प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:41 PM2018-03-14T12:41:13+5:302018-03-14T12:41:13+5:30

Ever since the original image? | प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट?

प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट?

Next

जळगाव शहरातील रसिकांना नव्याने पाहायला मिळालेल्या या कलाकृतीला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, मुंबईचे सुप्रसिद्ध चित्रकार तुका जाधव, वाघमारे यांच्यासह अनेक रसिकांनी भरभरून दाद दिली. जैन उद्योग समूहातील लेखक आणि कला समीक्षक ज्ञानेश्वर शेंडे यांनी केलेले मुक्त चिंतन ‘लोकमत’च्या वाचकांसाठी.
लाकार विजय जैन यांच्या या अफलातून कलाकृतीचा कानोसा घेताना जाणवले की, प्रतिमांना स्वत:ची भाषा असते, स्पंदनांची विशिष्ट लयही. मनातल्या नानाविध विभ्रमांना स्वत:मध्ये सामावून घेण्याची समावेशकताही प्रतिमांमध्ये असतेच असते. प्रतिमा डोळ्याला डोळा भिडवून प्रेक्षकांशी काही बोलू इच्छितात. ज्याच्या त्याच्या वकुबानुसार, जडणघडणीनुसार, रूची-अभिरूचीनुसार महत्त्वाचं म्हणजे ‘उन्हातल्या तल्खलीनुसार’ आकलनाचा विस्तार वा मर्यादा मात्र ठरलेल्या आहेत.
आयुष्यात सर्वात जास्त ओशाळवाणी होणारी एकमेव बाब म्हणजे आरसा. हा आरसा इथेही आहे. आरसा सर्वव्यापी, सर्वसाक्षी.
घडाळ्याचे निखळलेले काटे भैरवीच्या निरूपणाची आठवण करून देणारे. काळाला क्षणभरासाठी थांबवण्याची ताकद कुणामध्ये आहे? गेलेला प्रत्येक क्षण त्याच उत्कटतेसह आपल्या ओंजळीत पुन्हा कधी कधीही येत नाही. घरंगळत जाणारे हे काचमणी. कुणाला याची कवडीची किंमत तर कुणी क्षणाला नवा अर्थ देतो! घड्याळ्याचे हे काटे निखळतानाही शहाणपण देताहेत.
‘अनायासे वाहे पाणी, तशी सहज बोलणी
तसे काही नाही मनी, फक्त अशा आठवणी’
पुरुषोत्तम पाटील तथा कवी पुपाजींच्या शब्दांची आठवण देणारी ही खुर्ची. सुसंगती जगण्याला खेळकर तर ठेवतेच, हृदयातला हळुवार कप्पाही जपते. खुर्चीवर निवांत बसा वा झोपाळ्यावर झुलत रहा वा निर्झराच्या सहवासात लुसलुशीत गवतावर बसून मधात भिजलेल्या शब्दांसह एकमेकांच्या आयुष्यातला गोडवा वाढवा. निवांत बसायला मिळणं, चार शब्द उमलून येणं हेच आता गुलबकावलीचं फूल झालं आहे. भेटणे तेही रसरसून, दिलखुलास, जिवावाड समरस होणं किती दुर्मीळ झालं आहे. खुर्ची निरसपणे बंद होते; नव्हे बंद केली जाते.
अधांतरी छत्री-कधीकाळी एकादोघांना सामावून घेणारी. देह भिजू नये म्हणता म्हणता मनातला चिंब चिंब पाऊस जपणारी. या छत्रीला थेंबाचा स्पर्श नसला तर काळजाला अंकुर फुटणार तरी कुठून? छत्री चिरंतन सोबत करणाºया आजोबांचीही अशावेळी सृजनाचा एक सूर, एक ताल, एक शब्द, सकारात्मक विचारांचा किमयागार आशेची पणती पेटवतो आणि माणसं खडबडून जागी होतात. ही कोवळी ज्योत, ही हिरवी पाने सृजनाचं माहात्म्य सांगणारी. या पानांनी पृथ्वीवरचं चैतन्य सांभाळलं-जोपासलं-वाढवलं. पृथ्वीवर ही हिरवी पाने जितकी जास्त तितकी ही पृथ्वी सुंदर, तितका हा समाज समृद्ध! भोवतालच्या बधिर परिस्थितीला उबगलेल्या जीवांना ही कलाकृती हिरव्या पानाची प्रेरक आठवण देऊ इच्छिते. नवनिमार्णाशी तुमचे-आमचे नाते जोडू बघते. या खिडकीच्या पलीकडे आहे कवी अनिलांच्या सात डौलदार पक्ष्यांची एकसंघ तान, लयदार रेषा आकाशात उमटवणारी विहंगरेषा! त्याच्याही पलीकडे दूरवर इंद्रधनुष्याचे सात रंग आणि आणखी असे खूप काही. जरा जोर लावून एकदा ही खिडकी उघडावीच लागेल, त्याशिवाय क्षितिजाच्या पलीकडे उभे असलेले प्रकाशाचे दूत आत येणार तरी कसे... तुम्हीच सांगा.
पद्मश्री डॉ.भवरलालजी जैन यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून परिवर्तन संस्थेतर्फे विविध कलांच्या माध्यमातून ‘भाऊंना भावांजली’ हा सात दिवसीय सांस्कृतिक सोहळा भाऊंच्या उद्यानात झाला. या सोहळ्याचाच एक भाग म्हणून ११ कलावंतांच्या कलाकृतीचे प्रदर्शन या उद्यानातील वानखेडे आर्ट गॅलरीत भरविण्यात आले. त्यात विजय जैन यांनी मॉडर्न कलेतील समकालिन समजला जाणारा आविष्कार ‘इन्स्टॉलेशन’ ही विखंडन शीर्षकान्वये अप्रतिम कलाकृती साकारली आणि ही कलाकृती भाऊंना समर्पित केली.
विखंडन
मनाचे खेळ...
आपली ‘अस्वस्थता’ आंतरिक...
बाह्य जगाशी संबंध नाहीच.
‘ती’ अस्वस्थता आपण घेऊन चालतोय
आणि तिच इतरत्र पसरवतोय
सतत
ही बंदिस्त घराची एक, ‘रंगहीन सुरकुतलेली भिंत’
फोल्ड केलेली खुर्ची,
बसू देत नाही.
बंद छत्री
आधाराला उरलेली.
..अधांतरी
घड्याळ
कोलमडल्या काळाचं
या अस्वस्थेत आपण खिडकीतून बाहेर बघतोय,
ती सुद्धा खिडकी नाहीये.
तो आहे मनाचा आरासा... विखंडित...
- ज्ञानेश्वर शेंडे

Web Title: Ever since the original image?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव