नऊ महिन्यातच विमानसेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 09:40 PM2018-11-23T21:40:04+5:302018-11-23T21:41:22+5:30

राज्यातील १० शहरांची निवड करण्यात आली होती

Closed air service in 9 months | नऊ महिन्यातच विमानसेवा बंद

नऊ महिन्यातच विमानसेवा बंद

Next

विकास पाटील
जळगाव : मुंबई-जळगाव विमानसेवा वर्षभराच्या आतच बंद पडल्याने जळगावकरांची निराशा झाली आहे. आता तर विमान कंपनी एअर डेक्कन सोबतचा करारही रद्द झाल्याने पुन्हा मुंबईवरुन जळगावकडे विमान केव्हा झेपावेल, याबाबत अनिश्चितता आहे. ही सेवा पुन्हा सुरु व्हावी यासाठी जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
२३ डिसेंबर २०१७ रोजी जळगाव-मुंबई विमानसेवेला प्रारंभ झाला होता. हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याने केंद्र शासनाने उडान ही योजना सुरु केली. या योजनेंतर्गत राज्यातील १० शहरांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार जळगाव-मुंबई विमानसेवेला प्रारंभ झाला होता. जळगावकरांचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण झाले मात्र नऊ महिन्यात विमान जमिनीवर आले आहे. सप्टेंबर अखेरपासून विमानसेवा बंद आहे.
मुंबईहून जळगावात कधीच वेळेवर विमान पोहचले नाही. मुंबई विमानतळावर दर अर्ध्या सेकंदाला एक विमान येत असते, दिवसभरात साधारणत: ९९८ विमानांची ये-जा असते. त्यामुळे प्रादेशिक विमानसेवेसाठी लवकर स्लॉट उपलब्ध होत नसल्याने विमानाला विलंब होत असे. लहान शहरे मोठ्या शहरांशी जोडून त्यांचा विकास करण्यासाठी जर केंद्र शासनाने उडान ही योजना सुरु केली आहे तर स्लॉटची अडचण यायलाच नको. कारण ही योजना सुरु करण्यापूर्वीच या अडचणीवर मार्ग काढणे आवश्यक होते. एअर डेक्कन या विमान कंपनीचे संचालक कॅप्टन गोपीचंद यांनी सुद्धा मुंबई विमानतळावर प्रचंड वर्दळ असल्याने २५ टक्के रिजनल कनेक्टीव्हीटी ‘उडान’साठी राखीव ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी जळगावात व्यक्त केली होती. ती नऊ महिन्यात पूर्ण झाली नाही. ती झाली असती तर कदाचित विमान जळगावात वेळेवर पोहचले असते. असे असतानाही जळगावकरांनी विमानसेवा बंद पडू नये म्हणून विमानसेवेला प्रतिसाद दिला.
जैन उद्योग समुहाने तर सहा महिन्यांची २५ टक्के तिकिटे आगावू घेतली. एवढेच नव्हे तर विमानसेवेच्या पहिल्याच दिवशी सात लाखाचा धनादेश एअर डेक्कन कंपनीला दिला होता. मात्र स्लॉटची अडचण शेवटपर्यंत कायम राहिली. या व इतर काही अडचणींमुळे विमानसेवा १४ मार्चपासून तर १९ एप्रिलपर्यंत म्हणजेच ३७ दिवस बंद होती. त्यानंतर २० एप्रिलपासून सेवा पुन्हा सुरु झाली. तेव्हापासून तर सप्टेंबर अखेरपर्यंत सेवा सुरु होती. दीड महिन्यांपासून विमान हवेतून जमिनीवर आले. आता तर एअर डेक्कन सोबतचा करार रद्द करण्यात आल्याने आता जळगाव -मुंबई विमानसेवा बंद झाली आहे.
आमदार, खासदारांनी ही सेवा सुरळीत चालण्यासाठी पाहिजे तसे प्रयत्न ११ महिन्यात केल्याचे दिसून आले नाही. किमान आता हीसेवा पुन्हा सुरु व्हावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच ही सेवा पुन्हा सुरु होईल.
भलेही नऊ महिन्यात विमान कधी वेळेवर झेपावले नसले तरी जळगावकरांनी विमानसेवेकडे कधी पाठ फिरवली नाही. असे असतानाही विमानसेवा किमान वर्षभरही सुरु राहू शकली नाही. एअर डेक्कन या कंपनीसोबतचा करार रद्द झाल्याने आता नवीन विमान कंपनीसोबत करार करण्यात येणार असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. हा करार केव्हा होतो अन् पुन्हा विमानसेवा केव्हा सुरु होते, याकडे जळगावकरांचे लक्ष लागून आहे. ही सेवा सुरु करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Web Title: Closed air service in 9 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव