कासेगावच्या नानासाहेबांना सलाम! --- जागर --रविवार विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 01:09 AM2017-12-31T01:09:07+5:302017-12-31T01:10:20+5:30

मनाला जे पटेल तेच बोलणार, ऐकणाºयाला आवडेल ते मी बोलत नाही, अशी नानासाहेब यांची कायमची भूमिका आहे.

Hello Kansgaonana Nanak! --- Jagar - Sunday special | कासेगावच्या नानासाहेबांना सलाम! --- जागर --रविवार विशेष

कासेगावच्या नानासाहेबांना सलाम! --- जागर --रविवार विशेष

googlenewsNext

- वसंत भोसले
मनाला जे पटेल तेच बोलणार, ऐकणाºयाला आवडेल ते मी
बोलत नाही, अशी नानासाहेब यांची कायमची भूमिका आहे. नानासाहेब अत्यंत पोटतिडकीने भाषण करतात. त्यामागे प्रचंड अभ्यास, अनुभव आणि प्रत्यक्ष काम केल्याचे दाखले असतात. प्रत्येक विभागातील पिके, तेथील शेती, त्यांच्या समस्या याचा त्यांचा अभ्यास आहे.


लोकमत’तर्फे महाराष्ट्रातील गावोगावचे उत्कृष्ट काम करणाºया सरपंचांचा गौरव समारंभ चालू आहेत. परवा सातारा आणि काल सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाºया सरपंचांचा जिल्हा स्तरावर निवड करून सत्कार करण्यात आला. सांगलीतील सत्कार समारंभासाठी प्रमुख वक्ते म्हणून राज्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील आणि पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार शिवाजीराव नाईक उपस्थित होते. सरपंचांसमोर पॉवरपॉर्इंट प्रेझेंटेशनच्या साहाय्याने बोलले तर चालेल का, असा सवाल करीत नानासाहेब समारंभाला आले. पुणे-बंगलोर महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील कासेगावचे ते सुपुत्र आहेत. स्वत:ची शेती स्वत: करतात. आयएएस शेतकरी म्हणायला हरकत नाही. कासेगावच्या पश्चिमेस असलेल्या पाटील मळ््यात वर्षातील सहा महिने राहतात. उर्वरित महिने अमेरिकेसह जगातील अनेक देशांत फिरत असतात. नगर, जळगाव आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम करून महाराष्ट्राच्या मंत्रालयात सुमारे वीस वर्षे आरोग्य, नगरविकास, कृषी, आदी खात्यांचे सचिव म्हणूनही काम केले. अतिरिक्त मुख्य सचिवपदावरून निवृत्त झाले.

मनाला जे पटेल तेच बोलणार, ऐकणाºयाला आवडेल ते मी बोलत नाही, अशी त्यांची कायमची भूमिका आहे. अधिकारी किंवा न्यायाधीश निवृत्त झाल्यावर स्पष्टपणे बोलतात, पदावर असताना का बोलत नाहीत, असे सामान्य माणसांना वाटते. त्याला कासेगावचे हे शेतकरी नानासाहेब पाटील अपवाद आहेत. साहेब, हे करू नका, महाराष्ट्राचे वाटोळे होईल, असे स्पष्टपणे मंत्र्यांसमोर बजावून बोलणारे ते आहेत. निवृत्त झाल्यावर एकतर शेतावर किंवा मुलांकडे अमेरिकेत स्थायिक होण्याऐवजी हा अवलिया माणूस प्रशासनात जाण्यापूर्वी ज्या पोटतिकडीने समाज आणि जग समजून घेत होता. त्याच तीव्रतेने आजही जगभरातील घडामोडींशी नाळ जोडून आहे. त्याचवेळी लातूरच्या बाजार समितीत तूर विकायला आलेला शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कसा नाडला गेला, याची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे असतेच. शिवाय सरकारचे कोणते निर्णय चुकले म्हणून हा तूर उत्पादक शेतकरी नाडला गेला, याची आकडेवारीसह माहिती असते.

आरोग्य सचिव किंवा नगर विकास खात्याचे सचिव असतानाही त्यांनी याच तडफेने काम केले. कृषी सचिव असताना संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला. प्रत्येक विभागातील पिके, तेथील शेती, त्यांच्या समस्या यांचा उत्तम अभ्यास त्यांचा आहे. हे पद सोडून अनेक वर्षे झाली म्हणून त्यांची माहिती जुनी नाही ठरत, कारण शेतीतील त्या-त्या भागातील नवीन प्रयोग, त्यांचे यशापयश त्यांना माहीत आहे. नगर विकास खात्याचे सचिवपद सांभाळताना शहरीकरण रोखणे शक्य नाही, पण त्याचा विस्तार करता येऊ शकतो. महाराष्ट्राच्या सकल उत्पन्नात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर शहरांचा वाटा ५२ टक्के आहे. उर्वरित महाराष्ट्र ४८ टक्क्यात संपतो. तेव्हा मुंबई-नाशिक-पुणे या त्रिकोणाऐवजी महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरे जागतिक दर्जाची म्हणून विकसित करण्याचा त्यांचा मानस होता. संपूर्ण आराखडा तयार करून ते सरकारच्या मागे लागले, पण सरकार ढीमच! महाराष्ट्राने हे पाऊल उचलले असते तर आज त्याला एक वेगळे रूप आले असते, असा ठाम आत्मविश्वास ते व्यक्त करतात. त्यासाठी त्यांनी संपूर्ण जगभरातील शहरीकरणाचा अभ्यास केला होता. त्याला पर्यावरण, अर्थकारण आणि तत्कालीन परिस्थितीच्या बदलाचे संदर्भही जोडले होते.

सरकारने प्रतिसाद दिला नाही म्हणून त्यांनी मिळेल त्या जबाबदारीच्या पदावरून काम करताना प्रयत्न सोडून दिले नाहीत. सर्व व्यवस्थेत जेवढे जमेल तेवढे रेटण्याचा प्रयत्न त्यांनी केला. निवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांनी एक उत्तम संधी मिळताच, त्याच्याआधारे महाराष्ट्रातील गाव, गावची

माणसं आणि जगभराचा व्यवहार याची सांगड घालून ते उत्तम अभ्यास करीत आहेत. निवृत्तीनंतर कासेगावच्या या सुपुत्राला आशियाई बँकेने चीनमधील बदल आणि सिंगापूरचे यश यावर अभ्यास करण्यास सांगितले. ते दोन वर्षे चीनमध्ये राहिले. अधूनमधून सिंगापूरला जाऊन तेथील विकासाच्या टप्प्यांचा अभ्यास करू लागले. याचे कारण होते, सिंगापूरला ज्या उंचीवर ठेवले होते, ते पंतप्रधान ली क्युन येव चीनच्या बदलासाठीच्या धोरणाचे दहा वर्षे सल्लागार होते.
हा सर्व प्रवास सरपंचांसमोर मांडताना याचा त्यांच्या गावाशी काय संबंध आहे, हे सांगण्यास विसरले नाहीत. म्हणून तर नानासाहेब पाटील यांच्या चिकित्सकवृत्तीला सलाम करायला हवा. निवृत्तीनंतर सत्तरीकडे झुकलेले साहेब लॅपटॉप घेऊन बोलताना एकादा गावरान गडी फरड्या आवाजात सभागृह दणकून टाकावे, तशी मांडणी करीत राहतात. याचे कारण त्यांना गावातील गटार योजना कशी राबविली जाते, ती यशस्वी का होत नाही, त्या तुंबलेल्या गटारी डासनिर्मितीची केंद्रे कशी होतात, याची माहिती आहे. त्याचवेळी स्वत:चे पिण्याचे पाणी नसताना, शेतीसाठी जमीन नसताना सिंगापूरसारखे केवळ ८६ चौरस किलोमीटरचे एक बेट विकसित राष्ट्र कसे काय उभे राहू शकते? आणि जगातील सर्वांत उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करू शकते, याची इत्थंभूत माहिती ते मांडतात.

भारत आणि चीन जवळपास एकाच वेळी आपल्या स्वातंत्र्याच्या पहाटेचे साक्षीदार आहेत. त्यांचीही लोकसंख्या अफाट, मागासलेली शेती आणि त्यावर अवलंबून राहणारी बहुतांश लोकांचे दारिद्र्य! अशीच परिस्थिती भारतात आहे, पण त्या चीनने औद्योगिक क्रांती केली, भले मोठे औद्योगिक पट्टे उभारले आणि आज जगाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा त्यांचा वाटा पंचेचाळीस टक्के आहे.

आपले राष्ट्रीय उत्पन्न तीन ट्रिलियन्स आहे, त्यांचे बारा आहे. हा सर्व बदल कसा केला? चीनने औद्योगिक उत्पादन वाढविले, शेतीवरील लोकसंख्या कमी केली, ती सत्तर टक्क्यांवरून बावीस टक्क्यांपर्यंत खाली आणली आहे. आपण अजूनही पन्नास टक्क्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर ठेवून आहोत. त्यातील निम्म्याहून अधिक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून पारंपरिक आहे. त्यांनी तरुणांना कुशल कामगार बनण्याचे शिक्षण दिले. आपण निरुपयोगी बी.ए., बी. कॉम., एम. ए., एम. कॉम.मध्ये शिक्षण देत बसलो. परिणामी नव्या तंत्रज्ञानामुळे विकसित झालेल्या संगणक, मोबाईल, खेळणी, आयफोन आदी बाजारपेठेचे ते राजेच झाले आहेत. शेतीवरील भार कमी न करता आपण ग्रामविकासाच्या भंपक कल्पना राबवित आहोत.

गावोगावच्या पारावर बसणाºया तरुणांकडे ज्ञानाने कुशलता आलेली नाही. संगणक, मोबाईल किंवा आयफोन निर्माण आणि दुरुस्त करणारी उत्तम पिढीच आपण पुरेशी उभी केली नाही. आज अमेरिकेच्या बाजारात निम्म्याहून अधिक चायना मेड असलेला माल भरलेला आहे. हे केवळ शक्य झाले ते शेती सोडून इतरत्र वळण्याने !
गावे विकसित झाली पाहिजे, पण ती ग्रामविकासाच्या कल्पनेने नाही तर शहरी सुविधांसह गावे नव्याने उभी राहिली पाहिजेत. शेती केली पाहिजे पण ती पारंपरिक नको. जत, कवठेमहांकाळपासून आटपाडी, माण, म्हसवड ते पाथर्डीपर्यंत असा मोठा कायम दुष्काळी पट्टा आहे. तेथे खाली पडणाºया पावसाच्या पाण्यापेक्षा बाष्पीकरणाने पाणी वर अधिक जाते. पाण्याची सोय नाही. तेथे ज्वारी, बाजरी घेणारी शेती कसली करता? ती बंद करून पशुपैदास करणारी शेती करायला हवी. त्यासाठी केवळ चारा उत्पादन करा. आज वाढत्या शहरीकरणाबरोबर पालेभाज्या, फळे, मांस, अंडी आदींची प्रचंड मागणी वाढते आहे. त्या बाजारात उतरण्यासाठी शेतीला पशु पैदास करणारी जोड द्यायला हवी. किंबहुना मुख्य व्यवसाय तोच आणि त्यासाठी शेतजमिनीचा वापर करायला हवा.

चीन हा देश गेली तीन दशके हे करीत आला आहे. त्यापासून आपण काही शिकत नाही. तरुणांना काही शिकवत नाही. आपल्या प्रत्येक तालुक्याच्या गावापर्यंत उघडण्यात आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील ज्ञान हे कालबाह्य झालेले आहे. त्याच्यापुढे जग गेले आहे. याचे भानच राज्यकर्त्यांना नाही. एक पंतप्रधान बोलतच नव्हते आणि दुसरे बोलतच राहतात. ते स्वत:वर तरी प्रेम करीत होते का, आणि हे स्वत:च्याच प्रेमात आहेत, ही त्यांची टिप्पणी खळखळून हसवून जाते.
केंद्र शासन काय, राज्य शासन काय? त्यांचे धोरणे म्हणजे एक हाताचे दुसºया हातात समजत नाही. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. तुरीचे भाव वाढले होते, सरकारनेही तूर लावण्याचे शेतकºयांना आवाहन केले. तुरीचा भाव वाढत होता म्हणून व्यापार मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात तूर आयात केली. हे शेतीखात्याला माहीतच नव्हतं. देशात तुरीचे प्रचंड उत्पादन आले आणि उतरले. आता ही दोन्ही मंत्रालये एकमेकांना दोष देतात. अशा अवस्थेत गावच्या सरपंचाने गटारी, रस्ते अशा गोष्टीतच पडून न राहता, गावच्या वेशीवर लाखो रुपये खर्चून बिनकामाची प्रवेशद्वाराची स्वागत कमान उभी करू नका, कारण कमान भलीमोठी आणि गावात गलिच्छपणा हे उदाहरण प्रत्येक ठिकाणी दिसते आहे. त्याऐवजी गावात उत्तम दोन खोल्या बांधा, त्याला ग्रंथालय करा आणि इंटरनेट, दर्जेदार पुस्तके, मासिके आणून मुलांना वाचायला लावा. जगभरातील ज्ञान त्यांना मिळू द्या. नानासाहेब यांचे हे तडाखेबाज भाषण अत्यंत पोटतिडकीने चालू असते. त्यामागे प्रचंड अभ्यास, अनुभव आणि प्रत्यक्ष कामकेल्याचे दाखले असतात. घरातील कचरा बाहेर टाकला आणि तो पालिकेने किंवा ग्रामपंचायतीने गावाबाहेर नेऊन रचून ठेवला म्हणजे स्वच्छता अभियानाचे थोतांड पूर्ण झाले असे वाटत असेल ते पूर्णत: चुकीचे आहे. घरातूनच त्याचे वर्गीकरण, मग एकत्रीकरण आणि प्रक्रिया अशी साखळी जगभर राबवितात. आपण ती साखळीच निर्माण न करता स्वच्छतेचे धडे देणारी जाहिरातबाजी करत आहोत, हे सांगून गावाने आपले म्हणून एकतरी उत्पादन विकसित केले नाही, तर विकास होणार नाही. तरुणांना कौशल्याचे शिक्षण देणार नसू तर भावी पिढी उभी राहणार नाही.
हे सर्व सांगत आधुनिक चीन, आपला भारत आणि विकसित राष्ट्रे, यात गावाकडची स्थिती उत्तम पद्धतीने मांडणाºया कासेगावच्या नानासाहेबांना सलाम !
(टीप : हे आता समाजवाद्यांनाही पटलं आहे. डॉ. बाबा आढाव त्यांची महाराष्ट्रभर चाळीस व्याख्याने आयोजित करणार आहेत.)

Web Title: Hello Kansgaonana Nanak! --- Jagar - Sunday special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.