वाहन चोरांची आंतरराज्यीय टोळी अटक
By admin | Published: December 18, 2014 01:21 AM2014-12-18T01:21:55+5:302014-12-18T01:21:55+5:30
जिल्ह्यात वाहन चोरांच्या टोळीने मोठ्या प्रमाणात वाहन चोरी करुन सीमेलगतच्या राज्यात या वाहनांची विक्री करुन विल्हेवाट लावली जात आहे.
आमगाव : जिल्ह्यात वाहन चोरांच्या टोळीने मोठ्या प्रमाणात वाहन चोरी करुन सीमेलगतच्या राज्यात या वाहनांची विक्री करुन विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे पोलिसांपुढे या वाहन चोरांचे मोठे आव्हान पुढे ठाकले होते. आमगाव पोलिसांनी या टोळीतील सदस्यांना अटक करुन १४ वाहने हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
आामगाव तालुक्यातील विविध परिसरातून तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणाहुन वाहन चोरांच्या टोळीने दुचाकी वाहनांवर हात साफ करुन या वाहनांची विक्री करुन जवळच्या छत्तीगसड व मध्यप्रदेश राज्यातील विविध भागात विल्हेवाट लावली होती.
आमगाव येथील व्यवसायी विजयकुमार अग्रवाल यांची दुचाकी चोरांनी बनावट किल्लीच्या आधाराने चोरी केली. या वाहनचोरीची दखल घेत आमगाव पोलिसांनी वाहन चोरांचा पाठलाग करीत चोरट्यांच्या टोळीला गाठले.
शहरातील शंकर सलुनजवळून दुचाकी वाहन चोरी प्रकरणात वाहनांसह अटक करण्यात आलेला आरोपी दीपक नारद खरे (१८) रा.ग्राम खजरी जि. राजनांदगाव (छत्तीसगड) या अरोपीला ८ डिसेंबरला अटक केली. या आरोपीने दुचाकी वाहन चोरीत स्वत:सह टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रकरणाच्या तपासाकरीता उपविभागीय अधिकारी अजय देवरे यांच्या मार्गदर्शनारत पथक तयार करुन पोलीस निरीक्षक बी.डी. मडावी, उपनिरीक्षक सचिन पवार, पोलीस हवालदार निलू बैस, खेमराज खोब्रागडे, विनोद बरैया, देवचंद सोनटक्के यांनी कारवाई करीत छत्तीसगड राज्यातील विविध ठिकाणाहून ३४ दुचाकी वाहन हस्तगत केले. प्रकरणातील आरोपी जुळे भाऊ विनोद साधुराम मच्छिरके उर्फ मस्करे (२१) रा. टेकापार पो. पिपरीया ता. खैरागड जि. राजनांदगाव राज्य छत्तीसगड, विनोद साधुराम मच्छिरके (२१) याला अटक करण्यात यश मिळविले. दुचाकी वाहन चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील सदस्य राज्यातील चोरटी वाहनांची विक्री कमी किंमतीत स्वत:च्या नातेवाईकांना करीत असल्याची माहिती आरोपींनी दिली. आमगाव पोलिसांनी अटक केलेली आरोपींमध्ये विनोद तसेच विनोद मच्छिरके हे दोघे जुळे भाऊ असून कमी वेळात श्रीमंत होण्यासाठी चोरीकडे वळल्याची त्यांनी माहिती दिली. (शहर प्रतिनिधी)
वाहनचोरांचे छत्तीसगड व मध्यप्रदेशात वास्तव्य
महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यातील दुचाकी वाहनांची चोरी मोठ्या प्रमाणात होत असताना चोरांचा पाठलाग करण्यासाठी पोलिसांची दमछाक व्हायची. वाहन चोरांची माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये पोलीस विभागावर ताशेरे ओठण्यात येत असे. यातच आमगाव येथील वाहन चोरी प्रकरणातील चोरीची माहिती पुढे आली. यामध्ये महाराष्ट्रतील सीमा भागातून वाहनांची चोरी करणारी टोळी छत्तीसगड, मध्यप्रदेशात असल्याचे उघड झाले.