ज्येष्ठ समाजवादी विचारवंत काळाच्या पडद्याआड, भाई वैद्य यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 09:12 PM2018-04-02T21:12:59+5:302018-04-02T21:26:14+5:30

देशातील आणीबाणीच्या काळात त्यांनी 19 महिने मिसाबंदीखाली कारावास भोगला. पुलोदच्या सरकारमध्ये असताना त्यांनी गृह राज्यमंत्री म्हणून दीड वर्षे प्रशासन सांभाळले होते.

The veteran socialist thinker passed away, the brother Vaidya passed away | ज्येष्ठ समाजवादी विचारवंत काळाच्या पडद्याआड, भाई वैद्य यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत काळाच्या पडद्याआड, भाई वैद्य यांचे निधन

Next

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य (भालचंद्र सदाशिव वैद्य) यांचे सोमवारी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला. 

गेल्या काही दिवसांपूर्वी भाई वैद्य यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, या उपचारांना त्यांचे शरीर हवा तसा प्रतिसाद देत नसल्याने त्यांची अखेर आज प्राणज्योत मालवली. 

स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री असलेले वैद्य राजकीय आणि सामाजिक चळवळीत मात्र 'भाई वैद्य' याच नावाने परिचित होते. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात चलेजाव चळवळीत सहभाग घेतला होता. 1943 पासून राष्ट्र सेवा दलाचे सेवक झाले.  त्यानंतर 1946 मध्ये कॉंग्रेस समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला. 1955 मध्ये गोवा आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता.1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तीन आठवडे त्यांनी तुरुंगवास भोगला होता. 1962 ते 78 दरम्यान ते पुणे महापालिकेचे सदस्य होते. याचबरोबर, 1974-75 दरम्यान त्यांनी पुणे शहराचे महापौरपदही भूषविले होते. देशातील आणीबाणीच्या काळात त्यांनी 19 महिने मिसाबंदीखाली कारावास भोगला. पुलोदच्या सरकारमध्ये असताना त्यांनी गृह राज्यमंत्री म्हणून दीड वर्षे प्रशासन सांभाळले होते.

लोकशाही मुल्यांचा पुरस्कर्ता गमावला - देवेंद्र फडणवीस 
भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मुल्यांचा निष्ठेने पुरस्कार करणारं आणि समाजातील वंचित-उपेक्षितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्षरत असणारं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. 
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासह संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवामुक्ती लढ्यात भाई वैद्य यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असून सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांचे अखंड प्रयत्न होते. मुल्यांवर निष्ठा ठेवूनही राजकारण करता येते याचा एक मानदंड त्यांनी निर्माण केला होता. त्यांच्या निधनाने राज्यातील विविध सामाजिक चळवळींचा अध्वर्यू आपण गमावला आहे, असं फडणवीस यांनी शोक संदेशात म्हटलं आहे. 

भाई वैद्य यांच्याविषयीची माहिती..
भाई वैद्य यांचा जन्म २२ जून १९२७ रोजी झाला होता. सामाजिक कार्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.

खालील पदावर होते कार्यरत...
अध्यक्ष, एस.एम.जोशी मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट, पुणे  (१९९८पासून)
अध्यक्ष, पुणे म.न.पा.सेवा निवृत्त संघ  (१९९५ पासून)

त्यांनी भूषवलेली पदे... 
राष्ट्रीय अध्यक्ष, सोशलिस्ट पार्टी (इंडिया) ( मे २०११ ते २०१६)
राष्ट्रीय अध्यक्ष, भारत यात्रा ट्रस्ट, दिल्ली. (२००४ ते २०११)
राष्ट्रीय महामंत्री, जनता पार्टी. (१९८६ ते १९८८ )
राष्ट्रीय महामंत्री, समाजवादी जनपरिषद (१९९५ ते १९९९)
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल (२००० ते २००२)
महापौर, पुणे (१९७४ ते १९७५)
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया मेयर्स कॉन्फरन्स (१९७५)
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा(२००४ ते २०१३)
अध्यक्ष, खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी वर्कर्स युनियन,पुणे २०१३ पर्यंत

गृहराज्यमंत्री असताना घेतलेले निर्णय...
महाराष्ट्र राज्याचे गृह आणि सर्वसाधारण प्रशासन या खात्याचे राज्यमंत्री (१९७८ ते १९८०)
या कार्यकाळात पहिले मराठवाडा नामांतर विधेयक विधानसभेत मांडले.
स्मगलरचे सात साथीदार तीन लाख रुपये लाच घेऊन आले असताना गृहराज्य मंत्री म्हणून त्यांना पोलिसांच्या हवाली करून तुरुंगात पाठविले.
महाराष्ट्र राज्य पोलिसांना फुल पॅंट देण्याचा ऐतिहासिक निर्णय.
महाराष्ट्र सेवा निवृतांच्या वेतनामध्ये किमान निवृती वेतन आणि त्याची महागाईशी जोडणी या गोष्टी करून घेतल्या.

अनेक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग व तुरुंगवास...
१९४२ साली शालेय जीवनात चलेजाव चळवळीमध्ये सहभाग.
१९५५ मध्ये गोवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये दुसर्‍या तुकडीत सहभाग आणि जबर मारहाण.
१९५७ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग व तुरुंगवास.
१९६१ साली कच्छ सत्याग्रहामध्ये भुज ते खावडा पदयात्रेत सहभाग.
१९७४ ते १९७७ या दरम्यान आणीबाणीमध्ये मिसाबंदी म्हणून १९ महीने तुरुंगवास.
१९८३ मध्ये जनता पार्टीचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली दरम्यान निघालेल्या भारत यात्रा मध्ये ४००० किलोमीटर अंतराच्या यात्रेत सक्रिय सहभाग.

आतापर्यंत सुमारे २५ वेळा सत्याग्रह व तुरुंगवास...
शेवटचा सत्याग्रह व अटक डिसेंबर २०१६ मध्ये ८८व्या वर्षी शिक्षण हक्कासाठी. १९४३ साली राष्ट्र सेवा दलात सामिल झाल्यापासून ‘लोकशाही समाजवादी’ विचारधारा स्विकारली आणि आजतागायत ती निष्ठेने जपली.

 

Web Title: The veteran socialist thinker passed away, the brother Vaidya passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.