सगळेच पाहिले !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 07:38 AM2018-02-25T07:38:00+5:302018-02-25T07:38:00+5:30

क्रांती आणि स्वातंत्र्यासाठी देहभान विसरून जिवाची बाजी लावणारा झपाटलेला स्वातंत्र्यलढा पाहिला. विकासाच्या आसक्तीने आसुसलेला समाज पाहिला. कोयना, उजनी, जायकवाडीसारख्या धरणांच्या साथीने हरित-धवल क्रांतीच्या स्वप्नाला गवसणी घालणारा काळ असो अथवा घोटाळे आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली व्यवस्था असो, हे सगळे पाहिले !- मन आनंदाने भरून येते, आणि खिन्नही वाटते !!

Ganpatro Deshmukh shares his life journey | सगळेच पाहिले !

सगळेच पाहिले !

Next

गणपतराव देशमुख

स्वत:च्या संसारावर तुळशीपत्र ठेवून क्रांतिलढ्यात झोकून देणाºया तरुणांची फौज पाहिलेला मी माणूस आहे. स्वातंत्र्यापासून आजवरच्या प्रत्येक स्थित्यंतराचे सक्रिय साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. आज भौतिक आघाडीवर जगाच्या स्पर्धेत अव्वल वाटणारी प्रगती आपल्या देशाने केल्याचा आनंदही होतो. पण मुंबईच्या फ्लॅटमध्ये दोन महिने आई मरून पडते तरी तिच्या मुलाला त्याचा पत्ता नसतो असल्या घटना वाचतो, तेव्हा मन खिन्न होते. माणसा-माणसांमधील जिव्हाळा, कुटुंबातील एकोपा अन् प्रेम जतन करणारे संवेदनशील मन समाजातून गायब होत चालले आहे. आपली कुटुंबव्यवस्था ही एका जमान्यात जगाला हेवा वाटायला लावणारी होती. स्वातंत्र्यानंतर आपल्या समाजाचा चेहरा देखणा झाला; पण मन मात्र कमालीचे विद्रूप झाले. बदलत्या जमान्याने आपल्याला अपरिहार्यतेच्या दरीत लोटले.
पूर्वी कुटुंबाचे अर्थकारण शेतीवर अवलंबून होते. एकत्र राहून शेतीत राबताना कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट व्हायचे. सुख-दु:खाला एकमेकाला आधार द्यायचा हा कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा स्वभाव आपोआप बनायचा. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या देशाचे शिक्षणाचे प्रमाण केवळ १६ टक्के होते. लढा देऊन मिळविलेल्या स्वातंत्र्यामुळे त्यावेळच्या तरुण पिढीत देशभक्तीची भावना होती. शिक्षणामुळे आपला विकास होणार ही भावना जागृत झाली होती. अर्थकारण मात्र शेतीवरच अवलंबून होते. काळाबरोबर शेतीवरचा भार कमी करण्यासाठी शिक्षण घेतलेली मुले शहराकडे वळू लागली. प्रत्येक पिढीगणिक शेतीचे तुकडे पडत गेले. नोकरी-धंद्याच्या गरजेपोटी शहराकडे धावणे गरजेचेच होते. त्यामुळे कुटुंबे आपोआपच विभक्त होऊ लागली. कुटुंबांचा एकोपा दुभंगू लागला. त्याचाच परिपाक आज समाजातील अनेक घटनांमध्ये आपण पाहात आहोत.
१९४५ साली दुसºया महायुद्धात रशियाने जर्मनीला रोखले, त्यानंतर १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. जागतिक आणि देशात घडलेल्या प्रत्येक घडामोडीचा परिणाम माझ्या पिढीच्या मनावर होत होता. मला आठवते, कॉलेज जीवनापासून मी देशभक्त तुळशीदासदादा जाधव यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणूनच वावरलो. ते जोवर काँग्रेसमध्ये होते तोवर मी काँग्रेसमध्ये होतो. त्यांनी आदेश द्यायचा आणि मी त्यांनी सांगितलेल्या वाटेवर चालत राहायचे. १९४८ साली शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. मीही तुळशीदासदादांसोबत शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. विचार आणि नेत्यांवरील निष्ठा हा त्यावेळच्या कार्यकर्त्यांचा पिंड होता. आज बघा, स्वार्थ साधला गेला नाही की कार्यकर्ता बंड करतो. (अर्थात याला माझे कार्यकर्ते अपवाद आहेत!)
एकूणच मानवी आणि कौटुंबिक मूल्यांना आपण तिलांजली द्यायला निघालो आहोत की काय, अशी आजची परिस्थिती पाहून मला दु:ख होते. जीवनात समाजासाठी राजकारण करताना माझ्या कौटुंबिक जबाबदाºया पार पाडताना अनेक वळणावर अडचणी आल्या. कौटुंबिक जबाबदारीपेक्षा सामाजिक जबाबदारीला मी अग्रक्रम दिला. तशा अडचणीच्या प्रसंगात माझ्या कुटुंबाने मला समजून घेतले व साथ दिली. तरुण वयात आमच्यापुढे १९४२च्या क्रांतिलढ्यात संघर्ष करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे आदर्श होते. बदलत्या काळाने येणाºया प्रत्येक पिढीची मानसिकता बदलली. त्या काळात भ्रष्टाचार नव्हता असे नाही, तो होता पण झाकून असायचा. भ्रष्टाचारी माणसाकडे समाज वेगळ्या नजरेने पाहायचा. आज भ्रष्टाचार खुला झाला आहे. भ्रष्टाचारी माणसाला समाजाची भीती उरलेली नाही. नवमहाराष्टÑाच्या निर्मितीनंतरच्या राज्याच्या पहिल्या विधिमंडळ सभागृहात शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा घेऊन जनतेने मला पाठविले. ११ वेळा विधानसभेची निवडणूक जिंकण्याचा जागतिक विक्रम माझ्या जनतेने घडविला. आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता यांसारख्या पदांवर काम करण्याची संधी मला मिळाली. आजवर मी विधानसभेच्या १३ निवडणुका लढलो. त्यापैकी ११ निवडणुकांमध्ये विजयी झालो. मला या क्षणापर्यंत निवडणुकीसाठी एक रुपया खर्च आलेला नाही. लोक आग्रहाने निवडणुकीला उभे करतात. निधीही तेच गोळा करतात. मला आठवते, १९६२ साली मी लढलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत केवळ सात हजार रुपये खर्च झाला होता. दोन जीप गाड्या प्रचारासाठी असायच्या. त्यातली एक जीप तर कायम उभीच असायची. कारण वाहनांऐवजी पायी फिरून मते मागण्याचा कार्यकर्त्यांचा पिंड असायचा.
आज मात्र निवडणूक आणि राजकारणाचे चित्रच बदलले आहे. ज्याला राजकारण करायचे आहे त्याला ५० टक्के जातीचे आणि ५० टक्के पैशाचे पाठबळ असेल तोच टिकतो! बदललेल्या समाजाचे आणि राजकारणाचेही हे विदारक गणित आहे.
आज वयाच्या ९२व्या वर्षीही मी गावोगावी फिरतो. लोकांशी माझा सतत संवाद सुरू असतो. शरीर साथ देते म्हणून मी हे करू शकतो. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी मी सज्ज राहावे, असे लोक म्हणतात. मी काम करीत राहणार आहे, निवडणुकीचे ज्या-त्या वेळी पाहू! स्वातंत्र्यानंतर सर्व भौतिक आघाड्यांवर आपण लक्षणीय प्रगती केली. आपली नवी पिढीदेखील विकास आणि प्रगतीच्या मुद्द्यावर खूपच तरबेज असल्याचे पाहून मन सुखावते. वैचारिक आणि सामाजिक आघाडीवर मात्र नव्या पिढीतील संभ्रम पाहून मन विषण्ण होते.
निवडणुकीच्या राजकारणात आज नरेंद्र मोदींसारख्या प्रतिगामी नेत्यांकडे देशाची सत्ता आहे. ही परिस्थिती कायम राहील, असे मात्र मला वाटत नाही. नवी पिढीच राजकारण आणि सत्ताकारणात क्रांती घडवेल, असे माझे मन म्हणते !

शब्दांकन : राजा माने

(लेखक ११ वेळा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा जागतिक विक्रम करणारे सांगोल्याचे विद्यमान आमदार आहेत.)

Web Title: Ganpatro Deshmukh shares his life journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.