जळगावच्या बाजारपेठेत मागणी घटल्याने धान्याचे भाव स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 01:06 PM2019-06-27T13:06:52+5:302019-06-27T13:07:25+5:30

धान्य खरेदीसाठी असलेली गर्दी कमी

Due to lack of demand in the market of Jalgaon, the prices of grains are steady | जळगावच्या बाजारपेठेत मागणी घटल्याने धान्याचे भाव स्थिर

जळगावच्या बाजारपेठेत मागणी घटल्याने धान्याचे भाव स्थिर

Next

जळगाव : जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी असलेली गर्दी कमी झाली असून गव्हाची आवक व मागणीही कमी झाल्याने भाव स्थिर आहेत. वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीसह डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी सुरू होती, तीदेखील थांबली आहे. गेल्या दोन महिन्यापासून गहू व डाळीमध्ये दर आठवड्याला तेजी येत असल्याने ग्राहकांची चिंता वाढली होती. दीड महिनाभरापूर्वी वाढलेल्या तांदळाचे भावदेखील महिनाभरापासून स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊन कडधान्याची आवक कमी झाली व त्याचा डाळीवर परिणाम झाला आणि सुरुवातीपासूनच डाळींचे भाव वाढू लागले. त्यात यंदाही पाऊस लांबणार असल्याचे चित्र असल्याने व मागणी वाढल्याने गेल्या दोन महिन्यापासून धान्य, डाळींचे भाव वाढत होते. मात्र मागणी कमी झाल्याने गेल्या आठवड्यात गव्हाचे भावदेखील कमी झाले होते. या आठवड्यात ते स्थिर असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.
गेल्या आठवड्यात ८००० ते ८४०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या मुगाच्या डाळीचे भाव १०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते ७९०० ते ८३०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. उडीदाच्या डाळीच्या भावातही घसरण होऊन ५९०० ते ६३०० रुपये प्रती क्विंटलवरून ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५६०० ते ६००० रुपये प्रती क्विंटलवर तर तसेच तूरडाळीच्या भावातदेखील २०० रुपये प्रती क्विंटलने घसरण होऊन ते ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटलवरून ८००० ते ८४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.
गव्हाचे भाव स्थिर
वर्षभरासाठी धान्य खरेदी थांबल्याने दोन आठवड्यांपासून गव्हाचे भाव कमी झाले आहेत. या आठवड्यात ते स्थिर राहिले. १४७ गव्हाचे भाव २३०० ते २३५० रुपये प्रती क्विंटल, लोकवन गव्हाचे भाव २२५० ते २३५० रुपये प्रती क्विंटल तर चंदोसीचे भाव ३७०० ते ३८०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहेत. या सोबतच शरबती गव्हाचे भावदेखील २४०० ते २४५० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून येणाऱ्या गव्हाची आवकही थांबली आहे.
तांदुळाचे भाव स्थिर
तांदुळाची आवक नसल्याने व मागणी कायम असल्याने अडीच महिन्यांपूर्वी तांदळाच्या भावातही वाढ झाली होती. मात्र महिनाभरापासून हे भाव स्थिर आहे. यात चिनोर ३२०० ते ३६०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४२०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४८०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २७०० ते २८०० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती ९००० ते १ हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Web Title: Due to lack of demand in the market of Jalgaon, the prices of grains are steady

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव