फक्त एक लाख खड्डे खोदले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 08:57 PM2018-06-02T20:57:59+5:302018-06-02T20:57:59+5:30

जिल्ह्याातील ५४६ ग्रामपंचायतींना सहा लाख ६०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. असे असताना मात्र या ग्रामपंचायतींनी वृक्षारोपणासाठी अद्याप फक्त एक लाख नऊ हजार ५०५ खड्डे खोदून ठेवले आहेत.

Dug only one million pits | फक्त एक लाख खड्डे खोदले

फक्त एक लाख खड्डे खोदले

Next
ठळक मुद्देटार्गेट सहा लाख वृक्षलागवडीचे : १ जुलैपासून होणार सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्याातील ५४६ ग्रामपंचायतींना सहा लाख ६०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. असे असताना मात्र या ग्रामपंचायतींनी वृक्षारोपणासाठी अद्याप फक्त एक लाख नऊ हजार ५०५ खड्डे खोदून ठेवले आहेत. १ जुलैपासून वृक्षलागवड केली जाणार असल्याने आता महिनाभरात या ग्रामपंचायत पाच लाख खड्डे खोदणार काय, असा सवाल येथे उपस्थित होत आहे.
राज्य शासनाने सन २०१८ च्या पावसाळ्यात १३ कोटी वृक्ष लागवडची संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेत जिल्ह्यात ५० लाखांपेक्षा अधिक रोपटे लावले जाणार आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५४६ ग्रामपंचायतींना वृक्षारोपण करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहेत. यात, तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींना एक लाख चार हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी फक्त ४ हजार ५३० खड्डे खोदले आहेत. गोंदिया तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींना एक लाख १९ हजार ९०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी ग्रामपंचायतींनी फक्त तीन हजार ८५० खड्डे खोदले आहेत.
गोरेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींना ६० हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी ग्रामपंचायतींनी २० हजार २०० खड्डे खोदले आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यातील ६३ ग्राम पंचायतींना ६९ हजार ३०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात असून ग्रामपंचायतींनी फक्त चार हजार ३५० खड्डे खोदले आहेत. आमगाव तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींना ६२ हजार ७०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात असून येथील ग्रामपंचायतींनी फक्त १५ हजार ५०० खड्डे खोदले आहेत. देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींना ६० हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी फक्त २३ हजार ३०० खड्डे खोदले आहेत.
सालेकसा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींना ४६ हजार २०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी फक्त २२ हजार ७७५ खड्डे खोदले आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींना ७७ हजार रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. त्यासाठी या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी फक्त १५ हजार खड्डे खोदले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींना ६ लाख ६०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले. मात्र जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मे अखेर फक्त एक लाख नऊ हजार ५०५ खड्डे खोदले आहेत. अशात उर्वरीत चार लाख ९१ हजार ९५ खड्डे अद्याप कधी खोदले जाणार असा प्रश्न पडत असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खड्ड्यांना उन्हाचा फटका?
उन्हाळ्यात माती किंवा मुरुमाच्या ठिकाणची जागा खोदण्यास मजुरांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. एक जोरदार पावसाची वाट खड्डे खोदण्यासाठी ग्रामपंचायत पाहात तर नसतील ना अशी शंका मनात येते. परंतु पावसाचे आगमन झाल्यावर शेतकरी पेरणीच्या कामाला लागेल. तेव्हा खड्डे खोदण्यासाठी मजूर कोठून मिळणार असा प्रश्न पडतो. अशात मागील वर्षातील रोपट्यांची संख्या यंदाच्या वृक्षारोपणात तर दाखविली जाणार नाही.
लावलेल्या रोपट्यांचे संवर्धन व्हावे
शासन दरवर्षी वृक्षारोपण करण्यावर भर देते. परंतु लावलेल्या रोपट्यांच्या संवर्धनाकडे तेवढाच भर देणे आवश्यक आहे. वृक्षारोपणासाठी जेवढा आग्रह केला जातो, तेवढाच आग्रह त्या रोपट्यांच्या संवर्धनासाठी करणे आवश्यक आहे. असे न झाल्यास लावलेली रोपटी एकतर देखभाली अभावी मरून जातात किंवा जनावरांच्या आहारी जातात. अशात वृक्ष लागवड कार्यक्रमाची उद्दीष्ट पुर्ती होत नाही.

Web Title: Dug only one million pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.