विदर्भातच दारुबंदी का?
By admin | Published: May 23, 2015 01:45 AM2015-05-23T01:45:21+5:302015-05-23T01:45:21+5:30
महाराष्ट्राच्या राजकारणात विदर्भ वगळता इतर प्रादेशिक विभागांचा बोलबाला आहे. मद्यप्राशनाचा शौक राज्यात सर्वत्र आहे.
अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात विदर्भ वगळता इतर प्रादेशिक विभागांचा बोलबाला आहे. मद्यप्राशनाचा शौक राज्यात सर्वत्र आहे. मात्र ज्यावेळी दारुबंदीचा विषय चर्चेला येतो तेव्हा विदर्भालाच टार्गेट बनविण्यात येते. विदर्भाशिवाय इतर प्रादेशिक विभागात दारुबंदी का नाही? असा सवाल बिअरबार असोसिएशनने करून हा विदर्भावर अन्याय असल्याचा आरोप केला आहे.
राज्यात दिवसेंदिवस मद्यपी व मद्य विक्रीच्या दुकानात वाढ होत आहे. दारूबंदीच्या अनेक चळवळीसुद्धा सुरूच असतात. दारू व्यवसायापासून शासनाला अमाप महसूल मिळतो. मात्र ठराविक कारण नसतानासुद्धा केवळ एकाच प्रांतात विदर्भात दारुबंदी केली जाते. राज्यात एकीकडे राजकारणावर छाप पाडणाऱ्या नेत्यांचे व मोठ्या उद्योजकांचे दारूचे कारखाने आहेत. ते आपले व्यवसाय जपताना मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश व इतर विभागात दारुबंदी होऊ देत नाहीत. तर दुसरीकडे दारूबंदीचा सपाटा सुरु आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यात मोहफुले हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. मोहफुले हे वनोपज असल्याने यावर बंदी आहे. मोहफुलांपासून उत्तम दारू तयार होते. गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असली तरी आदिवासी बांधव स्वत: पिण्यासाठी मोहफुलांपासून दारू तयार करतातच. मोहफुलांपासून दारु तयार करण्याची त्यांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी आहे. अशा परिस्थितीत मोहफुलांपासून दारू बनविण्याची परवानगी का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी जिल्हा या नावावर जर दारूबंदी झाली असेल तर राज्यात अनेक आदिवासी जिल्हे आहेत. काही जिल्हे विदर्भाबाहेरीलसुद्धा आहेत. पण तिथे दारूबंदी नाही. मग हा भेदभाव का केला जातो, असा सवाल विचारला जात आहे.
आदिवासी जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याला जशी मान्यता आहे, तशीच त्याही जिल्ह्यांना आहे. शिवाय शासकीय योजना व निधीचा लाभही मिळतो. अशा परिस्थितीत केवळ गडचिरोली जिल्ह्यातच दारूबंदी का? तो विदर्भात मोडतो हा येथील रहिवाशांचा दोष आहे काय? हे प्रश्न निर्माण होतात. (तालुका प्रतिनिधी)
विदर्भावर अन्याय- मेहता
संपूर्ण विदर्भात दारुबंदी करण्याचा एक सुनियोजित षडयंत्र रचला जात आहे. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी झाली तेव्हा मद्य परवाना हा मंत्रालयाच्या पर्यटन विभागाकडून दिला जात होता. आबकारी व दारुबंदी मंत्रालय असताना गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी लागू झाली आणि आता राज्य उत्पादन शुल्क मंत्रालयात जेव्हा माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी महिलांच्या अधिकार सुधारणा कायदा केला, तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी निर्णायक १ आॅगस्ट १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचे आवाहन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबई सभेत केले. त्यांच्या नावावर वर्धा येथे दारुबंदी झाली, मुंबई येथे का नाही? चंद्रपूर येथे महिलांच्या मागणीवर झाले. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याानंतर आता यवतमाळ, अमरावती, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात होत आहे. विदर्भाव्यतिरिक्त इतरत्र जिल्ह्यात का नाही, असा प्रश्न तालुका बिअरबार असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम मेहता यांनी उपस्थित केला आहे.