मुख्यमंत्र्यांच्या हेतूवर नव्हे क्षमतेवर शंका! -भाई जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:19 AM2018-01-15T01:19:14+5:302018-01-15T01:19:42+5:30

भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यावर नागरिकांमध्ये नवलाई होती. मात्र, वर्षभरात ती दूर झाली. प्रशासनात ते आक्रमक ठरतील, असे वाटत होते. मात्र, आज साडेतीन वर्षांचा कालावधी लोटूनही फडणवीस सरकराला छाप पाडण्यास अपयश आले

 No doubt on the motive of the Chief Minister! -Brother Jagtap | मुख्यमंत्र्यांच्या हेतूवर नव्हे क्षमतेवर शंका! -भाई जगताप

मुख्यमंत्र्यांच्या हेतूवर नव्हे क्षमतेवर शंका! -भाई जगताप

Next

भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यावर नागरिकांमध्ये नवलाई होती. मात्र, वर्षभरात ती दूर झाली. प्रशासनात ते आक्रमक ठरतील, असे वाटत होते. मात्र, आज साडेतीन वर्षांचा कालावधी लोटूनही फडणवीस सरकराला छाप पाडण्यास अपयश आले आहे. तरुण-अभ्यासू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेतूबद्दल नव्हे, तर आता क्षमतेवर शंका असल्याचा थेट आरोप कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी केला. ‘लोकमत व्यासपीठ’ या उपक्रमांतर्गत भाई जगताप बोलत होते. मुंबई ते दिल्लीपर्यंतच्या परिस्थितीवर या वेळी त्यांनी मतप्रदर्शन केले. मुंबईसह राज्यातील कामगारांच्या प्रश्नांवरही त्यांनी आक्रमक शैलीत सडेतोड भाष्य केले.
जगताप पुढे म्हणाले की, युती सरकारात चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आणि स्वत: मुख्यमंत्री वगळता, एकाही मंत्र्यांला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. सरकारची कामगिरी खरे तर निराशाजनक आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. पंकजा मुंडे यांना स्वत:ची ओळखही निर्माण करता आलेली नाही. शिवसेनेची अवस्था तर भाजपापेक्षाही बिकट आहे. शिवसेनेतील एकाही मंत्र्यांनी उल्लेखनीय काम करता आलेले नाही.
गुजरातमधील निकालाबाबत ते म्हणाले, राष्ट्रवादीमुळे काँग्रेसला गुजरात निवडणुकीत ८ जागा गमवाव्या लागल्या, ही वस्तुस्थिती आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद मोदी यांना अनेक सभा घ्यावा लागल्या, तरीदेखील गुजरात निवडणुकांत भाजपाची दमछाक झाली. गुजरातच्या जनतेने दिलेला हा सूचक संदेश आहे. मोदींसारखे मार्केटिंग करणे आम्हाला जमले नाही. तथापि, आजच्या तरुणाईला रिझल्ट हवा, तो देण्यास केंद्रात मोदी-राज्यात फडणवीस सरकार अपयशी ठरत आहे.
राज्यात जनआक्रोश, हल्लाबोल असे आंदोलन करत, काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेच्या रोषाला वाट करून दिली. राज्यात साडेतीन वर्षांच्या काळात जातीयवादी राजकारण सुरू आहे. एसटी महामंडळातील कामगार संप हे योग्य उदाहरण. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संपाबाबत योग्य वेळी हस्तक्षेप करणे आवश्यक असताना, त्यांनी हात झटकत पक्षीय राजकारण केले. आता राज्याच्या भल्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीला एकत्र येऊन लढावे लागेल.
शब्दांकन -महेश चेमटे

फडणवीस
‘वचनभंगी’ मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे वचनभंगी मुख्यमंत्री आहेत. आम्ही नागपूरमध्ये उमेदवार दिला नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवून मुंबईत उमेदवार दिला. विधान परिषदेत राष्ट्रवादीनेदेखील धोका दिला. मात्र, शरद पवारांनी माझ्यासाठी स्वत: सर्व राष्ट्रवादीच्या संबंधितांना फोन केले होते. कामगारांच्या चळवळी देशभर नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, राज्यात भाजपाचे हे मनसुबे आम्ही उधळून लावले, असेही भाई जगताप म्हणाले.

एसटी संपविण्याचा घाट!
राज्यातील दुर्गम भागात एसटीशिवाय पर्याय नाही. केवळ शिवशाही चालवून महामंडळ ‘अपडेट’ करता येणार नाही. धोरणात्मक निर्णय गरजेचे आहेत. महामंडळाची स्थिती सुधारण्यासाठी ते सरकारमध्ये विलीन करणे हा एकमेव पर्याय आहे. भाजपा-सेना यांच्यातील वादात एसटीच्या लाखभर कर्मचाºयांचा बळी जात आहे.टप्पे वाहतूक हा एसटीचाच अधिकार आहे. मात्र, राज्यात सर्रास आगारात घुसून खासगी टप्पे वाहतूकदारांकडून प्रवासी पळविले जातात. त्यामुळे सरकार योग्य निर्णय का घेत नाही, हे न उलगडलेले कोडे आहे. युती सरकार एसटी महामंडळ संपविण्याचा घाट घालत असल्याचा आरोप जगताप यांनी केला.

आयुक्तांनी हिंमत दाखवावी
मुंबईत तरंगते हॉटेल सुरू करण्याआधी गच्चीवरील हॉटेलमधील जिवांशी खेळ थांबवा. सुविधा देताना सुरक्षेची काळजी घ्या. कमला मिल आग प्रकरणी आयुक्त अजय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आयुक्त पदावरील अधिकाºयांनी माझ्यावर दबाव होता, हे म्हणणे चुकीचे आहे. हिंमत दाखवून आयुक्तांनी दबाव आणणाºयाचे बिनदिक्कत नाव घ्यावे, असे आवाहनही भाई जगताप यांनी केले.

Web Title:  No doubt on the motive of the Chief Minister! -Brother Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.