फिल्लमबाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 01:10 PM2018-06-03T13:10:36+5:302018-06-03T13:10:36+5:30

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक शिरीष कणेकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त.  शास्त्रीय संगीतातील तो जाणकार नाही की फिल्म इन्स्टिट्यूटचा पदवीधर नाही. घरचे कुणी सिनेमा क्षेत्रातही नाहीत, तरीही सिनेमाच्या विविध पैलूंचे त्याच्यासारखे रसग्रहण, भाष्य, त्यातील कलाकारांचे व्यक्तिचित्रण, भल्याभल्यांना जमत नाही. आपल्या लिखाणातून एका पिढीची संवेदना त्याने व्यक्त केली. वाचकांनाही ती प्रचंड भावली..

Filmmbaaz! | फिल्लमबाज!

फिल्लमबाज!

Next

- अरुण पुराणिक

शिरीष कणेकर हा माझा जुना दोस्त आणि पत्रकारितेमधील गुरु. तो वयानी, अनुभवानी आणि ज्ञानानी मोठा असूनही मला नेहमी अहो जाहो करतो. मी मात्र त्याला शिरीषच म्हणतो, याला कारण त्याचे चिरतरुण व सतेज लेखन. आठवणी नेहमी ताज्या, तरुणच असतात आणि आठवणीतील माणसे ही काळावर मात करून सदा सतेज रहातात. शिरीषही नेहमी देव आनंदसारखा चिरतरुण म्हणून ओळखला गेला पाहिजे असे मला वाटते. त्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने आठवणींना उजाळा देताना जुना कालखंड डोळ्यांसमोर उभा राहिला.
मनोरंजनाच्या दुनियेत गेल्या शतकात खऱ्या अर्थाने क्रांती केली ती बोलपटांनी! सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडेल अशा दरात फावल्या वेळेत जागेपणी स्वप्नपूर्ती करणारे हे नवीन माध्यम जनतेसाठी अक्षरश: वरदान ठरले; पण तो जमानाच वेगळा होता.. जसा पानसुपारी तंबाखू खाणे, विडी-सिगारेट ओढणे, नाटक-तमाशा पाहणे तसाच सिनेमा पाहणे, फिल्मी संगीत ऐकणे, नटनट्यांचे फोटो पाहणे. सुसंस्कृत घरात हा एक वाईट नाद समजला जात असे. सिने-नाट्य व्यवसायात काम करणाºयांना, गाणे बजावणे करणाºया कलावंतांना, आजच्या सारखी सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. हे सर्व नाद (काहींच्या मते धंदे) चोरूनच करावे लागत. शिरीषच्या एका लेखसंग्रहाचे नाव ‘माझी फिल्लमबाजी’ असेच आहे.
त्या काळीही सिनेमा पाहण्याचे जबरदस्त व्यसन असलेली पिढी होती. शिरीष कणेकर हे त्याच पिढीचे प्रतिनिधी! रेडिओचे आगमन झाले होते; पण व्हिडीओ, सीडी, इतकेच काय, पण टीव्हीही नव्हता. टेप रेकॉर्डर १९६५ नंतर आला. जे काही डोळे भरून पहायचे, कानात साठवायचे ते फक्त सिनेमाच्या पडद्यावर! थिएटर्सच्या पडद्यावर सिनेमा पाहण्यात स्वर्गसुख सामावले होते. तिथे एक स्वप्ननगरी होती. तिथे उच्च-नीच, गरीब श्रीमंत कसलाही भेदभाव नव्हता. तिथे सुरांचा जादूगर सहगल, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर होती.
तिथे मधुबाला, बीना राय, नूतनसारख्या अप्सरा होत्या. देव, राज, दिलीपसारखी दैवते होती. गोप, जॉनी वॉकर, मेहमूदसारखा विरंगुळा होता, कुक्कू, वैजयंतीमाला, हेलनसारख्या रंभा-मेनका तर प्राण, जीवन, के. एन. सिंगसारखे दैत्यही होते.
याच मुंबईतील सिनेमा थिएटरच्या अंधारात आमची पिढी रमली. तिथे एक वेगळे जग अनुभवले. त्या काळच्या सिनेमाच्या आठवणी, घडलेले प्रसंग, ऐकलेले किस्से, गंमती-जंमती आजही आठवले की मन मोहरून जाते. व्यसनी माणसाची दोस्ती ही व्यसनी माणसांशीच होते, या उक्तिप्रमाणे त्या काळात सिनेमाचे अनेक पागल दीवाने एकमेकांचे जिवाभावाचे दोस्त झाले. अनेकांच्या नुसत्या ओळखी झाल्या. यामुळे संगीत विश्व विस्तारले. जुन्या, ऐकण्यास दुर्मीळ असलेल्या गाण्यांची माहिती झाली. शिरीष कणेकर, वासू परांजपे, डॉक्टर प्रकाश जोशी, रवि संसारे, मुकुंद आचार्य, बाळ सप्रे, सदूभाऊ रेगे, मोहोळकर, राजन गवंडळकर यांच्या सहवासात संगीतातील निखळ सौंदर्याचा आस्वाद घेता आला.
सिनेमासारखाच सिनेपत्रकारितेचाही एक गौरवशाली इतिहास आहे. टाइम्स व ज्ञानप्रकाशमध्ये मूकपटांच्या जाहिराती झळकत असत. ‘आलम आरा’पासून हिंदी तर ‘अयोध्येचा राजा’पासून मराठी चित्रपट बोलू लागला, गाऊ व नाचू लागला. १९३२पासून विविध वृत्तपत्रे साप्ताहिके व मासिकातून सिनेप्रसिद्धी वृत्तांत, लेख तसेच सिनेमाचे परीक्षण प्रसिद्ध होऊ लागले.
बाबूराव पटेल यांच्या सडेतोड, फटकळ लेखनशैलीमुळे अवघ्या फिल्मी उद्योगावर त्यांचा वचक होता. सरकारलाही त्यांच्या लेखाची दखल घ्यावी लागे. मंटो, चोप्रा, वसंत साठे व अब्बास पुढे चित्रपट कथालेखक झाले. इसाक मुजावरांकडे माहितीचे भंडार होते तर माधव मोहोळकर यांच्याकडे साहित्यिक भाषा शैली होती. मुळात हिंदी चित्रपट हा अभ्यासाचा व व्यासंगाचा विषय आहे हे शिरीष कणेकर यांनी दाखवून दिले. आपल्या रंजक आणि रोचक शैलीमुळे कणेकर सर्वांचे लाडके लेखक झाले. पत्रकार, चित्रपट, क्रिकेट समीक्षक, ललित लेखक. एकपात्री कलाकार.. असे त्यांचे बहुरंगी बहुढंगी व्यक्तिमत्त्व आहे. केवळ लोकप्रियता हा एकच निकष लावला तर सिने व ललित साहित्यात शिरीष कणेकर यांचे अत्यंत मानाचे स्थान आहे.
१९७८मध्ये त्यांचा फिल्मी संगीतावर आधारित ‘गाए चला जा’ हा लेखसंग्रह प्रकाशित झाला तेव्हा मी आणि राजन ते पुस्तक घेऊनच त्यातील गाणी ऐकायला गिरगावमधील घैसास यांच्या रेकॉर्ड लायब्ररीत जाऊन बसलो होतो. शिरीषच्या आवडीचे गाणे आहे, म्हणजे ते अत्युत्तम असले पाहिजे असा माझ्याासह हजारो वाचकांचा विश्वास होता.
एखाद्या देवळातला पुजारी या नात्याने तो आपल्या फिल्मी देवतांची भेट करून देतो. सिनेमावरील आत्यंतिक प्रेम, हळवे मन, मिस्कील स्वभाव, डोळस निरीक्षण, मार्मिक विश्लेषण, अचूक आशयघन शब्दभांडार ही शिरीषची बलस्थाने आहेत. कलावंतांतील सामान्य माणूस शोधण्याची त्याच्याकडे एक विलक्षण हातोटी आहे. त्याला असामान्य स्मरणशक्तीची नैसर्गिक देणगी आहे. संपूर्ण मुलाखत, कार्यक्रम, मैफल, चर्चा, गप्पा त्याच्या सुपीक मेंदूत बरोबर नोंदले जाते. त्याला कधी मुद्दे लिहून घेण्याची गरज भासत नाही. १९८५ मध्ये शिवाजी मंदिर येथे माझ्या ‘हमारी याद आएगी’ कार्यक्रमात नलिनी जयवंत, एस.एन. त्रिपाठी, स्नेहल भाटकर आणि शिरीष कणेकर प्रमुख पाहुणे होते. मी, शिरीष आणि डॉक्टर प्रकाश जोशी यांनी मलबार हिलवरील कैफेनाजमध्ये ज्येष्ठ हारमोनियमवादक विस्ताज बलसारा यांची मुलाखत घेतली होती. डॉक्टर जोशी यांच्या घरी बाबूजी सुधीर फडके व अनिल विश्वास फिल्मी संगीत ऐकायला आले होते. शिरीषला असे शेकडो कार्यक्रम, तेथील गप्पा, किस्से, ऐकलेली गाणी आजही स्पष्टपणे आठवतात हा पठ्ठा लताची मुलाखत घेतानाही मुद्दे लिहून घेत नाही.
शिरीष शास्त्रीय संगीतातील कुणी जाणकार नाही की फिल्म इन्स्टिट्यूटचा पदवीधरही नाही, घरचे कुणी सिनेमा क्षेत्रातही नाहीत, तरीही सिनेमाच्या विविध पैलूंचे त्याच्या सारखे रसग्रहण, त्यातील कलाकरांचे व्यक्तिचित्रण, त्यांच्यावर अचूक भाष्य करणे हे भल्याभल्याना जमत नाही. त्याचे ‘गाए चला जा’ आणि ‘यादों की बारात’ सर्वसामान्य रसिकांसाठी ‘रामायण’ आणि ‘महाभारत’सारखे ग्रंथ आहेत याविषयी शंका नाही.
सिनेमा हा हलका-फुलका, रोमॅण्टिक विषय आहे याची त्याला जाणीव आहे. त्याच्या कोणत्याही लेखात फालतू पांडित्य, क्लिष्टपणा, बोजडपणा औषधालाही सापडत नाही. त्याच्या पुस्तकातील कोणतेही पान उघडून वाचा. वाचताना फक्त निखळ आनंदच मिळतो. लतासारखी महान गायिका; ज्याच्या लेखनशैलीची दीवानी आहे त्याच्याविषयी आम्ही पामरांनी काय बोलावे?
फक्त एका ओळीत व्यक्तिचित्रण करणे ही शिरीषची खासियत आहे. तलत मेहमूद - हा माणूस सुगंधी उदबत्तीसारखा विझून गेला, राज कपूरमधील कलावंत हरपला आणि शोमन जन्माला आला, देव आनंद हे सदासफल प्रेमाचे प्रतीक आहे. नूरजहांच्या रूपाला आणि आवाजाला त्याने ‘जालीम जखीणी’ची उपमा दिली आहे. योगीता बालीसारखी गच्च भरलेली मुम्बापुरीची लोकल ही कल्पना फक्त त्यालाच सुचू शकते. अगदी भिंग लावून तपासले तरी शिरीषच्या कोणत्याही लेखात चुकीचे संदर्भ सापडत नाहीत; तेही चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात.. हे विशेष आहे.
मला वाटते, शिरीष लेखक म्हणून यशस्वी झाला याचे कारण त्याचे लेखन, त्याचे विचार हे त्याच्या एकट्याचे कधीच नव्हते. त्याने एका पिढीची संवेदना, कोमल भावना व्यक्त केली. ती वाचकांना भावली. तरुण पिढी आशेवर जगते तर वयोवृद्ध सुखद स्मृतीवर जगतात. शिरीषने सुखद स्मृतींचा हा अनमोल ठेवा आमच्यासाठी निर्माण केला, जपला, संवर्धित केला. त्याचे हे ऋण कधीही विसरता येणार नाही.

Web Title: Filmmbaaz!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.