायला लागलं की नाही, आपण पळून जायला नको, या विद्यार्थ्यांना शिक्षणाची आणि माझी गरज आहे. गेली नऊ वर्षे मी याच शाळेवर शिक्षक आहे.’ - या गावाशी असलेलं आपलं नातं गर्जे उलगडून दाखवत होते.
कुलाळवाडी हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अगदी सीमेवर आहे. 100 टक्के मेंढपाळ समाजाचं गाव असल्याने वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये विखुरलेलं आहे. शिक्षक म्हणून वावरत असताना भक्तराज गर्जे हळूहळू इतरही विषयांना हात घालत होते.
‘मेंढपाळ असले तरी गेल्या काही वर्षांपासून पाणी आणि चारा नसल्याने लोकांनी पारंपरिक व्यवसाय सोडून देत ऊसतोडीसाठी जाण्याचा पर्याय स्वीकारला. मुलगा मोठा झाला की शिक्षण थांबवून त्याला ऊसतोडीसाठी पाठविण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. सातवीतंच मुलींची लग्न उरकली जायची. रोजगारासाठी आणि पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत होता. त्यामुळे शिक्षक म्हणून पटसंख्या वाढवण्यासोबतच मुलांना गावाबाहेर न जाऊ देणं हासुद्धा मला माझ्या जबाबदारीचा भाग वाटला. त्यामुळे मी हळूहळू एकेका विषयावर काम सुरू केलं. गावकर्‍यांशी बोलणं, त्यांचं मन वळवणं, शिकणं विद्यार्थ्यांना आनंददायी वाटेल असं वातावरण ठेवणं. असे प्रयत्न सुरूच होते. तेवढय़ात सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा आली आणि मला या गावातल्या पाणी आणि पर्यावरण या विषयावर काम करण्याची दिशा मिळाली.’ 
गावात अत्यंत आदराचं स्थान असलेल्या भक्तराज सरांनी पाणलोट विकासाला आपलंसं केलं. परिसरातली वृक्षसंपदा वाढावी यासाठी प्रयत्न सुरू केले आणि सरांसोबत वेगळंच नातं तयार झालेल्या विद्यार्थ्यांंना हाताशी धरलं.
सरांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने दुसर्‍या वर्षी कुलाळवाडी गावाने जलसंधारणाच्या कामात बाजी मारली आहे. 
गेल्या वर्षी तुमच्या गावाला स्पर्धेत बक्षीस मिळालं होतं तरी तुम्ही यंदा काम का करताय, या प्रश्नावर सरांचं उत्तर, ‘स्पर्धेत कोणीही भाग घेतं. त्यात टिकून राहत आपली कामगिरी टप्प्याटप्प्याने उत्तम करत राहिल्यानेच आपण एका इयत्तेतून दुसर्‍या इयत्तेत जातो. मागच्या वर्षी जलसंधारणाचे सगळे उपचार केले आणि त्याचा फायदा म्हणजे यंदा मे महिन्यापर्यंत आमचं गाव टँकरमुक्त राहिलं. गावात आजही पिण्यासाठी मुबलक पाणी आहे. मी स्वत: इथून काही अंतरावर असलेल्या माडग्याळला राहतो. माझी बायको आणि मुलं रहायला आली तेव्हा रोज 100 रु पयांचं पाणी घ्यायला लागत होतं. म्हणजे महिन्याभरात 3000 रुपयांचं पाणी मी विकत घेतलं. पण इथं कुलाळवाडीत सगळ्या विहिरींना पाणी आहे.’
maharain.gov.in वर दिलेल्या अधिकृत आकड्यांनुसार गेल्या पावसाळ्यात जत तालुक्यात 224.3 मिलीमीटर एवढा पाऊस पडला. अत्यंत तुटपुंजा पाऊस पडूनही केवळ गावकर्‍यांनी, गर्जेसर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांंनी अत्यंत मेहनत घेऊन केलेल्या जलसंधारणाच्या उपचारांमुळे कुलाळवाडी गावात यंदाच्या पावसाळ्यापर्यंंत पाणी उपलब्ध आहे. हा चमत्कार नाही तर विज्ञान आहे, ज्यामुळे दोन वर्षांंपूर्वी टॅँकरग्रस्त असलेलं गाव यंदा इतर गावांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्याइतपत स्वयंपूर्ण झालं. गावकर्‍यांच्या प्रयत्नांमुळेच यंदा सामाजिक वनीकरण विभागाने तिथं 12 हजार झाडं लावण्याचा आणि त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. 
गेल्या काही वर्षांंमध्ये गावकर्‍यांच्या प्रयत्नांमुळे कुलाळवाडी कात टाकत आहे. त्यामुळे या गावच्या शाळेतले विद्यार्थी जेव्हा ‘माझं गाव’ हा निबंध लिहितील तेव्हा त्यांच्या अक्षरांतून कुलाळवाडीची यशोगाथाच शब्दबद्ध होईल हे नक्की.
namrata@paanifoundation.in
(लेखिका पानी फाउण्डेशनच्या सोशल मीडिया मॅनेजर आहेत.)

Web Title: How Kulalwadi fights for the water, explains Namrata Bhingarde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.