भाजपा सरकार कॉंग्रेसपेक्षाही थापाडे, राज ठाकरे यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 05:36 PM2018-10-22T17:36:12+5:302018-10-22T17:37:18+5:30

केवळ भूलथापांच्या बळावर सत्ता भोगणाऱ्या राजकारण्यांनी देशाचे, पर्यायाने महाराष्ट्राचे वाटोळे केले.

BJP government is more liar than Congress - Raj Thackeray | भाजपा सरकार कॉंग्रेसपेक्षाही थापाडे, राज ठाकरे यांची घणाघाती टीका

भाजपा सरकार कॉंग्रेसपेक्षाही थापाडे, राज ठाकरे यांची घणाघाती टीका

Next

 वणी (यवतमाळ) - मी २९ वर्षांपूर्वी राजकारणात आलो. या काळात अनेक सरकारे बदललीत, माणसे बदललीत;  परंतु समस्या मात्र त्याच आहेत. केवळ भूलथापांच्या बळावर सत्ता भोगणाऱ्या राजकारण्यांनी देशाचे, पर्यायाने महाराष्ट्राचे वाटोळे केले. यापूर्वीचे कॉंग्रेस आणि आताचे भाजपा सरकारदेखील थापाडे आहे, असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केला. 

सोमवारी येथे आयोजित मनसे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर, हेमंत गडकरी, संजय चित्रे, अनिल शिदोरे, विठ्ठल लोखंडकर, आनंद एंबडवार, राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, राजेश कदम उपस्थित होते. 

राज ठाकरे म्हणाले, मी विदर्भाच्या दौºयावर आल्यानंतर सर्वप्रथम अमरावती जिल्ह्यात फिरलो. तेथील सामान्यांच्या समस्या पाहून व्यथीत झालो. आपण केवळ कॉंग्रेसलाच शिव्या घालतो. परंतु भाजपा सरकार त्याहीपेक्षा बनावट आहे. त्यामुळे आधीच्या आणि आताच्या सरकारला बाजुला सारा आणि फक्त एकदा राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

मनसे सैनिकांना जनजागृतीचे आवाहन
मोदी म्हणतात, दीड कोटी घरे बांधलीत, ही घरे आम्ही शोधायची कुठे? हे लोक कुठून आकडे आणतात आणि आपल्यापुढे फेकतात आणि आपणही या आकड्यांना भुलतो, असे राज ठाकरे म्हणाले. सर्वच राजकीय पक्ष खोटारडे आहेत. मात्र माध्यमातून हा खोटारडेपणा लिहला जात नाही वा दाखवला जात नाही, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. आता केवळ घोषणा देऊन चालणार नाही, तर प्रत्येक मनसे सैनिकांनी घरोघरी जाऊन ही वस्तुस्थिती लोकांना सांगितली पाहिजे. लोकांना जागृत केले पाहिजे, असे ते म्हणाले. 

पुन्हा वणीत येणार
आज राजकीय भाषण करण्याची वेळ नाही, अनेक मुद्यांवर बोलायचे आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात वणीत येणार आहे, त्यावेळी सविस्तर मी आपल्याशी बोलेन, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी प्रास्ताविक केले. 

या कार्यकर्ता मेळाव्याला वणी मतदार संघातील पाच हजारांवर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी राज ठाकरे यांचे स्थानिक टिळक चौकात मनसेच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. तेथून ठाकरे मेळावास्थळी रवाना झालेत. राज ठाकरे यांचे व्यासपिठावर आगमन होताच राजू उंबरकर व पदाधिकाºयांनी २१ फुटाच्या भल्यामोठ्या हाराने राज ठाकरे यांचे स्वागत केले.

Web Title: BJP government is more liar than Congress - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.