प्रथमोपचार करा समजूनच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 11:36 PM2018-12-11T23:36:15+5:302018-12-11T23:36:57+5:30

कालानुरुप आज प्रत्येक माणसाची जीवनशैली बदलत चालली आहे. दगदग, ताणतणाव वाढताहेत. अशा परिस्थितीतही नोकरी, धंद्यानिमित्त घराबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना कधी कोणत्या शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागेल सांगता येत नाही.

First aid is understandable | प्रथमोपचार करा समजूनच

प्रथमोपचार करा समजूनच

googlenewsNext

- डॉ. स्वाती गाडगीळ

कालानुरुप आज प्रत्येक माणसाची जीवनशैली बदलत चालली आहे. दगदग, ताणतणाव वाढताहेत. अशा परिस्थितीतही नोकरी, धंद्यानिमित्त घराबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना कधी कोणत्या शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागेल सांगता येत नाही. चक्कर येणे, बेशुद्ध होणे, आकडी येणे तर कधी पूर्ण शुद्ध हरपणे, श्वास थांबणे असे प्रकार सर्रास घडतात आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्याबाबतीत. अशा घटना घडल्यावर त्या व्यक्तीच्या आजूबाजूला चर्चा अन् सावळागोंधळ जास्त होतो. मात्र गांगरून न जाता गरज असते ती त्या व्यक्तीवर योग्य असा प्रथमोपचार करण्याची. डॉक्टर येईपर्यंत किंवा हॉस्पिटलला नेईपर्यंत समजून उमजून प्रथमोपचार करावेत आणि मुख्य म्हणजे अशा त्रासांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने स्वत:च्या शरीराच्या गरजा ओळखून वेळीच योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

काल एक घटना टीव्हीवर पाहिली आणि मनातल्या मनात माझी खूप चिडचिड झाली. मीच नाही आमच्या भूलतज्ज्ञ संघटनेचे सगळेच सदस्य बेचैन झाले. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटले तर काय करावे? चक्कर आली तर काय करावे? पूर्णपणे शुद्ध हरपली, तर काय करावे? बेशुद्ध होऊन श्वास व हृदय थांबले तर काय करावे? आकडी आली तर काय करावे? कुणी व्यक्ती श्वासनलिकेत काही अडकून गुदमरली, मग ती व्यक्ती कोणत्याही वयाची का असेना, अशा वेळी काय करावे? याचे मूलभूत प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाला हवे.
अशा घटना आम्हाला बरेच वेळा हाताळाव्या लागतात. कधी घाबरलेला पेशंट, तर कधी हॉस्पिटल बघून घाबरलेला नातेवाईक, तर कधी अती थकव्यामुळे कोसळेला नर्सिंग स्टाफ किंवा खुद्द डॉक्टर ! साधं धनुर्वाताचं इंजेक्शन किंवा जागेवर दिलेलं भूलीचं इंजेक्शन असू दे , नुसता सुईचा स्पर्श होताच घाबरतात काहीजण ! आणि पुढे जे घडतं ते जीवघेणं ठरू शकतं. हृदयाचे ठोके भराभर कमी होऊ लागतात आणि तातडीने योग्य तो इलाज करावा लागतो. आॅपरेशन थिएटरमध्ये असं घडल्यास तिथे प्रशिक्षित स्टाफ आणि डॉक्टर असल्यामुळे जीवास होणारा धोका टाळता येतो. पण काल टीव्हीवर जे पाहिलं, ते बघून प्रकर्षाने जाणवले की इमर्जन्सी मॅनेजमेंटचे धडे प्रत्येक नागरिकाने घेतले पाहिजे.

सर्वप्रथम भोवळ आलेल्या व्यक्तीस संपूर्णपणे आडवं झोपवावं जेणेकरून हृदयाकडे येणारं रक्त व मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो. आजूबाजूला काही धोका नाही याची आधी खात्री करावी व त्या व्यक्ती भोवती गर्दी करू नये. शुद्ध हरपत असलेल्या व्यक्तीस खुर्चीत बसवू नये. उभं तर मुळीच करू नये. काही इजा होईल अशा अणकुचीदार वस्तू दूर साराव्या. त्यानंतर जर श्वास व हृदय सुरू असेल, तर त्या व्यक्तीचं नाव माहित असल्यास नावाने हाक मारून अन्यथा असंच उठवून बघावं.
एकीकडे त्या व्यक्तीवर प्राथमिक इलाज करत असताना दुसºया कुणीतरी तातडीने अ‍ॅम्ब्युलन्स व डॉक्टरांना फोन करावा. त्या व्यक्तीची नाडी तपासता येत असल्यास नाडीचे ठोके पाहावे. उलटी होत नाही ना ते पाहावं. घाईघाईने तोंडात चॉकलेट किंवा साखर कोंबू नये. परिस्थितीचा नीट आढावा घेतल्याशिवाय पाणीसुद्धा पाजायचं नसतं. अर्धवट शुद्ध असताना तोंडात टाकलेली गोष्ट श्वासनलिकेत जाऊन जीव गुदमरू शकतो. उलटीद्वारे वर आलेलं अन्न पाणीसुद्धा जीवास धोका करू शकतं. म्हणून, पूर्ण शुद्ध येईपर्यंत आडवं झोपवून मान एकीकडे वळवून ठेवावी. जर श्वास व हृदय बंद असेल, तर त्या व्यक्तीच्या बाजूला गुडघे टेकून बसावं आणि आपले दोन्ही पंजे एकमेकांवर ठेवून, कोपरामध्ये हात न दुमडता छातीच्यामध्ये असलेल्या हाडावर, साधारण मिनिटाला शंभर ते एकशेवीसवेळा दाब द्यावा. श्वास सुरू होतोय का ते पाहावं. असं किमान अर्धा तास करत राहावं. तोपर्यंत वैद्यकीय मदत उपलब्ध होईल अशा हालचाली वेगाने कराव्यात.
एखाद्या व्यक्तीला मधुमेह असल्यास त्याच्या रक्तातील साखरेची मात्रा कमी झाल्यामुळे चक्कर येण्याचा धोका असतो. कधीकधी रक्तातली साखर प्रमाणाबाहेर वाढली तरी माणूस बेशुद्ध पडू शकतो. म्हणून, समोरच्या व्यक्तीला नक्की काय झालं आहे, हे न कळता वेडावाकडा इलाज करू नये. तुमच्या समोर जर एखाद्याच्या घशात काहीतरी अडकून श्वास कोंडला असेल तर त्याच्या मागे उभं राहून एका हाताची मूठ त्याच्या पोटाच्या वरील भागावर मधोमध ठेवून दुसर्या हाताने त्यावर जोरात दाब द्यावा, जेणे करून वरच्या दिशेने प्रेशर जाईल व अडकलेली वस्तू बाहेर पडू शकेल.

कुणी पडल्यामुळे शरीरात कुठेही फ्रॅक्चर असण्याची शक्यता वाटली, तर त्यास उचलून उभ करण्याची घाई करू नये. कुठे मार लागला असू शकतो याचा अंदाज घ्यावा. खूप नाजूकपणे दुखºया भागाची हालचाल न करता, त्या भागाला पुरेसा व योग्य रितीने आधार देऊन मगच हॉस्पिटलमध्ये न्यावे. खासकरून जर मणक्याला मार लागला असण्याची शक्यता असेल तर अतिशय सावधपणे हालचाल करावी. जर सार्वजनिक ठिकाणी कुणाला आकडी आली तर पुन्हा वर सांगितल्याप्रमाणे, आधी मोकळ्या जागेवर आडवं झोपवावं. मोकळी हवा येऊ द्यावी, काही लागणार नाही याची काळजी घ्यावी, मान एकीकडे फिरवून श्वास मोकळा राहील याची खबरदारी घ्यावी, जीभ चावली जाऊ नये म्हणून तोंडात अशी कोणतीही कडक वस्तू घालू नये, ज्याने दात तुटू शकतील व असं ही काही घालू नये ज्याचा तुकडा मोडून ती वस्तू घशात अडकू शकते.

बरेच वेळा असं आढळून येतं की, काही विपरीत घटना घडल्यावर तिथे गर्दी तर गोळा होते पण नक्की करायचं काय, हे त्यापैकी कुणालाच माहीत नसतं. नुसता सावळागोंधळ मात्र उडतो. बघ्यांच्या गर्दीमुळे येणारी हवा व प्राणवायूची मात्रा अजूनच कमी होते . हार्ट अ‍ॅटॅक आला आहे असं म्हणून गांगरून जाण्यापेक्षा त्या व्यक्तीस ‘जीवनसंजीवनी द्यावी’. अर्थात, डॉक्टर किंवा अ‍ॅम्ब्युलन्स येईपर्यंत त्या व्यक्तीचा श्वास सुरु होईपर्यंत योग्य प्रयत्न करावे. या परिस्थितीत जर कुणी त्या व्यक्तीला खुर्चीत बसवून पाणी पाजण्याचा किंवा काही खाऊ घालण्याचा प्रयत्न केला, तर काय संकट ओढवू शकेल याचा निश्चितच आता तुम्हाला अंदाज करता येईल. या सगळ्याच महत्त्वाचे काय तर माणसाच्या चक्कर येण्याची किंवा अचानकपणे तत्सम प्रकारच्या त्रासाची कोणती लक्षणं दिसतात, ती दिसल्यास काय करावे हे प्रत्येकाला ठाऊक हवे, जेणेकरून एखाद्याचे प्राण वाचवता येऊ शकतात.

आज नोकरी, व्यवसायामुळे बहुतांश लोकांची जीवनशैली अतिशय धावपळीची आणि तणावपूर्ण झाली आहे. त्यातून निरिनराळ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या पण खूप वाढली आहे आणि राहणीमानात योग्य बदल न केल्यास ही संख्या वाढतच राहील अशी भिती वाटते. कर्करोगाने पण अगदी थैमान घातलं आहे, असं वाटावं इतके या आजाराचे रूग्ण आज आढळतात.
कर्करोग, पक्षाघात, हृदयविकाराचा झटका, हे जरी आज असाध्य आजार मानले जात नसले तरी त्यामागे येणारी वेदना, त्यासाठी लागणारा पैसा, याचं मोजमाप काय हो? उच्च रक्तदाब, मधुमेह, हे जरी श्रीमंतांनी मिरवण्याचे आजार मानले जात असले तरी हे आजार कधी दगा करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाने किमान आपल्या शरीराच्या गरजा ओळखून, योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे, योग्य आहार व पुरेसा आराम करणं देखील अपरिहार्य आहे एवढं नक्की.
 

Web Title: First aid is understandable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य