विद्यार्थ्यांनी स्वत:ची क्षमता ओळखून निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तमतेचा ध्यास घ्यावा - उद्योजक हणमंतराव गायकवाड यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 07:16 PM2018-11-18T19:16:57+5:302018-11-18T19:17:59+5:30

जळगावात एस.डी.सीडतर्फे ६०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान सोहळा

Students should look for excellence in the selected field | विद्यार्थ्यांनी स्वत:ची क्षमता ओळखून निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तमतेचा ध्यास घ्यावा - उद्योजक हणमंतराव गायकवाड यांचा सल्ला

विद्यार्थ्यांनी स्वत:ची क्षमता ओळखून निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तमतेचा ध्यास घ्यावा - उद्योजक हणमंतराव गायकवाड यांचा सल्ला

Next
ठळक मुद्दे१० कोटी लोकांच्या जीवनात आणणार परिवर्तनकौशल्य विकासाची गरजअन् बीव्हीजी गृपची झाली स्थापना

जळगाव : विद्यार्थ्यांनी नुसत चांगल, उत्तम कामावर समाधान न मानता सर्वोत्तम काम करण्याचा ध्यास घेतला पाहिजे. त्यासाठी आधी स्वत:ची क्षमता, आवड ओळखून क्षेत्र निवडा, काहीतरी वेगळ शिका व त्यात सर्वोत्तमतेचा ध्यास घ्या. जगात प्रचंड संधी उपलब्ध आहेत, असे मार्गदर्शन प्रसिद्ध उद्योजक व भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड (पुणे) यांनी केले.
एसडी-सीड अर्थात सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजनेंतर्गत गरजू आणि गुणवंत अशा ६०० विद्यार्थ्यांना रविवार, १८ रोजी सकाळी महाबळ रोडवरील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात मोठ्या थाटात शिष्यवृत्तीचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री सुरेशदादा जैन, एसडी-सीडच्या अध्यक्षा रत्नाभाभी जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर रमेशदादा जैन, गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, राजा मयूर, मेजर नाना वाणी, माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड उपस्थित होते.
मलाही मदतीची गरज होती, मात्र जळगाव माहित नव्हते
भाषणाच्या प्रारंभीच एस.डी.सीडतर्फे ६०० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याच्या या उपक्रमाचे कौतुक करीत हणमंतराव गायकवाड म्हणाले की, मलाही शिक्षण सुरू असताना मदतीची गरज होती. मात्र तेव्हा जळगावची माहिती नव्हती. नाहीतर कदाचित मला कमी परिश्रम करावे लागले असते.
शिवाजी महाराज, विवेकानंद आदर्श
गायकवाड म्हणाले की, आयुष्यात मला अडचणीच्या काळात हजारो लोकांनी मदत केली. अन शेकडोंनी अपमानही केला. मात्र प्रत्येक गोष्ट मी सकारात्मकतेने स्विकारली. त्यामागे छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचे विचार आहेत. त्यांनाच आदर्श मानून मी आयुष्यात वाटचाल केल्याचे सांगितले. लहानपणी वडिल व्याख्यानाला घेऊन जात. त्यात स्वामी विवेकानंद व छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्याने ऐकली,अन त्यांनाच जीवनाचा आदर्श मानले.
खडतर बालपण
आज बीव्हीजी गृपच्या माध्यमातून देशभरात ८० हजार लोकांना रोजगार दिलेल्या गायकवाड यांनी त्यांच्या बालपणातील खडतर दिवसांची आठवणही सांगितली. साताऱ्यात शिकत असताना घरी लाईटही नव्हते. केवळ श्रीमंतांकडेच विजेचे दिवे असत. कंदीलाच्या उजेडातच अभ्यास केला. चौथीला शिष्यवृत्ती मिळाल्याने वडिलांनी मुलगा हुशार असल्याने तो शिकावा म्हणून पुण्यात आणले. तेथे ९ बाय ११ फुटांच्या खोलीत सर्व कुटुंब रहात असे. बसने ये-जा करायला पैसे नसत. आई शिवणकाम करून पैसे मिळवित असे व बससाठी पैसे देत असे. वडील आजारी पडल्याने आईचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली. मी आयएएस अधिकारी व्हावे, असे वडिलांना वाटे. मात्र दहावी नंतर डिप्लोमाला प्रवेश घेतला. अन दुसºया वर्षीच वडिलांचे निधन झाले. रहमतपुरहून आजी-आजोबा पुण्यात सोबत रहायला आले. ते आजारी राहत असल्याने बीईसाठी पुणे सोडून जाता आले नाही. पुण्यातीलच २१ किमी अंतरावरील व्हीआयटीला बीईसाठी प्रवेश घेतला. सायकलवरून ये-जा करावी लागत असते. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेऊन, पेंटींगची कामे करून किंवा इतर कामे करून स्वत:च्या शिक्षणाचा खर्च स्वत:च भागविला. वेगळ काही तरी करायच म्हणून भारत विकास प्रतिष्ठानची स्थापना १९९१ मध्ये करून त्यामाध्यमातून काही गरजू विद्यार्थ्यांना मदतही केली.
अन् बीव्हीजी गृपची झाली स्थापना
गायकवाड म्हणाले की, पुण्यात टाटा कंपनीत नोकरी मिळाली. त्यात पर्चेस डिपार्टमेंटमध्ये काम करताना स्वत:च्या ड्युटीपेक्षा अधिक वेळ थांबून कंपनीचे वाया जाणार असलेले अडीच कोटी रूपये वाचविले. त्यावेळी ८ हजार रूपये पगार होता. म्हणजेच कंपनीचा २५० वर्षांचा पगार वाचविला. त्याबदल्यात कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी गायकवाड यांना बोलावून तुम्हाला काय हवे? अशी विचारणा केली. गायकवाड यांनी स्वत:साठी काही नको. गावाकडच्या त्यांच्या काही मित्रांना नोकरी देण्याची मागणी केली. मात्र त्या मित्रांचे शिक्षण नसल्याने तसेच त्यांच्या दृष्टीने कामही नसल्याने हाऊसकिपींगचा ठेका द्यायचा आहे. ते काम करतील का? अशी विचारणा केली. त्यास गायडवाड यांनी संमती दर्शविली. त्यातूनच बीव्हीजी गृपची स्थापना होऊन त्या माध्यमातून हाऊसकिपींगच्या कामाचा ठेका घेऊन मित्रांना काम मिळवून दिले. त्यानंतर काही महिन्यांनी पत्नी व आईची परवानी मिळवित गायकवाड यांनी टाटा मोटर्समधील कंपनीचा राजीनामा देऊन बीव्हीजी गृपच्या कामास पूर्णपणे वाहून घेतले.
अल्पावधीतच घेतली भरारी
अल्पावधीतच कंपनीने भरारी घेतली. आज राष्टÑपती भवन, संसदभवन, राजभवन, पंतप्रधान निवास, यासह देशतील प्रमुख विमानतळ, इतकेच नव्हे देशातील मोठे देवस्थान यांचे काम मिळविले. मध्यप्रदेश पोलिसांना वाहने पुरविण्याचे काम मिळविले. तर महाराष्टÑात शासनाला आरोग्यसेवेसाठी अ‍ॅम्बुलन्स सेवा पुरविण्याचे काम मिळविले. सोलरच्या क्षेत्रात, तसेच कृषी क्षेत्रातही त्यांनी काम सुरू केले आहे. सेंद्रीय शेतीसाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. विषमुक्त श्ोतीसाठी आवश्यक औषधे देखील त्यांच्या बीव्हीजी गृपने तयार केली असल्याचे सांगितले. आजही ६० टक्के भाकड जनावरे पुन्हा दुभती करून देण्याचे आव्हानही स्विकारण्याची तयारी असल्याचे सांगितले. ३०० रूपयांच्या औषधात मोतीबिंदू विरघळून जातो. आॅपरेशनची आवश्यकता रहात नाही, असे औषधही तयार केले असल्याचे सांगितले.
कौशल्य विकासाची गरज
गायकवाड म्हणाले की, विद्यार्थ्यांनी त्यांचे निरीक्षण चांगले ठेवले पाहिजे. तसेच गणिताचा पाया पक्का असला पाहिजे. किमान सामान्यज्ञान असले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाची गरज आहे. नुसत चांगल असून चालत नाही. सर्वोत्तम असण्याचा ध्यास घ्यावा लागतो. असे केले तर जगात प्रचंड संधी आहेत. जर्मनीत भारतीयांपेक्षा दरडोई उत्पन्न ३२ पट अधिक आहे. तेथील मित्राला त्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, कुठलेही काम शिकणाºयास तो त्या कामात १०० टक्के पारंगत झाल्याशिवाय ते काम करण्याची परवानगीच मिळत नाही.
१० कोटी लोकांच्या जीवनात आणणार परिवर्तन
गायकवाड म्हणाले की, पुढील १२ वर्षात किमान १० कोटी लोकांच्या आयुष्यात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न आहे. त्या संकल्पासाठी विजय दर्डा, सुरेशदादा जैन तसेच ‘लोकमत’नेही सहकार्य देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की बीव्हीजी गृपच्या माध्यमातून शेतकºयांचा उत्पादन खर्च निम्म्यावर आणण्याचा व उत्पादन दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. निती आयोगासमोर याबाबत दोन वेळा सादरीकरणही केले आहे. विषमुक्त श्ोतीसाठी चळवळही सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना नेमके काय करावे हेच कळत नाही. एखादे व्याख्यान ऐकले की सगळेच स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून अधिकारी बनण्याच्या मागे लागतात. त्यातील एखादाच यशस्वी होतो. बाकीचे मात्र निराश होतात. त्यासाठी करीअर कौन्सीलींगचे काम हाती घेतले आहे.



 

Web Title: Students should look for excellence in the selected field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.