काँग्रेस गड राखणार की, भाजप बाजी मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 05:01 AM2019-07-20T05:01:10+5:302019-07-20T05:01:16+5:30

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात तीन काँग्रेस आणि तीन भाजपा अशी समसमान सत्ता आहे.

BJP will be able to keep the Congress fort, will it? | काँग्रेस गड राखणार की, भाजप बाजी मारणार?

काँग्रेस गड राखणार की, भाजप बाजी मारणार?

Next

- हणमंत गायकवाड 
लातूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात तीन काँग्रेस आणि तीन भाजपा अशी समसमान सत्ता आहे. मात्र, लोकसभेतील विजयामुळे सध्या भाजपाचे मनोबल उंचावले असून तिकिटासाठी प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची गर्दी वाढली आहे़
तूर्त उमेदवार कोण हे निश्चित नसल्याने भाजपात दिसणारे बाहुबळ प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात विखुरते की टिकते, हे पहावे लागणार आहे़ तर काँग्रेसला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या निम्म्या जागा टिकविण्याचे आव्हान आहे़ लातूर शहर आणि निलंगा या दोन मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे़ निलंग्यातून विद्यमान पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर भाजपाकडून मैदानात असतील़ हा एकमेव मतदारसंघ असेल, जिथे भाजपाचा उमेदवार निश्चित आहे़ आजोबा विरूद्ध नातू, काका विरूद्ध पुतण्या अशी लढाई झालेल्या निलंगा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष राहिले आहे़ माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, दिवंगत नेते विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री डॉ़शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा प्रदीर्घ काळ प्रभाव राहिलेल्या लातूर जिल्ह्यात काँग्रेसचे कायम वर्चस्व राहिले़ मात्र २०१४ च्या मोदी लाटेत काँग्रेसने लोकसभेची जागा अडीच लाखांच्या फरकाने गमावली़ त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहा पैकी लातूर शहर, लातूर ग्रामीण व औसा या तीन विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसने विजय मिळविला होता़ त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेची गणिते वेगळी आहेत, असा अंदाज बांधून काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न करीत आहेत़ लातूर शहरात माजी राज्यमंत्री आ़ अमित देशमुख मोदी लाटेनंतरच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ४९ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते़ मात्र गेल्या पाच वर्षात भाजपाने मनपामध्ये सत्ता मिळविली़ निलंगेकरांनी शहरात लक्ष घातले आहे़ त्यामुळे लातुरात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे़ अहमदपूर मतदारसंघात एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा निवडून येत नाही, अशी परंपरा आहे़ अपक्ष म्हणून निवडून आलेले आ़ विनायक पाटील आता भाजपात आहेत़ तिथे राष्ट्रवादी कडवे आव्हान देण्याच्या तयारीत आहे़ उदगीरमध्ये सलग दोनदा विजय मिळविलेले भाजपाचे आ़ सुधाकर भालेराव हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत आहेत़ त्यांनाही तिकिटासाठी संघर्ष करावा लागेल, असे आजचे राजकीय चित्र आहे़ राखीव मतदारसंघ असलेल्या उदगीरमधून भाजपा विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होणार असली तरी तिकीट वाटपात काँग्रेसही जागा मागत आहे़ या सबंध लढाईत वंचित बहुजन आघाडी सर्वत्र उमेदवार उभारणीच्या तयारीला लागली असून, जिल्ह्यात अ‍ॅड़ अण्णाराव पाटील यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली आहे़ औसा व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आ़ बसवराज पाटील व आ़ त्र्यंबक भिसे यांना भाजपा आव्हान देण्याच्या तयारीत आहे़ औसा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी भाजपाने बांधणी केली आहे़ लातूर ग्रामीणमध्येही पारंपरिक लढाई होते की काँग्रेस-भाजपा उमेदवार बदलणार यावर लवकरच फैसला होईल़
>सर्वाधिक मोठा विजय
लातूर शहर : आ़ अमित देशमुख (काँग्रेस)
४९,४६५ (पराभव : शैलेश लाहोटी, भाजप)
कमी मताधिक्याने पराभव
अहमदपूर : बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
४००६, (विजयी : विनायकराव पाटील, अपक्ष)
सध्याचे पक्षीय बलाबल
एकूण जागा ६, काँग्रेस -३, भाजप - ३

Web Title: BJP will be able to keep the Congress fort, will it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.