नोटाबंदीच्या माध्यमातून जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 05:27 PM2017-11-08T17:27:54+5:302017-11-08T17:29:00+5:30

ठाणे : काही नोटा चलनातून बाद करणे एवढाच नोटाबंदीचा उद्देश नव्हता. नोटाबंदी हे जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताने टाकलेले एक पाऊल आहे.

Through the Nomination, Responsible towards the Economy, Chief Minister's Rendering | नोटाबंदीच्या माध्यमातून जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

नोटाबंदीच्या माध्यमातून जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

Next

ठाणे : काही नोटा चलनातून बाद करणे एवढाच नोटाबंदीचा उद्देश नव्हता. नोटाबंदी हे जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताने टाकलेले एक पाऊल आहे. या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेची गती वाढत असून, लवकरच भारताची अर्थव्यवस्था जगभरात सर्वाधिक सक्षम राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ठाण्यात केले.
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या ऑलिम्पस सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन हे प्रामुख्याने उपस्थित होते. डिजिटायझेशनच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या टीसीएसच्या ऑलिम्पस सेंटरचे उद्घाटन आणि नोटाबंदीची वर्षपूर्ती योगायोगाने एकाच दिवशी असून, याकडे मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचा कांगावा विरोधक करीत आहेत. त्यांचा समाचार मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. नोटाबंदीमुळे देशाची प्रगती खुंटल्याचा आरोप करणा-या विरोधकांनी टीसीएसचा कारभार एकदा आवर्जून पाहावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. टीसीएसच्या मुंबई, नाशिक, पुणे आणि नागपूर येथील प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. माहिती तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल स्थानी राहावे, यासाठी टीसीएसने महत्वाची भूमिका बजावली. आजच्या तरुणांना नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याएवढे सक्षम बनण्यात जास्त रस आहे. त्यामुळे नवउद्योजक तयार होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
राज्यातील बुद्धिमान तरुणांची तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगती व्हावी, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी सांगितले. टीसीएसचा प्रवास मुंबईतूनच सुरू झाला. टीसीएसची ठाण्यातील इमारत अवघ्या दीड वर्षात उभारल्याचे गोपीनाथन यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला महापौर मिनाक्षी शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गणपत गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परमबिरसिंग, महापालिका आयुक्त संजिव जयस्वाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Through the Nomination, Responsible towards the Economy, Chief Minister's Rendering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.